03 May 2022

अंतराळवीर.

अंतराळवीर.

>अवकाशविज्ञान>अंतराळवीर
अंतराळवीर : अवकाशयानातून पृथ्वीभोवतालच्या कक्षेत किंवा इतर ग्रहांकडे, चंद्राकडे किंवा दूरावकाशात जाणाऱ्या मानवांना (किंवा इतर प्राण्यांनाही) ‘अंतराळवीर’ म्हणतात. अमेरिकेत ‘ॲस्ट्रोनॉट’ व रशियात ‘कॉस्मोनॉट’ अशा संज्ञा रूढ आहेत. अंतराळवीर हे केवळ यानातील प्रवासी नसून त्यांनी अवकाशातील परिस्थितासंबंधी वैज्ञानिक माहिती मिळवावी अशी अपेक्षा असते. अवकाश-प्रवासात त्यांना अनुभवास येणाऱ्या गोष्टींची अचूक व विस्तारपूर्वक नोंद करुन पृथ्वीवरील स्थानकास माहिती पाठविणे, विशिष्ट उद्दिष्टांसाठी आखलेले प्रयोग करणे इ. कामे अंतराळवीरांना करावी लागतात.

१२ एप्रिल १९६१ रोजी रशियाच्या यूरी गागारिन यांनी व्होस्टोक-१ या अवकाशयानातून पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घातली व त्यांना जगातील पहिला अंतराळवीर म्हणून बहुमान मिळाला. त्यानंतर निरनिराळ्या अंतराळवीरांनी केलेल्या कामगिरीचा इतिहास कोष्टकरुपाने लेखाच्या शेवटी दिलेला आहे.

पृथ्वीवरून अवकाशात उड्डाण करावयाच्या वेळी अंतराळवीराला सहन कराव्या लागणाऱ्या प्रारंभीच्या यानाच्या प्रचंड रेट्यापासून ते परत पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना निर्माण होणा‍ऱ्या प्रचंड आघातापर्यंत व उष्णतेपर्यंत अवकाशातील प्रवास हा नेहमीच धोक्याचा असतो. बाह्य अवकाशातील उच्च निर्वातावस्था, अशनींशी व उल्कांशी टक्कर होण्याचा संभाव्य धोका, प्रखर विश्वप्रारण, उष्णता, वजनरहित अवस्था, नेहमीच्या हालचाली करण्यासही अपुरी असलेली यानातील जागा, यानाची वर-खाली, बाजूंना किंवा पुढे-मागे कोणत्याही दिशेने होणारी हालचाल (अनुस्थिती), यानाच्या आतील भागात निर्माण होणारे विषारी वायू, दीर्घकालाचा एकांतवास इ. अनेक प्रकारच्या समस्यांना मानवी अंतराळवीरांना अशा प्रवासात तोंड द्यावे लागते. याशिवाय अवकाशातील विशिष्ट परिस्थितीत अन्नाचा व पाण्याचा पुरवठा, मलमूत्राची विल्हेवाट, दाबयुक्त विशिष्ट पोशाखात हालचाल करणे इ. गोष्टी कशा कराव्यात यासारखे अनेक प्रश्न, प्रत्यक्ष अवकाशात जाण्यापूर्वीच सोडविणे आवश्यक असते. हे प्रश्न सोडविण्यासाठी वैज्ञानिकांची जमिनीवरच कृत्रिम रीतीने वर उल्लेख केलेल्या गोष्टींसाठी आवश्यक ती परिस्थिती निर्माण करण्याची व्यवस्था केली व अंतराळवीरांच्या विविध कसोट्या घेतल्या. वजनरहित अवस्था मात्र पृथ्वीवर निर्माण करणे शक्य नसल्यामुळे प्रत्यक्ष अवकाश-प्रवासातील अनुभवांचाच उपयोग करणे भाग पडले.

अंतराळवीरांना अवकाशातील परिस्थितीला समाधानकारकपणे तोंड देता यावे याकरिता त्यांना अत्यंत कडक प्रशिक्षण देणे आवश्यक असते. त्यासाठी १९५९ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) विभागाने मर्क्युरी योजनेसाठी अंतराळवीरांची पहिली तुकडी निवडली त्यावेळी प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक पार्श्वभूमी, शारीरिक सुदृढता व मानसिक आरोग्य या दृष्टीने कसोशीने पहाणी केली. उमेदवार हा अभियांत्रिकी किंवा एखाद्या भौतिक वा जीवविज्ञान-शाखेचा पदवीधर असावा तसेच तो भूसेना, नौसेना किंवा वायुसेना यांच्यातील चाचणी-वैमानिकांच्या प्रशालेतून उत्तीर्ण झालेला आणि जेट विमान चालविण्याचा कमीत कमी १,५०० तास उड्डाणकालाचा अनुभव असलेला असावा, अशा अटी घालण्यात आल्या. याशिवाय मर्क्युरी यानातील जागा अतिशय लहान असल्यामुळे उमेदवार १८० सेंमी, पेक्षा जास्त उंच नसावा तसेच त्याचे वय ४० पेक्षा कमी असावे इ. अटीही घालण्यात आल्या. जेमिनी व अपोलो या योजनांच्या प्रशिक्षणासाठी तसेच प्रत्यक्ष योजनांसाठी अधिक काळ लागणार असल्यामुळे वयोमर्यादा ३५ किंवा त्याखालची आणण्यात आली. तसेच लष्करी उमेदवारांप्रामाणेच नागरी सेवेत असणाऱ्यांनाही उमेदवारी खुली ठेवण्यात आली. अपोलो योजनेसाठी चाचणी-वैमानिक असण्याची अटही काढून टाकण्यात आली.

