Ads

03 May 2022

वाहतूक

वाहतूक

वाहतूक : एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाप्रत माणसे व माल हलविण्याची क्रिया वा कृती. माणसांना इष्ट त्या स्थळी जाण्याची गरज वा इच्छा असल्यास त्या स्थळी पाठविणे वा नेणे तसेच त्यांना आवश्यकता वा गरज भासणाऱ्या वस्तूंची वा मालाची पोच वा पाठवणी करणे, ह्या गोष्टी वाहतुकीमुळे शक्य होतात. वाहतुकीविना व्यापार शक्य नाही, व्यापाराशिवाय गावे वा शहरे वसणे शक्य नाही. परंपरेने गावे व नगरे (शहरे) ही संस्कृतिकेंद्रेच समजण्यात येतात. म्हणूनच एका प्रकारे वाहतूक ही संस्कृतीची माता वा जननीच मानावयास हवी.

विविध संस्कृत्यांचे (वा देशांचे / राष्ट्रांचे) इतिहास पाहू जाता असे आढळून येते की, वाहतुकीची प्रगती सतत मंद व अत्यंत अवघड अशीच होत आली आहे. प्रागैतिहासिक काळापासून लोक मुख्यतः पायीच प्रवास करीत. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे माल आपल्या पाठीवरून, डोक्यावरून अथवा जमिनीवरू ओढत वा ढकलत नेत असत. इ. स. पू. ५००० वर्षांच्या सुमारास, लोक ओझी वाहून नेण्याकरिता प्राण्यांचा वापर करू लागले. इ. स. पू. ३००० वर्षांच्या सुमारास, चार चाकांची गाडी (वॅगन) तसेच शिडांची गलबते यांचा शोध लागला. त्यामुळे प्राणी, वॅगन व शिडांची गलबते यांचा वापर केल्यामुळे लोकांना ओझी व माल अधिक अंतरावर-सुदूर अंतरावर -वाहून नेणे सुलभ होत गेले. अर्थातच वाहतुकीचा वेग मात्र गतिमान होण्यासाठी अनेक शतकांचा काळ जावा लागला.

एंजिनांमुळे गतिमानता लाभलेल्या वाहनांचा शोध सतराव्या शतकाच्या जवळजवळ शेवटी व अठराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकांत लागल्याचे आढळते. हा विकास म्हणजे वाहतूकक्षेत्रातील क्रांतीचा आरंभ टप्पा (आरंभावस्था) मानावयास हवा, कारण की विकासप्रक्रिया अजूनही चालू आहे. सांप्रत जेट विमाने माणसांना जवळजवळ ध्वनीच्या वेगाने अथवा त्याहूनही अधिक वेगाने एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी वाहून नेतात. जगातील बहुतेक भागांत आगगाड्या, ट्रक, अवाढव्य मालवाहू जहाजे प्रचंड मालाचा साठा सातत्याने खरेदीदारांकडे पोहोचवीत असतात. मोटारगाड्या लक्षावधी लोकांची सोयीस्कर व सुकर वाहतूक देश-प्रदेशांच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत घडवून आणतात.

जरी एंजिनप्रणीत वाहनांच्या वाहतुकीमुळे लोकांना अनेक फायदे झाले असले, तरी तीमुळे समस्याही उद्‌भवल्या आहेत. उदा., एंजिनांच्या वाहनांमुळे इंधन इंधन प्रमाण फार मोठे लागते व परिणामी जगाच्या ऊर्जा पुरवठ्यावर व साठ्यावर विलक्षण ताण निर्माण होतो. मोटारगाड्यांच्या वाहतुकीमुळे अनेक रस्ते व राजमार्ग यांमध्ये प्रचंड अडथळे निर्माण होऊन त्यांचा परिपाक प्रवासाच्या मंदगतीमध्ये होतो. याशिवाय या मोटारगाड्यांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे व वाफेमुळे सबंध परिसर व आसमंत दूषित होतो. या समस्या इतक्या जटिल आहेत की, वाहतूक प्रश्नांची उकल करण्याच्या कामी शासनांना जास्तीत जास्त भाग घ्यावा लागत आहे.

या लेखामध्ये वाहतूक प्रकार, त्यांचा विकासेतिहास आणि सांप्रतची एंजिनप्रणीत गतिशील वाहतूक यंत्रणा यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

वाहतूक प्रकार : वाहतुकीचे मुख्यतः (१) जमीन, (२) जल व (३) हवा, असे तीन प्रकार संभवतात. जमिनीवरील वा भूपृष्ठावरील वाहतूक ही प्रामुख्याने चाकांच्या वाहनांवर उदा., मोटारगाड्या, आगगाड्या व ट्रक यांवर अवलंबून असते. जहाजे व आगबोटी ही मुख्यतः जलवाहतूक करणारी वाहने होत. हवेतून केली जाणारी वाहतूक ही सर्वस्वी विमानांवरच अवलंबून असते.

प्रत्येक वाहतूक प्रकार ही पुन्हा ती वाहतूक करणारी वाहने एंजिनप्रणीत वा एंजिनाविरहित आहेत किंवा काय, यांवर सीमित असतो. एंजिनप्रणीत वाहनांना पेट्रोल, डीझेल वा जेट एंजिने लावलेली (बसविलेली) असतात. एंजिनविरहित वाहने ही मानवाच्या, प्राण्यांच्या स्नायुशक्तीमुळे अथवा वारा किंवा वाहते पाणी यांसारख्या नैसर्गिक शक्तिस्त्रोतांमुळे चालविणे शक्य होते.