अंतराळवीरांची निवड करण्यासाठी नासाने डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ इ. तज्ञांच्या विविध समित्या नेमलेल्या होत्या. उमेदवार बुद्धिमान, स्थिर मनःप्रवृत्तीचा, आवश्यक तितका शारीरिक व मानसिक ताण सहन करणारा, तसेच आणीबाणीच्या प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची पात्रता असलेला आहे की नाही हे ठरवण्यासाठी अनेक गुंतागुंतीच्या कसोट्या ठेवण्यात आलेल्या होत्या. यांपैकी एका कसोटीत मानसिक ताण आणि थकवा यांना उमेदवार कसे तोंड देऊ शकतो हे अजमावण्यासाठी उमेदवाराला एका बंदिस्त व संपूर्ण ध्वनिमुक्त खोलीमध्ये ४८ तास ठेवून एकांतवासाच्या व अंधाराच्या परिस्थितीत यासंबंधीच्या त्याच्या प्रातिक्रिया कोणत्या होतात याचा अभ्यास करण्यात आला. अशा वेळी एकांतवास शक्य तितका सुखकारक होईल असे योग्य साधन (उदा. गणितीय प्रश्न सोडविणे) शोधून काढणाऱ्या उमेदवाराला पसंती दिली गेली. अतिशय गोंगाटाच्या परिस्थितीत काम करणे, ५५० से. पर्यंत तपमान सहन करणे, प्रवेग व ऋणप्रवेग सहन करण्याची मर्यादा इ. अनेक प्रकारच्या कसोट्या ठेवलेल्या होत्या. जेमिनी व अपोलो योजनांसाठी ठेवलेल्या कसोट्यात उद्दिष्टांनुसार काही बदल करण्यात आले परंतु प्रदीर्घ शारीरिक तपासणीत व विविध मुलाखतींत उत्तीर्ण होणे मात्र आवश्यक ठरविण्यात आले.

अंतराळवीरांचे प्रशिक्षण : मर्क्युरी योजनेत उमेदवारांना तीन वर्षे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी आलेल्या अनुभवांवरून जेमिनी व अपोलो योजनाकरिता प्रशिक्षणाची कालमर्यादा दीड वर्षापर्यंत कमी करण्यात आली. प्रशिक्षण-काळात अंतरावीरांची वारंवार शारीरिक तपासणी करून त्यांच्या आरोग्याची व प्रकृतीची खात्री करून घेण्यात आली.

अंतराळवीरांच्या प्रशिक्षणक्रमाचे पाच प्रमुख विभाग पाडण्यात आलेले आहेत : (१) वर्ग-प्रशिक्षण, (२) स्थिर प्रयुक्त्यांवरील प्रशिक्षण, (३)गतिमान प्रयुक्त्यांवरील प्रशिक्षण, (४) जीवसंरक्षण प्रशिक्षण आणि (५) विशेष विषयांचे प्रशिक्षण.

अंतराळवीरांना यामिकी (भौतिकीतील एक शाखा), ज्योतिषशास्त्र, वायुगतिकी, वातावरणविज्ञान, शरीरक्रियाविज्ञान व रॉकेट एंजिने यांचे मूलभूत ज्ञान वर्ग-प्रशिक्षणात देण्यात येते. याशिवाय संगणक सिद्धांत, उड्डाण-यमिकी, अवकाश-मार्ग-निर्देशन, परिचालन-पद्धती (विविध इंधनांचा उपयोग करुन अवकाशयाने चालविण्याच्या पद्धती), उच्चवातावरण-भौतिकी, अवकाशीय संदेशवहन इ. अधिक प्रगत विषयांतील शिक्षणही त्यांना देण्यात येते. वजनरहित अवस्थेत अवकाशयानाची दुरुस्ती कशी करावी याचीही माहिती अंतराळवीरांना देण्यात येते.

स्थिर प्रयुक्त्यांवरील प्रशिक्षणात अवकाश-उड्डाणातील प्रत्यक्ष परिस्थिती कृत्रिमपणे निर्माण करणाऱ्या स्थिर प्रयुक्त्यांवर सराव करण्याचा समावेश होतो. उदा., मर्क्युरी योजनेत प्रत्यक्ष यानातील अंतराळवीरच्या बैठकीचा व त्याच्या सभोवतालच्या उपकरणांच्या प्रतिकृतींचा सराव करणे आवश्यक होते. या बैठकीत अंतराळवीर बसल्यावर प्रतिकृती बाहेरून नियंत्रित करणारा तज्ञ अवकाशातील प्रत्यक्ष परिस्थितीत निर्माण होणाऱ्या विविध समस्या प्रतिकृतीत निर्माण करतो. या समस्या सोडविण्याच्या अनुभवामुळे अंतराळवीरांना त्यांच्या प्रवासात प्रत्यक्ष निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्याचे प्रशिक्षण मिळते. जेमिनी व अपोलो योजनांतील अंतराळवीरांना दोन अवकाशयाने जोडणे, चंद्रावर उतरणे, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अवकाशयानाची अनुस्थिती योग्य दिशेत ठेवणे इ. समस्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या स्थिर प्रयुक्त्या वापरुन सराव करावा लागला.

गतिमान अवस्थांतील प्रशिक्षणात अवकाशात प्रत्यक्ष परिस्थितीत सहन कराव्या लागणा‍ऱ्या प्रतिबलांना तोंड देऊन आवश्यक ते कार्य करण्याचा सराव करण्यात येतो. उदा., उड्डाणाच्या सुरूवातीस व पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्रात प्रवेश करताना अंतराळवीरांना नेहमीच्या गुरूत्वाकर्षणापेक्षा ८-१० पट अधिक प्रेरणा  सहन करावी लागते. अशा परिस्थितीत कार्य करण्याचा सराव होण्यासाठी मध्यापासून दूर ढकलणारी म्हणजे अपमध्य-प्रेरणा निर्माण करणाऱ्या एका प्रयुक्तीचा उपयोग करतात. एका लांब पोलादी दांड्याच्या टोकास एक लहान कोठडी बसविलेली असते व तीत प्रत्यक्ष अवकाशयानात असतात तशी उपकरणे बसविलेली असतात. या कोठडीत प्रत्यक्ष यानाप्रमाणेच दाबयुक्त हवा असते. अवकाशात प्रत्यक्ष सहन कराव्या लागणाऱ्या गुरूत्वाकर्षणाइतकी प्रेरणा निर्माण होईल इतक्या वेगाने दांडा फिरवण्यात येतो. यामुळे  कोठडीतील अंतराळवीराला अशा परिस्थितीत उपकरणांवर लक्ष ठेवण्याचा व प्रवेगित आणि ऋणप्रवेगित अवस्थांत यानावर नियंत्रण ठेवण्याचा सराव करता येतो.

दुसऱ्या एका प्रयुक्तीत एका वेळी तीन निरनिराळ्या दिशांत परिभ्रमण होईल अशा एका कोठडीत अंतराळवीराला ठेवतात. या परिस्थितीत त्याला उपकरणांवर लक्ष ठेवणे व नियंत्रकांचा उपयोग करून कोठडी स्थिरास्थेत आणण्याचा सराव करावा लागतो.

वजनरहित अवस्थेत खाणे-पिणे व यानातील इतर आवश्यक क्रिया करणे अवघड असते. तथापि पृथ्वीवर अशी अवस्था निर्माण करणे शक्य नसल्यामुळे मर्क्युरी, जेमिनी व आपोलो या यानांच्या प्रत्यक्ष प्रवासातच अंतराळवीरांना अशा अवस्थेत कार्य करण्याचा सराव करावा लागला.

अवकाशातून पृथ्वीवर परत येणारे यान पृथ्वीच्या कोणत्याही भागात उतरविता येणे शक्य असते. अमेरिकेची सर्व याने समुद्रात उतरविण्यात आली. अंतराळवीरांना अशा परिस्थितीत यानाच्या बाहेर येणे, मदत येईपर्यंत रबरी बोटीत पाण्यावर तरंगत काही काळ काढणे, तसेच यान पाण्यात बुडू लागल्यास त्यातून बाहेर कसे यावे याचाही सराव करावा लागतो. एखाद्या जंगलात किंवा उष्ण वाळवंटात यान उतरवावे लागल्यास स्वसंरक्षणाकरिता कोणते उपाय योजावेत, याचेही प्रशिक्षण त्यांना देण्यात येते.

अवकाश-प्रवासातील प्रत्येक कार्याचे अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात येते. त्याशिवाय एखाद्या विशिष्ट विषयातील (उदा., मार्गनिर्देशन, अनुस्थितिनियंत्रण, क्षेपण-यान-नियंत्रण इ.) अधिक प्रगत शिक्षणही देण्यात येते.

प्रत्यक्ष अवकाशात भ्रमण करीत असलेल्या यानातील अंतराळवीरांखेरीज इतर अंतराळवीरांनाही प्रशिक्षणासाठी संदेशवहन, दूरवर्ती नियंत्रण इ. कार्यात सक्रिय भाग घ्यावा लागतो. याशिवाय एखाद्या अंतराळवीरास काही कारणाने उड्डाणात भाग घेता येणे शक्य न झाल्यास त्याची जागा घेण्यासाठी दुसरा अंतराळवीर जय्यत तयारीत ठेवलेला असतो. अपोलो-१३ च्या उड्डाणाच्या वेळी ६ दिवस अगोदर मॅटिंग्ले यांना जर्मन गोवंराची बाधा झाल्यामुळे त्यांच्या ऐवजी जॉन स्विगर्ट यांनी या उड्डाणात भाग घेतला होता. ज्या यानातून प्रत्यक्ष प्रवास करावयाचा असतो त्याची अंतराळवीराला संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. प्रत्यक्ष उड्डाणात अंतराळवीराला चाचणी– वैमानिकाप्रमाणेच कार्य करावे लागते. उड्डाणात कोणकोणत्या गोष्टी घडत आहेत यासंबंधीची माहिती पृथ्वीवर पाठविणे व यान सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे या जबाबदाऱ्या अंतराळवीरांना पार पाडाव्या लागतात. पृथ्वीवर परत आल्यावर त्यांना प्रत्यक्ष उड्डाणात आलेल्या अनुभवाचे संपूर्ण वर्णन व अचूक वर्णन शास्त्रज्ञांना निवेदन करणे आवश्यक असते.

रशियात अंतराळवीरांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासंबंधी विशेषशी माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तथापि तज्ञांच्या मते त्या पद्धती अमेरिकेने वापरलेल्या पद्धतींपेक्षा फारशा निराळ्या नसाव्यात.

अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस

अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस

>अर्थशास्त्र>अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस
अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस: (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस = आयटक). ३१ ऑक्टोबर १९२० रोजी स्थापन झालेली भारतीय सर्वांत जुनी मध्यवर्ती ⇨कामगार  संघटना. १९१८ पासून भारतात कामगारसंघ उदयास येत होते. त्यांची मध्यवर्ती संस्था म्हणून आयटकची स्थापना झाली. जिनिव्हा येथे दर वर्षी भरणाऱ्या ⇨आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या परिषदेकरिता भारतीय कामगार प्रतिनिधी निवडण्यासाठी मध्यवर्ती संस्थेची आवश्यकता होती. ब्रिटनच्या ट्रेड युनियन काँग्रेसच्या धर्तीवर स्थापन झालेल्या आयटकने ती उणीव भरून काढली.

देशातील सर्व कामगार संघटनांशी सहकार्य करणे, निरनिराळ्या संघटनांच्या कार्यवाहीत सुसूत्रता आणणे, वेगवेगळ्या धंद्यांतील आयटकशी संबद्ध अशा कामगारसंघांना मार्गदर्शन करणे आणि कामगारांच्या मागण्यांसाठी संघटित स्वरूपाची चळवळ उभारणे, ही तिची उद्दिष्टे होत. प्रारंभापासूनच आयटकने कामगारांच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय हितसंबंधांचा पाठपुरावा केला.

लाला लजपतराय हे आयटकचे पहिले अध्यक्ष. सी. आर. दास, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस इत्यादींनीही ते पद भूषविले. प्रारंभी आयटक व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात सलोख्याचे संबंध होते. १९३० नंतर मात्र हे संबंध बिघडत गेले. त्यापूर्वी आयटकमध्ये पहिली दुफळी पडली होती. १९४७ नंतर ह्या संघटनेत साम्यवाद्यांखेरीज दुसरे कोणीही उरले नाही. आयटकचे प्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.

आयटकच्या संलग्न संघांच्या प्रतिनिधींची परिषद वेळोवेळी भरते. ती आयटकचे धोरण निश्चित करते आणि पदाधिकाऱ्यांची व एका साधारण मंडळाची निवड करते. ह्याशिवाय एक कार्यकारी मंडळ असते. भारतातील प्रत्येक राज्यात आयटकच्या शाखा आहेत. आयटकने कापडउद्योग, ज्यूट, खाणकाम आदी उद्योगधंद्यांसाठी संघसमूह (फेडरेशन्स) बनविले आहेत. ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील साम्यवादी गटाच्या महासंघाशी आयटक संलग्न आहे.

आयटक ट्रेड युनियन रेकॉर्ड  नावाचे पाक्षिक प्रसिद्ध करते.

आयटकशी १९७१ च्या अखेर ३, ०१८ कामगारसंघटना संलग्न असून सभासदांशी संख्या १८,७२,९८२ होती. देशातील मध्यवर्ती कामगार संघटनांमध्ये ⇨इंटकनंतर आयटकचा दुसरा क्रमांक लागतो.

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा

>इतिहास>अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा
अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा:

उत्तर अमेरिका खंडातील ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आपले ध्येय व उद्दिष्ट जगाला समजावे आणि स्वतंत्र राष्ट्रांचे आपल्याला साहाय्य मिळावे, म्हणून वसाहतींच्या प्रतिनिधिसभेने ४ जुलै १७७६ रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हापासून ४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.

वसाहती व मायदेश यांच्यातील वाद विकोपाला जाऊन युद्ध सुरू झाल्यावरही वसाहतींनी ब्रिटनचे सार्वभौमत्व मान्य करावे, पण अंतर्गत व्यवहारात वसाहतींना स्वातंत्र्य असावे, अशी तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्‍न झाले तथापि उभय पक्षांतील जहालांच्या विरोधामुळे ते फसले. युद्ध सुरू होताच वसाहतींनी फ्रान्ससारख्या देशांची मदत मिळविण्याचे प्रयत्‍न सुरू केले. तेव्हा लढून यश मिळविल्यानंतरही वसाहती ब्रिटनची ताबेदारी स्वीकारणार असतील, तर फ्रान्स आदी देशांनी त्यांच्या भानगडीत का पडावे, असा प्रश्न त्या देशांतील मुत्सद्दी व राज्यकर्ते उपस्थित करू लागले. त्यांच्या समाधानकारक उत्तरासाठी निर्भेळ स्वातंत्र्याचा पुरस्कार आवश्यक होता.

व्हर्जिनिया वसाहतीचा प्रतिनिधी रिचर्ड हेन्‍री ली याने काँटिनेंटल काँग्रेसमध्ये मांडलेला निर्भेळ स्वातंत्र्याचा ठराव २ जुलै १७७६ रोजी मान्य झाला. या ठरावावर चर्चा चालू असताच स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्यासाठी ⇨टॉमस जेफर्सन, ⇨बेंजामिन फ्रँक्लिन, जॉन ॲडम्स, रॉजर शेर्मन व रॉबर्ट लिव्हिंगस्टन या सभासदांची नियुक्ती झाली परंतु जाहीरनाम्याची भाषा व भावना ह्या दोहोंचाही जेफरसन हाच मुख्य शिल्पकार होता. त्यात काही दुरुस्त्या करून काँग्रेसने तो सर्वानुमते स्वीकारला.