एंजिनप्रणीत वाहतूक ही एंजिनरहित वाहतुकीपेक्षा पुढील कारणांमुळे फायदेशीर ठरतेः एकतर ती जलद, वेगवान, सोयीस्कर आणि अवलंबून राहता येईल अशी असते दुसरे म्हणजे तिच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मालाची ने-आण करणे शक्य होते. अर्थातच अशा प्रकारची वाहतूक ही महागडी व खर्चिक असते. एंजिनप्रणीत वाहनांद्वारे करण्यात येणाऱ्या वाहतुकीवर अनेक सहस्त्र डॉलरपासून लक्षावधी डॉलरपर्यंत खर्च करावा लागतो आणि ही खर्चमर्यादा वाहतूक कोणत्या प्रकारच्या वाहनांतून केली जाते, यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या वाहतुकीमध्ये, वापरण्यात येणाऱ्या वाहनांकरिता आधार सुविधा आवश्यक असतात. उदा., मोटारींना वाहतुकीसाठी रस्त्यांची, आगगाड्यांना लोहमार्गाची, जहाजे व आगबोटी यांना बंदरांची, तर विमानांना विमानतळांची अत्यावश्यकता असते. या सर्व सुविधा बांधावयास (निर्माण करावयास) व त्यांचे जतन वा संवर्धन करावयास अत्यंत खर्चिक (महागड्या) असतात. एंजिनप्रणीत वाहतुकीच्या प्रत्येक प्रकाराला ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे वाहनांची किंमत, आनुषंगिक सुविधा आणि ऊर्जा यांवर येणारा खर्च हे सर्व जमेस धरता एंजिनप्रणीत वाहतूक ही अत्यंत खर्चिक होऊ शकते.

औद्योगिक दृष्ट्या विकसित राष्ट्रांमध्ये (उदा., अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, यूरोपीय राष्ट्रे इ.) एंजिनप्रणीत वाहनांचा सर्वाधिक उपयोग वापर केला जातो, तर आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका यांसारख्या खंडांतर्गत देशांत एंजिनप्रणीत वाहनांचा उपयोग वा वापर अतिशय खर्चिक व त्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना परवडणारा असू शकत नाही.

भूपृष्ठीय वा जमिनीवरील वाहतूक ही सर्वाधिक स्वरूपात केली जाणारी वाहतूक मानली जाते. एंजिनप्रणीत (एंजिनचालित) भूपृष्ठवाहतुकीमध्ये मोटारगाड्या, बसगाड्या, मोटारसायकली, नळमार्ग, बर्फावरील घसरगाड्या, आगगाड्या (रेल्वे), तसेच ट्रक यांचा प्रामुख्याने समावेश होतो. नळमार्ग आणि बर्फावरील घसरगाड्या यांव्यतिरिक्त अन्य सर्व वाहनांना चाकांची आवश्यकता असते.

मोटारगाड्या, बसगाड्या व मालवाहू गाड्या (ट्रक) ही प्रामुख्याने रस्त्यावरून धावणारी वाहने होत. ज्या भागांत रस्त्यांचे (मार्गांचे) चांगले जाळे पसरलेले असेल, त्या प्रदेशांत या वाहनांमुळे अनेक प्रकारच्या वाहतूक सुविधा पुरविल्या जाणे शक्य होते. लोकांना सोयीस्कर वेळेस व अतिजलद मार्गाने (मार्गावरून) मोटारगाड्यांमधून प्रवास करता येतो. बसगाड्यांच्यायोगे शहरांमधील तसेच शहरांच्या अनेक भागांमधून प्रवाशांना प्रवास करणे शक्य व सोयीचे होते. यूरोपीय देश, जपान यांसारख्या देशांमध्ये अनेक लोक आपल्या घरांतून कामाच्या जागी व पुन्हा घरी मोटारसायकली तसेच स्कूटर या जलद व सुटसुटीत वाहनांद्वारा प्रवास करतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात, निखळ मनोरंजनाच्या हेतूने लोक मोटारसायकली वापरतात.

याउलट आगगाड्यांना लोहमार्गांवरून अथवा रुळांवरून धावावे लागते. परिणामी, ट्रकांप्रमाणे घरपोच मालवाहतूक सेवा अथवा बसगाड्यांप्रमाणे जोडसेवा रेल्वेला करता येणे अवघड असते. परंतु ट्रकांपेक्षा अधिक प्रमाणात मालवाहतूक तसेच बसगाड्यांपेक्षा कितीतरी अधिक संख्येने प्रवासी वाहतूक रेल्वेला करता येते. बर्फावरील घसरगाड्या या वर्षातून अधिक काळ बर्फवेष्टित उत्तर गोलार्धातील प्रदेशांतून वाहतूक करीत असतात. नळमार्ग हे वाहतुकीच्या अन्य प्रकारांसारखे स्वतः हालचाल करीत नाहीत. बहुतेक नळमार्ग हे जमिनीवरून बांधण्यात आलेले असतात परंतु काही नळमार्ग हे नद्यांमधून अथवा जलप्रदेशांतून टाकण्यात येतात. या नळमार्गातून मुख्यतः द्रवपदार्थ, वायू (उदा., खनिज तेल, नैसर्गिक वायू इ.) इत्यादींची वाहतूक केली जाते.

एंजिनरहित जमिनीवरील वाहतूक : चालणे हा वाहतुकीचा सर्वांत प्राथमिक प्रकार होय. पाठीवरून वा डोक्यावरून ओझे वाहून नेणे अथवा ओझे (माल) वाहून नेण्याकरिता, प्राण्यांचा वापर करणे, हाही प्राथमिक प्रकार होय. अशा प्रकारची मालवाहतूक करणाऱ्या जनावरांना ‘पॅक ॲनिमल्स’ अथवा ‘बीस्ट्‌स ऑफ बर्डन’ (ओझी वाहून नेणारी जनावरे वा प्राणी) असे संबोधिले जाते. या प्राण्यांमध्ये उंट, गाढवे, हत्ती, घोडे, लामा, बैल इत्यादींचा अंतर्भाव होतो. ज्या भागांत आधुनिक पद्धतीचे रस्ते नसतात, अशा भागांत (उदा., वाळवंटे, दुर्गम पर्वतीय प्रदेश, जंगले इ.) अशा प्राण्यांचा वापर करण्यात येतो.

कित्येक लोक ढकलगाड्या, सायकली, पेडिकॅब यांसारखी स्नायूंचे सामर्थ्य दाखविणारी वाहने वापरताना आढळतात. ढकलगाडीला दोन वा चार चाके असतात सायकलीला दोन चाके असून ती पायंड्याच्या आधाराने फिरविता येतात. यूरोपातील अनेक देशांमधून तसेच आशियाई देशांतून लोकांना मोठ्या प्रमाणावर कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणे शक्य होते. पेडिकॅबला मागील बाजूस दोन चाके असतात तिचा वापर टॅक्सीप्रमाणे आणि कित्येक पौर्वात्य देशांमधून शाळेत मुलांना नेण्या-आणणाऱ्या बसगाडीसारखा करण्यात येतो. बैल वा घोडे यांसारख्या प्राण्यांमार्फत खेचून नेणाऱ्या गाड्या पौर्वात्य व विकसनशील देशांच्या ग्रामीण भागांत सर्रास वापरात असलेल्या आढळतात.

जलवाहतूक ही मुख्यत्वे बोटी वा जहाजे, तसेच तराफे यांवर अवलंबून असते. वल्ह्यांच्या साहाय्याने नद्या, कालवे, सरोवरे यांमधून नावांचा वापर करण्यात येतो. जहाजांचा वापर खासकरून समुद्रातील वाहतुकीसाठी केला जातो. मोठमोठे ओंडके एकत्र बांधून त्यांद्वाराही सामानाची वा प्रवाशांची वाहतूक केली जाते. अशा साधनांना ‘तराफे’ असे संबोधतात.

एंजिनचालित जलवाहतूक : बहुतेक मोठ्या बोटी व जहाजे यांची एंजिनाच्या साहाय्याने वाहतूक करण्यात येते. कित्येक मोठी जहाजे वा बोटी ह्या प्रचंड प्रमाणावर माल सागरांतून वाहून नेण्याचे कार्य करतात. ग्रेट लेकसारख्या मोठ्या सरोवरांतून प्रचंड जहाजे माल वाहून नेत असतात. सर्व साधारणपणे एंजिनचलित जहाजे वा बोटी यांची वाहतूक ही तशी वेगवान नसते. जहाजे वा बोटी यांच्यापेक्षा अधिक वेगाने जलवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांची (जलपर्णी नौका – हायड्रोफॉइल क्राफ्ट व वाततल्पयान -हॉव्हरक्राफ्ट)  अभियंत्यांनी रचना करून त्यांमार्फत प्रवासी अथवा माल यांची वाहतूक वेगने करण्याची कार्यवाही प्रत्यक्षात आणली आहे. मोठी सरोवरे वा नद्या यांमधून वरील वाहनांतून जलवाहतूक सामान्यतः केली जाते [⟶  जलपर्णी नौका वाततल्पयान].

एंजिनरहित जलवाहतूक : एंजिनांचा वापर न करता नौका, तराफे, शिडांच्या बोटी व जहाजे यांमधूनही जलवाहतूक करण्यात येऊन प्रवासी व माल एका ठिकाणाहून इष्ट त्या ठिकाणी पोहोचविले जातात. नौका, तराफे वगैरेंमधून वल्हे मारून वाहतूक करणे शक्य होते, तर वाऱ्याच्या मदतीने शिडांच्या जहाजांमधून प्रवासी व माल यांची वाहतूक केली जाते ताफा व तराफा यांमधून वल्हे, पायंडी, शिडे वा जलप्रवाह यांच्या मदतीने मालाची व प्रवाशांची वाहतूक करता येते. पौर्वात्य देशांत अशा प्रकारच्या वाहनांना ‘सेलबोट’ (शीडजहाज) वा ‘जंक’, तर रो-बोटींना ‘संपान’ अशी संज्ञा आहे. मोठ्या आकाराची जंक वा संपान यांमधून अवजड मालवाहतूक करणे सोईचे होते.

हवाई वाहतूक : एंजिनचालित वायुयानांमधून, म्हणजेच मुख्यत्वे विमानांमधून, हवाई वाहतूक करणे शक्य होते. एंजिनरहित वायुयाने म्हणजे ग्लायडर, उष्ण-वायुप्रणीत बलून यांचा उपयोग व वापर मुख्यतः मनेरंजनात्मक साधने वा क्रीडासाधने म्हणूनच करण्यात येतो.

विमानांमुळे सर्वांत अत्यंत गतिमान (जलद) वाहतूक उपलब्ध होऊ शकते. रॉकेटप्रणीत अवकाशयाने अधिक वेगाने प्रवास करतात. मोठाली विमाने दरताशी सु. ८०० ते १,००० किमी. या वेगाने प्रवास करतात. सांप्रतच्या काळात बहुतेक विमानांना जेट एंजिने असतात. स्वनातीत (सुपरसोनिक) जेट विमाने ध्वनीहून अधिक वेगाने प्रवास (सु. २,४०० किलोमीटर प्रतितास) करतात. विमानांतून सामानाची व मालाची वाहतूक करणे हे अतिशय खर्चिक असते कारण हवाई माल-वाहतुकीचे दर अतिशय महागडे असतात यामुळेच इलेक्ट्रॉनीय उपकरणांसारख्या अतिशय महाग तथापि वजनाने हलक्या वस्तू वा उपकरणे किंवा ताज्या फुलांसारख्या नाशवंत वस्तू विमानाने पाठविणे शक्य होते. हेलिकॉप्टर ही विमानांप्रमाणेच एंजिनप्रचलित असली, तरी त्यांचा आकार विमानांपेक्षा लहान असल्याने त्यांच्यामधून मर्यादित प्रमाणातच प्रवासी वाहतूक करता येते. हवाई वाहतुकीमध्ये यामुळेच त्यांची दुय्यम दर्जाची भूमिका असते. तथापि संचलनामध्ये व काही महत्त्वाच्या कार्यांमध्ये (मदत-कार्य तसेच जंगलांमधील वणवे विझविणे यांसारखी कामे) त्यांची उपयुक्तता अधिक असते.