ह्या जाहीरनाम्यात ब्रिटनने व विशेषतः तिसऱ्‍या जॉर्जने वसाहतींवर केलेल्या अन्यायांची यादी दिली आहे. वसाहतींची स्वातंत्र्याची मागणी निसर्गसिद्ध असल्याच्या तात्विक प्रतिपादनास त्यात प्राधान्य दिले आहे. जन्मतः व निसर्गतः सर्व माणसे सारखी असतात, हा सिद्धांत यात ठासून मांडला आहे. काही ईश्वरदत्त अधिकारांपासून माणूस वंचित राहू शकत नाही, या सूत्राच्या स्पष्टीकरणार्थ या जाहीरनाम्यात जीवितविषयक अधिकारांची परिगणना केली असून तिला सुखाकांक्षेच्या पूर्तीची पुस्ती जोडली आहे. सरकार ही संस्था मनुष्यनिर्मित असल्याने उन्मार्गगामी सरकार बदलून नवे सरकार अस्तित्वात आणण्याचा मानवाचा अधिकार वादातीत आहे, असा या अधिकाराचा गौरव या जाहीरनाम्याने केला आहे.

या जाहीरनाम्यावर लॉक, रूसो प्रभृती यूरोपीय तत्त्ववेत्यांच्या विचारसरणीचा व टॉमस पेनचा प्रभाव पडलेला स्पष्टपणे दिसून येतो. याच्या स्वीकृतीमुळे ब्रिटनशी तडजोड अशक्य झाली, वसाहतींना अन्य देशांची मदत मिळणे सुलभ झाले व अमेरिकेचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले. अमेरिका स्वतंत्र होऊन आता दोनशे वर्षे होत आली. या काळात निरनिराळ्या देशांतील अन्यायी राजवटींविरुद्ध झालेल्या संघर्षात मानवी गटांच्या प्रयत्‍नांना तात्विक बैठक मिळाली ती या जाहीरनाम्यातील विचारांची हे अमेरिकेतील निग्रोंच्या हक्कांची चळवळ, अनेक देशांचे पारतंत्र्यातून विमोचन व अनेक देशांतील साम्राज्यशाहीविरुद्धचे संघर्ष इत्यादींवरून दिसते. फ्रेंच क्रांतिकारकांनी स्वीकृत केलेली मानवी हक्कांची सूची व निरनिराळ्या देशांच्या संविधानांत ग्रथित झालेले नागरिकांचे मूलभूत हक्क याच जाहीरनाम्यावर आधारलेले आहेत. त्यामुळे ‘मानवी इतिहासाला कलाटणी देणारी आधुनिक काळातील क्रांतिकारक घोषणा’ असा या जाहीरनाम्याचा गौरव होतो तो यथार्थच वाटतो.

संभाजी महाराज इतिहास

संभाजी महाराज,

मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र, स्वराज्याचे पहिले युवराज, मराठा साम्राज्य चे दुसरे छत्रपती होते.

संभाजी महाराज दिलेर खान इतिहास अनेकांना संभ्रमित करणारा आहे. आज आपण शंभूराजे यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणार आहोत.

संभाजी महाराज इतिहास Sambhaji Maharaj History
संभाजीराजे भोसले (१४ मे, १६५७ – ११ मार्च, १६८९) हेे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती.  मराठा साम्राज्य संस्थापक शिवाजी महाराज भोसले यांचे जेष्ठ पुत्र होते.

संभाजी महाराज Sambhaji Maharaj

शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे ते जेष्ठ पुत्र. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी ९ वर्षे राज्य केले. मराठा साम्राज्य हे मुघल साम्राज्य तसेच सिध्दी आणि पोर्तुगीज यासारख्या अन्य शेजारील शासकांविरुद्ध लढा देत उभे होते.

संभाजी महाराज बालपण
संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर सईबाई यांच्या पोटी झाला. संभाजी राजे अवघे २ वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा मृत्यू झाला. आईविना पोर सांभाळायची जबाबदारी त्यांच्या आजी, शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब जिजाऊ यांनी स्वीकारली.

Sambhaji Maharaj with Jijau
Sambhaji Maharaj and Jijau
लहानपणापासून संभाजी महाराज चातुर्यवान होते. अनेक भाषा त्यांनी लहानपणीच शिकल्या होत्या. खेळात सुद्धा ते पटाईत होते. वयाच्या ८ व्या वर्षी संभाजीराजांना एका तहाखाली अंबरच्या राजा जयसिंग यांच्याबरोबर राहण्यास पाठवले गेले. यामागे शिवाजी महाराज यांचे चातुर्य होते. संभाजी महाराज यांना मुघल आणि राजपूत यांचे राजकीय डाव आणि आखणी समजावी असा हेतू शिवाजी महाराज यांचा होता.
वयाच्या १४ व्या वर्षी संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत बुधभूषण ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज याचे सुंदर आणि अलंकारिक भाषेत वर्णन केले आहे

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।

जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥

अर्थ-“कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा र्‍हास


तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ ”

संभाजी महाराज
संभाजी महाराज बुधभूषण ग्रंथ
अगदी लहान वयात संभाजी महाराज यांचे अनेक भाषेवर प्रभुत्व होते.