इतिहास : प्रागैतिहासिक काळात (म्हणजेच इ.स.पू. ३०० वर्षापर्यंत) वाहतुकीचा विकास वा प्रगती अल्पगतीनेच झाली. कारण या कालावधीत लोकांचे व्यवसाय मृगया, मासेमारी व जंगली वनस्पती गोळा करणे, एवढ्यांपुरतेच सीमित होते. त्या काळी लोक पायीच प्रवास करीत असत आपल्याजवळील ओझे, सामान वा आपली मुले पाठीशी वा डोक्यावर बांधून नेत असत. अतिशय जड सामान मोठ्या कळकाला वा वाशाला बांधून ते दोन वा अधिक माणसांकरवी वाहून नेण्यात येई. काही काळाने प्रागैतिहासिक मानवाला वस्तू वा जड सामान ढकलगाडीवरून नेता येईल, हे सुचले व त्याप्रमाणे तो वागू लागला. हे लोक झाडांच्या फांद्या, खांब, कच्चे कातडे यांच्या साहाय्याने अवजड सामान वाहून नेऊ लागले. या ढकलगाड्यांना धावत्ये (रनर) लावून (बसवून) त्यांच्या योगे अधिक वेगाने ढकलगाड्या ओढता वा नेता येणे शक्य होत गेले. बर्फाळ प्रदेशात कमी वजनाच्या परंतु वेगाने धावणाऱ्या ढकलगाड्या बांधून त्यांचा वापर करण्यात येऊ लागला.

सुमारे इ.स.पू. ८००० वर्षाच्या अवधीत, मध्यपूर्वेतील अनेक लोक-समुदायांनी कृषितंत्र आत्मसात केले व अशा लोकांनी कायमस्वरूपी वस्त्या स्थापण्यास प्रारंभ केला. निरनिराळ्या वसाहतींनी पारस्परिक व्यापारवर्धनाची कास धरल्याने वाहतुकीच्या निकडीची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. गाढव तसेच बैल हे माणसाळलेले प्राणी शेतकामासाठी उपयोगी पडत होते, तसेच वापरातही होते त्यांचाही वाहतूक प्रकारासाठी वापर होऊ लागला. इ.स.पू. ५००० ते इ.स.पू. ३५०० वर्षे या कालावधीत ओझे वाहून नेणारे प्राणी (पॅक ॲनिमल किंवा बीस्ट्स ऑफ बर्डन) म्हणून या प्राण्यांचा उपयोग करण्यात येऊ लागला. ढकलगाड्या ओढून नेण्याच्या तसेच जड ओझी वा सामान या प्राण्यांच्या पाठीवरून वाहून नेण्याच्या प्रकारासही याच काळात मोठी चालना मिळाली.

प्रागैतिहासिक काळात, जलवाहतूक करण्यासही लोकांनी आरंभ केल्याचे आढळून आले. बांबू वा लाकडाचे ओंडके यांच्या मदतीने लोकांनी तराफे बांधून पाण्यातून वाहतूक करावयास प्रारंभ केला. प्रागैतिहासिक काळातील लोकांनी यानंतर होड्या, द्रोणी, पडाव, नावा तयार करण्याची कला आत्मसात केली आणि बांबू वा हातवल्हे यांच्या साहाय्याने हे लोक सरोवरे वा मोठे प्रवाह यांमधून वाहतूक करू लागले. समुद्रातून प्रवास करावयाला या नावा वा होड्या तेवढ्या सक्षम नव्हत्या.

इ. स. पू. ३५०० च्या सुमारास मानवाला चाकाचा शोध लागला असावा. हा शोध मेसोपोटेमियात लागल्याचे मानतात. [⟶  चाक]. इ. स. पू. ३२०० च्या सुमारास ईजिप्शियनांनी शिडाच्या गलबतांचा शोध लावला. पुढील काही शतकांच्या कालावधीत चाके असलेली वाहने तसेच शिडांची गलबते यांच्या योगे वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आली.

मेसोपोटेमिया व ईजिप्त यांमध्ये इ. स. पू. ३५०० ते ३००० वर्षांच्या कालावधीत जगातील अनेक प्राचीन मोठ्या संस्कृत्यांचा उदय झाल्याचे दिसून येते. मेसोपोटेमिया व ईजिप्त या दोन केंद्रांपासून या संस्कृत्यांचा प्रभाव व प्रसार हळूहळू पश्चिमेकडे भूमध्य समुद्राच्या किनारी भागांनी होत गेला. संस्कृतिप्रसाराच्या कार्यात शिडांच्या गलबतांनी मोठी कामगिरी बजावली. भूमध्य समुद्राच्या किनारी भागातील प्राचीन संस्कृत्यांचा समृद्धिकाळ इ. स. पू. ३००० ते इ. स. ५०० वर्षांच्या सुमारास घडून आल्याचे आढळते. याच काळात शिडांच्या गलबतांमध्ये त्याचप्रमाणे चाकांच्या वाहनांमध्ये घडत गेलेल्या सुधारणांच्या योगे वाहतूक विकास जलद प्रमाणात होत गेला. फिनिशिनयांनी इ. स. पू. १००० च्या सुमारास व्यापारी जहाजांचा ताफा विकसित केला. हे लोक भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्याच्या भागात वस्ती करून होते. फिनिशियनांनी मृत्पात्रांपासून गाईगुरांपर्यंत भूमध्य समुद्राच्या सर्व बंदरांमधून स्पेनपर्यंत व्यापारासाठी शिडांच्या जहाजांमधून वाहतूक केली. अर्थातच हा सागरी जलप्रवास नौकावहन उपकरणांच्या शोधाअभावी व दुर्लभतेमुळे अतिशय संथ व मंदगतीनेच विकसित होत गेल्याचे दिसते.