संभाजी महाराज यांचा विवाह
संभाजी महाराज यांचा विवाह जिवाबाई यांच्याशी झाला. मराठा रीतिरिवाज नुसार त्यांनी आपले नाव येसूबाई ठेवले. शिवाजी महाराज यांनी कोकण मध्ये मराठा साम्राज्य वाढीसाठी प्रचितगड वर ताबा मिळवला. त्यात पिलाजीराव शिर्के यांची मदत झाली आणि मराठा साम्राज्य ला कोकण ची वाट मोकळी झाली. त्यात झालेल्या तहानुसार संभाजी राजे यांचा विवाह पिलाजीराव यांच्या कन्या येसूबाई(जिवाबाई) यांच्याशी झाला.

संभाजी महाराज राज्याभिषेक । Sambhaji Maharaj Rajyabhishek


शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराज यांनी आपल्याकडे घेतली.
१६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर पूर्णतः राज्याभिषेक झाला.

संभाजी महाराज
Sambhaji Maharaj Rajyabhishek
संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध असणाऱ्या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना संभाजी महाराज यांनी उदांत अंतःकरणाने माफ केले होते आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले होते.

संभाजी महाराज प्रधान मंडळ
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले)

श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)


सरसेनापती: हंबीरराव मोहिते
कुलमुखत्‍यार (सर्वोच्च प्रधान): कवी कलश (कलुषा)
पेशवे: निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश: प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष: मोरेश्वर पंडितराव
चिटणीस: बाळाजी आवजी
सुरनीस: आबाजी सोनदेव
डबीर: जनार्दनपंत
मुजुमदार: अण्णाजी दत्तो
वाकेनवीस: दत्ताजीपंत

संभाजी महाराज पराक्रम
संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एकहाती लढा दिला.

संभाजी महाराज

संभाजी महाराज यांनी गनिमी कावा च्या पुरेपूर वापर करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे यांनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. त्यात महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी १२० पैकी एकही लढाई हारली नाही. संभाजी महाराज असे एकमेव योद्धा होते ज्यांनी असा इतिहास घडवला होता. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वाढेल आणि मराठा साम्राज्य मातीस मिळेल अशी आशा बाळगून बसलेल्या औरंगजेब ला कित्येक वर्षात एक सुद्धा विजय मिळाला नसल्याने तो चवताळून उठला होता.

संभाजी महाराज दिलेर खान इतिहास । Sambhaji Maharaj Diler Khan History in Marathi


छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर दक्षिण दिग्विजय करण्यासाठी कर्नाटक स्वारीवर जाताना (नोव्हेंबर १६७६) संभाजीराजांना शृंगारपूरला राहण्याची अनुज्ञा दिली होती. काही इतिहासकारांच्या मते कदाचित सावत्र आई सोयराबाईंच्या सहवासात त्यांना रायगडावर ठेवणे महाराजांना इष्ट वाटले नसावे. तर काहींच्या मते दिलेर खान ला खेळवत ठेवण्यासाठी महाराजांनी हि खेळी केल्याचे म्हणले आहे. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करत असताना औरंगजेबाने दिलेर खान ला मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी १५००० फौज देऊन चाल करून पाठवले होते. शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असताना एवढ्या मोठ्या फौजेला तोंड देणे जिकिरीचे काम होते. त्यात अनेक मावळ्यांचा हकनाक बळी गेला असता. दिलेर खान मराठा साम्राज्यात पोहचल्यानंतर संभाजी महाराजांनी  दिलेर खान बरोबर पत्रव्यवहार चालू केला होता. त्यात त्यांनी स्वराज्यात त्यांची होणारी हेळसांड बोलून दाखवली. दिलेर खान यावर आनंदी झाला आणी त्याने संभाजी महाराज यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करत मुघल साम्राज्यात येण्याची विनंती केली. संभाजी महाराज यांनी यावर अत्यंत सावध आणि सावकाश भूमिका घेतली. “छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असल्याने स्वराज्याची जबाबदार आमच्याकडे असल्याने तूर्तास आम्हांस आपल्याकडे येणे शक्य नाही” असे म्हणत संभाजी महाराजांनी दिलेर खान यास अनेक महिने खेळवत ठेवले होते.

संभाजी महाराज दिलेर खान इतिहास । Sambhaji Maharaj Diler Khan History in Marathi
Sambhaji Maharaj and Diler Khan
मुघल साम्राज्यात आल्यास त्यांना कितीची मनसबदारी मिळणार, त्यांचे पद काय असणार यावर संभाजी महाराज दिलेर खान यांच्यात जवळपास ६ पत्रव्यवहार झाले होते, त्यात प्रत्येकवेळी संभाजी महाराजांनी औरंगजेबाची परवानगी मागितली असल्याने प्रत्येक पत्रासाठी दिलेर खानाला औरंगजेबाची परवानगी घेण्यासाठी त्याच्या माणसांना पाठवावे लागे. यात अनेक महिन्यांचा काळ गेला. एवढी मोठी फौज घेऊन चालून आलेला दिलेर खान अनेक महिने पत्रव्यवहारात अडकून बसला होता. त्याची फौज विनालढाई असल्याने सुस्तावली होती. दिवसेंदिवस फौजेचा खर्च वाढत होता. संभाजी महाराजांनी राजकारणातील गनिमी कावा करत दिलेर खान ला स्वराज्यात चांगलेच अडकून ठेवले होते. परंतु, त्यानंतर छ. शिवाजी महाराज एप्रिल-मे १६७८ दरम्यान कर्नाटकच्या स्वारीवरून परतल्यावर त्यांनी राजांना सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला (नोव्हेंबर १६७८) तिथून संभाजीराजे एक महिन्याने दिनांक १३ डिसेंबर १६७८ रोजी गडावरून माहुली येथे आले आणि मोगलाईत दिलेरखानाकडे गेले.