चाकाच्या वाहनांचा विकास मेसोपोटेमियात इ. स. पू. ३५०० च्या सुमारास झाला. हे तंत्र येथूनच हळूहळू प्रसृत होत गेले. भारतात ते इ. स. पू. २५०० च्या सुमारास, युरोपमध्ये इ. स. पू. १४०० च्या सुमारास व चीनमध्ये इ. स. पू. १३०० च्या सुमारास पोहोचले.

पहिली चाकांची वाहने चार-चाकी असून ती बैलांकरवी वा इ. स. पू. ३००० च्या सुमारास गर्दभसदृश प्राण्यांकडून ओढली जात असत. प्रथमतः मेसोपोटेमियनांनी अशा प्रकारच्या वाहनांचा वापर शववाहिका म्हणून केला. इ. स. पू. ३००० नंतर अशी वाहने मेसोपोटेमियन सैनिक, त्याचप्रमाणे वाळू, धान्य आणि अशाच प्रकारचे सामान वाहून नेण्याकरिता वापरण्यात येऊ लागली. इ. स. पू. २००० पर्यंत चाके ही तीन लाकडी फळ्यांची बनविण्यात येत असत. नंतर इ. स. पू. २००० – इ. स. पू. १५०० च्या दरम्यान आरे असलेली चाके प्रथमच वापरात आली. या प्रकारच्या चाकांमध्ये एक पाळ (रिम), तुबा (हब) व आरे, असे तीन भाग असत. आऱ्यांच्या चाकांमुळे भरीव लाकडी चाकांपेक्षा अधिक सुखावह व जलद वाहतूक होऊ लागली. आरे असलेली चाके प्रथम रथांकरिता वापरली गेली असावीत. इ. स. पू. २००० च्या सुमारास रथ ओढण्याकरिता प्रथमच घोड्यांचा वापर करण्यात आला. इ. स. पू. ४०० च्या सुमारास ग्रीकांनी सागरी व्यापाराचा विस्तार केला. त्याचप्रमाणे एकाऐवजी दोन डोलकाठ्या व चार शिडांची जहाजे वापरण्यास प्रारंभ केला. ग्रीक व्यापारी जहाजांच्या योगे ग्रीक संस्कृतीचा पश्चिम दिशेकडे विस्तार होण्यास मोठीच मदत झाली. संस्कृतीपाठोपाठ जहाजवाहतूक व व्यापार या दोहोंत वाढ होणे अपरिहार्य होते.

इ. स. पू. १०० पासून इ. स. ४०० वर्षांच्या कालावधीत रोमन साम्राज्याची कारकीर्द लक्षणीय असल्याचे प्रत्ययास येते. रोमन साम्राज्याच्या उत्कर्षकाळी, भूमध्य समुद्राच्या किनारी भागातील सर्व प्रदेश रोमन साम्राज्यात अंतर्भूत झाले होते, उत्तरेस ब्रिटिश बेटांपासून पूर्वेकडील इराणच्या आखातापर्यंत रोमन साम्राज्या पसरले होते. एवढ्या विस्तीर्ण साम्राज्यातील भूप्रदेशाला सुसूत्रपणे सांभाळण्यासाठी रोमन शास्त्यांनी अतिशय प्रगत अशी रस्ते-यंत्रणा उभारली. अर्थातच रोमनांपूर्वी रस्त्यांचे बांधकाम चालू होते. इ. स. पू. २००० च्या सुमारास चीनमध्ये मोठी शहरे जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम करण्या येत होते इराणी राज्यकर्त्यांनी इ. स. पू. ५०० च्या सुमारास असेच रस्ते तयार करण्याचे काम चालू केले होते. तथापि अशा प्रकारचे आंतर-नगरीय रस्ते म्हणजे धूळ- पायवाटेपेक्षा जरा बरी अवस्था असलेले, असे ते रस्ते होते. फरसबंदी रस्त्यांचे जाळे प्रथम रोमनांनीच निर्माण केले त्यांची रुंदी ५ ते ६ मी. व जाडी १ ते २ मी. एवढी होती. आपले सैन्यदल तसेच युद्धसामग्री यांची ने-आण करण्याच्या उद्देशानेच रोमनांनी हे रस्ते बांधले होते. त्याचबरोबर रोम व इतर प्रांत यांमधील संदेशव्यवस्था (संपर्कव्यवस्था) अबाधित राहण्याकरिताही (राखण्याकरिताही) या रस्त्यांचा विहित उपयोग केला जात असे. इ. स. २०० च्या सुमारास रोम व रोमन साम्राज्यांतर्गत बहुते सर्व प्रदेश ८०,००० किमी. पेक्षा अधिक लांबीच्या फरसबंदी रस्त्यांनी जोडण्यात आले होते. इ. स. ४०० च्या सुमारास जर्मन टोळ्यांनी पश्चिम यूरोपमधील बहुतेक रोमन प्रदेश बळकाविले. पुढेपुढे रोमन रस्त्यांची अवस्था अतिशय खराब होत गेली. रस्त्यांप्रमाणेच सागरी वाहतुकीत रोमन मालवाहू जहाजांनी अग्रेसरत्व प्रस्थापित केले होते [⟶  रस्ते].

मध्ययुगामध्ये (इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंतचा कालावधी) भूपृष्ठीय व सागरी अशा दोन्ही वाहतूक प्रकारांत मोठ्या सुधारणा घडून आल्याचे आढळते. त्या म्हणजे घोड्याला बांधावयाचा गळपट्टा (हॉर्स कॉलर), घोड्याला मारावयाचे लोखंडी नाल (आयर्न हॉर्स-शू) आणि घोड्याच्या पाठीवर बांधलेले ओढण (व्हिफल ट्री), ह्या होत. घोड्याच्या गळपट्ट्याचा शोध इ. स. ८०० च्या सुमारास, लोखंडी नालाचा युरोपमध्ये इ. स. ९०० च्या सुमारास, तर घोड्याच्या ओढण्याचा इ. स. १००० च्या सुमारास लागला. गळपट्ट्यामुळे ओझ्याचा ताण घोड्याच्या मानेवरून त्याच्या खांद्यांवर पडला. त्यामुळे घोडे चौपट ते पाचपट अधिक ओझे ओढून नेऊ लागले. नालाशिवाय घोड्यांच्या खुरांना दूरवरच्या प्रवासात इजा होत असे. लोखंडी नालाच्या योगे घोड्यांच्या खुरांना संरक्षण लाभले व परिणामी घोड्यांना अधिक दूरवर व जलद गतीने अंतर कापणे शक्य झाले. ओढण्यामुळे वाहनांना एकापेक्षा अधिक घोडे जुंपता येऊ लागले, परिणामी वाहनांची गती वाढली, त्याचबरोबर घोड्यांनाही अधिक ओझे वाहून नेणे सोयीचे झाले. या तिन्ही शोधांमुळे जमिनीवरील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला घोड्यांच्या वाहनांमुळे प्रवासी वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होत गेली.

मध्ययुगात जहाजांचा अभिकल्प व त्यांची बांधणी अशा दोहोंतही परिणामकारक सुधारणा घडून आल्या. जहाजांच्या मागील बाजूस (स्टर्न –म्हणजेच वराम – भागात) असलेल्या वल्ह्यांऐवजी सुकाणूचा वापर करणारी जहाजे यूरोपात १३०० च्या सुमारास प्रचारात आली. १४०० च्या सुमारास जहाजांच्या आकारात पूर्वीपेक्षा चौपटीने वाढ झाली तसेच त्यांमधून एक सुकाणू, तीन डोलकाठ्या व तीन शिडे वापरण्यात येऊ लागली. याच काळात नौकांच्या मार्गनिर्देशनाची उपकरणेही (नॅव्हिगेशनल इन्स्ट्रूमेंट्स, उदा., खलाशांचा वा नावाड्यांचा दिक्‌सूचक-मरीनर्स कंपास) विकसित झाली [⟶  दिक्‌सूचक].

चौदाव्या व पंधराव्या शतकांत क्रिस्टोफर कोलंबस, फर्डिनंड मॅगेलन, सर फ्रॅन्सिस ड्रेक इ. समन्वेषकांनी धाडसी सफरी करून नवनवे प्रदेश शोधून काढले. जहाजबांधणी उद्योगात जरी सुधारणा होत गेल्या, तरी सागरी प्रवास व वाहतूक यांचे प्रमाण मंदच राहिले. सोळाव्या शतकापासून सागरी व्यापार-वाहतुकीत जलद वाढ होत गेली. मालवाहतुकीसाठी मोठ्या आकारमानाची जहाजे बांधण्यात येऊ लागली साहजिकच मोठ्या जहाजांना व गलबतांना अधिक शिडेही लावावी लागत होती. अठराव्या शतकाच्या मध्यास जलदगती जहाजांना सु. ३५ शिडे असत आणि त्यांचा वेगही सु. २० नाविक मैल (नॉट) एवढा असे.

देशांतर्गत वाहतूक : सोळाव्या शतकाच्या सुमारास मालाच्या अंतर्गत वाहतुकीसाठी घोडागाड्या वापरण्यात येत असल्या, तरी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लांब अंतराच्या प्रवासाकरिता त्यांचे वापर-प्रमाण अत्यल्प असे. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत, घोड्यांनी ओढली वा खेचली जाणारी जहाजे (नौका व पडाव) हीच काय ती अंतर्गत जलवाहतुकीची प्रमुख साधने समजण्यात येत. नदीच्या व कालव्याच्या काठाने घोडे चालत राहात आणि त्यांच्या गळ्यातील दोरखंड पाण्यातील जहाजांना व पडावांना बांधलेला असल्याने घोड्यांच्या हालचालींबरोबर पाण्यातील जहाजांची व पडावांचीही वाहतूक चालू राहत असे.

मध्ययुगाच्या अंतिम चतुर्थकापासून अठराव्या शतकारंभापर्यंतच्या काळात यूरोपमध्ये शेकडो कालवे बांधण्यात आले. ग्रेट ब्रिटनमध्ये बांधण्यात आलेल्या काही प्रारंभीच्या कालव्यांमधून खाणींपासून औद्योगिक शहरांपर्यंत कोळशाची स्वस्त दराने वाहतूक करण्यात येऊ लागली. १७६२ मध्ये सुरू झालेल्या ब्रिजवॉटर कालव्यामुळे वोर्स्ली येथील कोळसाखाणी मँचेस्टरमधील कारखान्यांशी जोडणे सुलभ झाले. कालवा -वाहतुकीमुळे औद्योगिक क्रांतीचे यश अधिकच विस्तारत गेले [⟶  कालवे व देशांतर्गत जलमार्ग]. १८४० पासून सुरू झालेल्या रेल्वेवाहतुकीमुळे कालवे-वाहतुकीवर निश्चितच गंभीर परिणाम झाला कारण रेल्वे अधिक जलद व सुदूर अंतरापर्यंत वाहतूक करणारे साधन बनले.

फ्रान्स व ग्रेट ब्रिटन ह्या दोन देशांत अठराव्या शतकात रोमनांनंतर प्रथमच फरसबंदीचे उत्तम दर्जाचे रस्ते बांधण्यास येऊ लागले. १८५० च्या सुमारास अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत ‘नॅशनल रोड’ नावाचा पहिला मोठा राजमार्ग (महामार्ग) बांधण्यात आला. उत्तर मध्ययुगापासून प्रचलित असलेली घोडागाडी (वॅगन) व कोच ही वाहने वापरात होती पॅरिसमध्ये १६६० च्या सुमारास पहिली कोच-वाहतूक सुरू झाली. शहरांतून धावणाऱ्या सांप्रतच्या बसगाड्यांचे हे आद्यरूप होय. १६७० पासून लंडन (ग्रेट ब्रिटन) ते एडिंवरो (स्कॉटलंड) या सु. ६३० किमी. दीर्घ अंतराच्या प्रवासी वाहतुकीचा प्रारंभ कोचसेवेने झाला. या गाड्यांना ‘स्टेजकोच’ असे म्हणावयाचे कारण म्हणजे, या गाड्या ठराविक ठिकाणी (स्टेज) घोडे बदलण्याकरिता थांबविण्यात येत असत.