अशा रीतीने संभाजीराजे स्वराज्यातून शत्रूपक्षात सामील झाले. दिलेरखानाने याचा फायदा घेऊन मराठी मुलखातील प्रदेश जिंकण्यास सुरूवात केली. दोघांनी काही गड घेतले. त्यात दि. १७ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगड जिंकला, ७०० माणसे कैद केली. त्यांतील प्रत्येकाचा एक एक हात कापून त्यांना सोडून दिले, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत वेगळे दाखवले असून त्यात मावळ्यांचे हात तोडण्यास संभाजी महाराजांनी विरोध केला होता असे दाखवले आहे. यात ईतिहासकारांच्यात मतभेद आहेत.  त्यानंतर संभाजी व दिलेरखान यांनी काही ठाणी घेऊन, मंगळवेढे जिंकून विजापूरच्या बाजूस गेले. त्यांनी जालगिरी, तिकोटा, होनवड या मार्गाने अथणी गाठली. संभाजी महाराज आणि दिलेर खान यांच्यात मतभेद वाढत होते. संभाजी महाराजांना अनेक निर्णयात डावलल्याने संभाजी महाराज दिलेर खानावर नाराज होते.  याच सुमारास दिलेरखान व संभाजी यांत मतभेद होऊन राजे गुप्तपणे स्वराज्यात पन्हाळ्यास आले (२१ डिसेंबर १६७९). छत्रपती शिवाजी महाराज यांनी संभाजी महाराज यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवले.

शिवाजी महाराज मृत्यू
छ. शिवाजी महाराज यांचा (३ एप्रिल १६८०) रोजी रायगडावर मृत्यू झाला तेव्हा संभाजीराजे पन्हाळ्यावर नजकैदेत होते. महाराजांच्या मृत्यूनंतर अण्णाजी दत्तो, मोरोजी पिंगळे, बाळाजी चिटणीस यांनी सोयराबाईंना सोबतीला घेऊन छोट्या राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा घाट घातला. सर्वांनी मिळून राजाराम महाराजांना गादीवर बसवले. हंबीरराव मोहिते यांना संभाजी महाराज यांना कैद करण्यास पाठवले. परंतु सोयराबाईंचे बंधू हंबीरराव मोहिते यांनी हा खेळ मोडीत काढत संभाजी महाराजांना पन्हाळगडावरून सोडवले.

संभाजी महाराज यांनी रायगड ताब्यात घेतला आणि स्वराज्यद्रोह खेळ मांडलेल्या कारभाऱ्यांना कैद केले. संभाजी महाराज यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेत शंभूराजे रयतेचे दुसरे छत्रपती झाले. स्वराज्यविरोधात कट रचलेल्या कारभाऱ्यांना संभाजी महाराजांनी मोठ्या मनाने  माफ करत सोडून दिले. १६८१ रोजी सोयराबाईंचा मृत्यू झाला. संभाजी महाराजांनी स्वतः त्यांचा अंत्यविधी केला.


संभाजी राजांनी अण्णाजी दत्तो (Annaji Datto)  यांना पेशवेपद पुन्हा दिले. पुढे संभाजी महाराज त्यांना बुऱ्हाणपूर लुटीत घेऊन गेले. परंतु अण्णाजी दत्तो कारस्थान करणे सोडत नव्हते. जेव्हा औरंगजेबाला कंटाळून त्याचा मुलगा अकबर संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आला तेव्हा अण्णाजी दत्तो यांनी त्यांच्याकडे शिर्के यांना चिथावून संभाजी महाराज यांच्यावर कारस्थान करण्याचा प्रयत्न केला. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आलेल्या अकबराने हि सर्व हकीकत महाराजांना कळवली. सारख्या सारख्या होणाऱ्या दगाबाजीला कंटाळून संभाजी महाराज यांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिले.

SAMBHAJI MAHARAJ History
संभाजी महाराज अण्णाजी दत्तो यांना हत्तीच्या पायाखाली चिरडण्याची शिक्षा सुनावताना
संभाजी महाराज यांची मोहीम: बुऱ्हाणपूर लुट
छत्रपती शिवरायांच्या कैलासवासानंतर शंभूराजे छत्रपती झाले. शंभूराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. राज्याभिषेकानंतर एखादी प्रचंड लूट मोहीम आखून लूट मिळवावी व राज्याचा खजिना मजबूत करावा या हेतूने शंभूराजांनी मोघलांच्या बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला करून तेथील अठरा पुरे लुटून स्वराज्याच्या खजिन्यात भर टाकण्याचा मनसुभा रचला. आधी संभाजी महाराज यांनी सुरत लुटणार अशी अफवा पसरवली. बुऱ्हाणपूर ची लूट करण्याचे नेतृत्व हंबीरराव मोहिते यांच्याकडे सोपवले. ३० जानेवारी १६८१ रोजी सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला केला. खानजहान हा बुऱ्हाणपूरचा सुभेदार होता. आणि त्याचा साहाय्यक होता काकरखान अफगाण. मोठ्या फौजफाट्यासहित मराठे ७० मैलाची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. तीन दिवसापर्यंत मराठे पुरे लुटीत होते. त्यांना मुबलक लुट मिळाली. त्यांनी जडजवाहीर, सोने-नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. इतर जिन्नसाची त्यांनी परवा केली नाही. भांडीकुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे इ. सर्व लुट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून दिले. व नंतर ते निघून गेले. या लुटीने औरंगजेब एवढा चिडला की तो उत्तरेकडची आलिशान गादी सोडून मराठ्यांवर आक्रमण करण्यास मोठा फौजफाटा घेऊन चालून आला.