वाफेचे युग : चाक आणि शिडांचे जहाज यांच्या शोधांनंतर वाफेच्या एंजिनांचा लागलेला शोध, ही वाहतूकक्षेत्रातील सर्वांत मोठी क्रांतिकारक घटना समजली जाते. १७०० च्या पुढे ब्रिटिश शास्त्रज्ञांनी वाफेचे एंजिन विकसित केले. निकोलस कूनो या फ्रेंच लष्करी कॅप्टनने १७६९ मध्ये वाफेच्या एंजिनावर धावणारे पहिले वाहन तयार केले. १८०० च्या पुढील काळात वाफेवर धावणाऱ्या प्रवासीवाहक गाड्या ग्रेट ब्रिटनमध्ये बनविण्यात आल्या. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १८०७ च्या सुमारास पहिले बाष्पचालित प्रवासी जहाज कार्यान्वित झाले. १८२५ साली ग्रेट ब्रिटनमध्ये वाफेच्या एंजिनाची आगगाडी धावू लागली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बाष्पचलित जहाजांनी शिडांच्या जहाजांची जागा घेतल्याचे आढळते. अर्थातच वाफेच्या एंजिनाच्या साहाय्याने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे वाहतूकक्षेत्रात यथार्थाने क्रांती झाल्याचे मानले जाते. या आगगाड्यांचा वेगही दर ताशी १०० वा त्यांहूनही अधिक किमी. एवढा होता. आगगाड्यांमधून पूर्वीपेक्षा शंभराच्या पटीहून अधिक वजनाचे अवजड सामान वाहून नेणे शक्य झाले. १९०० च्या सुमारास यूरोप, उत्तर अमेरिका, यांमधून तसेच आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, द. अमेरिका या खंडांमधील अनेक प्रदेशांतून कित्येक किमी. लांबीचे लोहमार्ग टाकण्यात येऊन रेल्वेवाहतूक चालू करण्यात आली. जसजसे जहाजवाहतूक व रेल्वे वाहतूक यांचे प्रमाण वाढत गेले, तसतशी प्रवासी व माल यांच्या वाहतूकदरांत साहजिकच घट होत गेली. त्यांयोगे पर्यटन, व्यापार आणि शहरे यांमध्ये वाढ होत गेली. जलद हालचाली, जलद व गतिमान प्रवास व गतिमान बदल यांची लोकांनाही सवय होऊ लागली. जीवनाच्या जलद गतिमानतेमुळे अधिक जलद व गतिमान वाहतुकीची मागणी निर्माण होऊ लागली [⟶  जलवाहतूक रेल्वे].

अर्वाचीन वाहतुकीचा प्रारंभ : १८८० च्या पुढील काळात विजेवर धावणाऱ्या आगगाड्या व ट्रामगाड्या यूरोपीय देश आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांमध्ये प्रथमच वापरात आल्या. १८९० च्या पुढे जर्मन यांत्रिक अभियंते रूडोल्फ डीझेल (१८५८-१९१३) यांनी संपीडन प्रज्वलन एंजिनाचा शोध लावला त्यांचेच नाव नंतर या एंजिनाला देण्यात आले. बहुतेक रेल्वेगाड्यांना तसेच अनेक जहाजांवर डीझेल एंजिने बसविण्यात आली. यामुळेही वाहतूकक्षेत्रात मोठी सुधारणा झाली तथापि पेट्रोल एंजिनाच्या शोधामुळे वाहतूकक्षेत्रात अतिशय दूरगामी परिणाम व बदल घडून आले. १८०० मध्ये यूरोप खंडात सायकलचा शोध लागून तिचा विकास करण्याचे प्रयत्न चालू होते. १८८० च्या पुढील काळात जर्मन संशोधकांनी पेट्रोल एंजिन पूर्णपणे विकसित केले आणि अशा प्रकारची एंजिने त्यांनी सायकली व तिचाकी गाड्या यांना बसविली. १८९० च्या पुढील काळात फ्रेंच अभियंत्यांनी मोटारींना प्रथमच पेट्रोल एंजिने बसविली याच सुमारास जर्मनीमध्ये पेट्रोल एंजिनांच्या बसगाड्या व मालवाहूगाड्या (मालट्रक) वाहतूक करू लागल्या. १९०३ मध्ये ऑर्व्हिल व विल्बर राइट या दोन अमेरिकन बंधूंनी स्वतः बनविलेल्या एका लहानशा विमानाला पेट्रोल एंजिन बसविले. मानवाला आकाशात घेऊन जाणारे हे पहिलेच विमान होय.

अनेक औद्योगिक देशांत १९२० च्या पुढील काळात मोटारी हे प्रवासी वाहतुकीचे महत्त्वाचे साधन बनले. मोटारमालकांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतशी अधिक लांबीच्या व अधिक चांगल्या रस्त्यांची मागणीही वाढली. १९०० ते ११९३० या कालावधीत अनेक नवीन रस्ते बांधण्यात आले.

यूरोपमध्ये व्यापारी तत्त्वावर विमानसेवा प्रथम १९१९ मध्ये सुरू झाली. १९३० – ४० या दशकात सबंध जगात प्रतिवर्षी सु. ३५ लक्ष प्रवाशांची विमानवाहतूक होत होती. या विमानांना परिचालक (पंखे) व पेट्रोल-एंजिने होती. याच दशकात जर्मन अभियंत्यांनी प्रथमच विमानांना जेट एंजिने बसवून हवाईवाहतूक कार्यान्वित केली. १९५० च्या पुढील काळात जेट विमानांतून प्रवासीवाहतूक व्यापारी तत्त्वावर सुरू झाली.