रामशेज किल्ला लढाई
एक तरी विजय मिळावा म्हणून औरंगजेब याने शहाबुद्दीन बरोबर आपली भली मोठी तुकडी नाशिक चा रामशेज किल्ला जिंकायला पाठवली.

रामशेज

शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार फौजफाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा रामसेज चे किल्लेदार सूर्याजी जेधे ५००-६०० मावळ्यांसोबत गडाचे रक्षण करत उभे होते. मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकून आपल्या विजयाची ज्योत पेटवू. परंतु मराठ्यांच्या गनिमी काव्याने शहाबुद्दीन च्या सैन्याला पुरते जेरीस आणले. मराठे गडावरून दगडगोट्यांच्या वर्षाव मुघल सैन्यावर करत त्यामुळे मुघल सैनिक हैराण झाले होते. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत. संभाजी महाराज यांनी किल्यावर रसद पोहचवण्यासाठी खास तुकडी तैनात केल्या होत्या. त्या तुकड्यांनी सुद्धा मुघल तुकडीला हैराण केले होते. औरंगजेबाने तब्बल तीन सरदारांना रामशेज जिंकण्यासाठी पाचारण केले परंतु एकालाही हा किल्ला जिंकला आला नाही. सलग ५ वर्षे हा किल्ला अजिंक्य राहिला. सूर्याजी जेधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा किल्ला अजिंक्य ठेवला.

संभाजी महाराज कैद
१६८९ च्या सुरुवातीस संभाजीराजे यांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांची बैठक कोकणात संगमेश्वर येथे आयोजित केली होती. १ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संभाजी महाराज यांच्या ३००-४०० च्या तुकडीवर आपले ३००० चे सैन्य घेऊन संगमेश्वराजवळ चालून आला. मराठ्यांच्या आणि शत्रूच्या सैन्यात मोठी चकमक उडाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. मराठ्यांचा राजा वैरांच्या मगरमिठीत सापडला. पकडलेल्या संभाजी महाराज व कवी कलाश यांना बहादूरगडमध्ये नेण्यात आले, जेथे औरंगजेबाने त्यांची विदूषक कपडे घालून धिंड काढली.

संभाजी महाराज इतिहास

संभाजी महाराजांना मराठ्यांसह आपल्या किल्ले, खजिना मुघल साम्राज्याला बहाल करण्यास सांगितले गेले. परंतु झुकेल तो मराठा राजा कसला. ‘मोडेन पण वाकणार नाही‘ चा नारा देत मराठा साम्राज्याचा राजा मुघलांचे अत्याचार सोसत राहिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. औरंगजेबाला तुळापूरच्या संगमावर संभाजी महाराज यांना हलाल करावयाचे होते. आपकी एकनिष्ठा न सोडणाऱ्या संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलश यांचेही डोळे काढण्यात आले. एवढे करूनही संभाजी महाराज डगमगले नाहीत.


औरंगजेबाने संभाजी महाराजाना पुढील शिक्षा जीभ कापायची दिली. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यंची जीभ तलवारीने कापली.. त्यांच्यावर चाललेले हे अत्याचार पाहुन भीमा-इंद्रायणी सुद्धा रडु लागली. अखेर संभाजी महाराज यांची ११ मार्च १६८९ रोजी भीमा – इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

संभाजी महाराज
तुळापूर येथे संभाजी महाराज यांची हत्या झाली येथील दगडशिल्प
स्वराज्याचा धनी अनंतात विलीन झाला. एवढे अत्याचार करून सुद्धा मराठ्यांचा राजा झुकला नाही. याची सल औरंगजेबाला कायम राहिली.

संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्यात आले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पेरून ठेवलेली स्वराज्याची शिकवण पुढेही मराठ्यांनी वाढवत नेली.

अशा स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांना @PuneriSpeaks चा मानाचा मुजरा..!

संभाजी महाराज यांचा पराक्रम शाहीर योगेश यांनी आपल्या पोवाड्यातून सांगितला आहे.

देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।।
तेज:पुंज तेजस्वी आँखें। निकलगयीं पर झुकी नहीं।।
दृष्टि गयी पर राष्ट्रोन्नति का। दिव्य स्वप्न तो मिटा नहीं।।
दोनो पैर कटे शंभू के। ध्येय मार्ग से हटा नहीं।।
हाथ कटे तो क्या हुआ?। सत्कर्म कभी छुटा नहीं।।
जिव्हा कटी, खून बहाया। धरम का सौदा किया नहीं।।
शिवाजी का बेटा था वह। गलत राह पर चला नहीं।।
वर्ष तीन सौ बीत गये अब। शंभू के बलिदान को।।
कौन जीता, कौन हारा। पूछ लो संसार को।।
कोटि कोटि कंठो में तेरा। आज जयजयकार है।।
अमर शंभू तू अमर हो गया। तेरी जयजयकार है।।
मातृभूमि के चरण कमलपर। जीवन पुष्प चढाया था।।
है दुजा दुनिया में कोई। जैसा शंभू राजा था?।।