जगभराच्या आढाव्यावरून असे दिसते की, १९०० च्या पुढील काळात वाहतूकक्षेत्रात घडून आलेल्या प्रगतीच्या अनेक टप्प्यामुळे लोकांच्या जीवनातही प्रचंड बदल घडून आले. व्यापारी स्वरूपातील प्रवासी हवाईवाहतुकीच्या योगे सुदूर अंतरावरचा प्रवास म्हणजे एक प्रकारचा नित्यक्रमच बनला आहे. सागरी जहाजवाहतूक तसेच प्रशीतन प्रक्रिया यांमधील सुधारणांमुळे काही विशिष्ट प्रदेशांतच मिळणारा शेतमाल जगात सर्वत्र त्वरित उपलब्ध होणे शक्य झाले आहे.

मोटार वाहतुकीतील सुधारणांच्या योगे महानगरांभोवती मोठी उपनगरे वसत गेली व वाढतही राहिली. दुकानात जाऊन माल खरेदी करणे, कामावर जाणे व घरी परतणे या कारणांसाठी मोटार हे वाहतूक-साधन अतिशय उपयुक्त ठरू लागले [⟶ मोटार वाहतूक].

वाहतूक : सद्यस्थिती : एंजिनप्रचालित वाहतूक विकसित होईपर्यंतच्या काळात, बहुतेक वाहतूक ही सामानाची ने-आण करण्यासाठीच केली जात असे कारण प्रवासी वाहतूक विशेष रूढ झाली नव्हती. एंजिनप्रचालित वाहतुकीच्या विकासाबरोबर या परिस्थितीत जलद सुधारणा होत गेली. सांप्रत औद्योगिक राष्ट्रांमध्ये प्रवासी वाहतूक ही नित्यजीवनातील एक महत्त्वाची बाब गणली जाते. या राष्ट्रांमधील कामगारांना पूर्वीच्या कामगारांपेक्षा कामाच्या स्थानापासून बऱ्याच दूर अंतरावर राहावे लागत असल्यामुळे प्रतिदिनी कामावर जाण्यासाठी त्यांना भरंवशाची व गतिमान वाहतूक सेवा अत्यावश्यक ठरली आहे. मुलांना शाळेस जाण्याकरिता व घरी येण्याकरिता, कुटुंबातील कर्त्या स्त्री-पुरुषांना कामावर जाण्याकरिता व परत घरी येण्याकरिता, कुटुंबातील विविध व्यक्तींना दुकानांत जाऊन विविध वस्तूंच्या खरेदीसाठी, अनेक लोकांना लांबच्या प्रवासाकरिता अशा अनेकविध कारणांसाठी वाहतूक सुविधेची आवश्यकता भासते. कित्येक औद्योगिक राष्ट्रांमध्ये मालवाहतुकीवर होणाऱ्या  खर्चापेक्षा कितीतरी अधिक खर्च विविध प्रकारच्या प्रवासी वाहतूकसेवेवर होत असलेला आढळून येतो.

प्रवासी वाहतूक : खाजगी व सरकारी (सार्वजनिक) असे प्रवासी वाहतुकीचे दोन प्रकार आहेत. खाजगी प्रवासी वाहतुकीमध्ये लोक आपल्या स्वतःच्या वाहनांचा वापर करतात. सरकारी प्रवासी वाहतूकसेवेमध्ये, लोक खाजगी कंपन्या वा सरकार यांच्या मालकीच्या वाहनांमधून भाडे देऊन प्रवास करतात.

खाजगी प्रवासी वाहतूक ही औद्योगिक देशांमध्ये, मुख्यतः मोटारगाड्या (टॅक्सी), सायकलरिक्षा, मोटारसायकली, खाजगी विमाने यांमार्फत केली जाते अधिककरून मोटारींचा वापर होत असतो. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत लोक प्रकर्षाने मोटरींमधून प्रवास करीत असतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, न्यूझीलंड, प. यूरोपीय देश यांमध्ये मोटारगाड्या हे प्रवासी वाहतुकीचे प्रधान साधन समजले जाते. वरील देशांत आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत सबंध जगातील मोटारींच्या संख्येपैकी सु. ७७ टक्के मोटारी आहेत. एकट्या अमेरिकेत मोटारधारकांचे प्रमाण सु. ३५ टक्के आहे. अर्थातच वरील सर्व देशांमध्ये अतिशय उत्तम रस्तेयंत्रणा आहे. सबंध जगात सु. ११० लक्ष किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी सु. ३३ टक्के रस्ते एकट्या अमेरिकेत आहेत. विकसनशील राष्ट्रांतही शहरांत राहणाऱ्या व स्वतःच्या मालकीच्या मोटारीने प्रवास वा वाहतूक करणाऱ्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळते.

सार्वजनिक (सरकारी) वाहतूक : सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणारी सुसंघटित प्रवासी वाहतूकसेवा म्हणजे सार्वजनिक (सरकारी) वाहतूकसेवा होय. (१) शहरी वा नागरी (२) शहरांतर्गत (आंतरनगरीय) व (३) समुद्रपार, असे सरकारी वाहतूकसेवेचे तीन प्रकार आहेत.

(१) शहरी वा नागरी वाहतूक : बहुतेक मोठ्या नागरी क्षेत्रांमध्ये सामान्यजनांकरिता सरकारी वा सार्वजनिक वाहतूकसेवा उपलब्ध करण्यात येते. शहरांपासून उपनगरांकडे केल्या जाणाऱ्या वाहतूक सेवेला ‘कॉम्यूटर सर्व्हिस’ असेही म्हटले जाते. जगातील बहुतेक शहरांमध्ये बसगाड्या हाच काय तो सरकारी वाहतुकीचा कणा मानला जातो. याशिवाय अनेक मोठ्या शहरांमधून आगगाड्याचे (रेल्वेचे) जाळे पसरलेले असते. जगातील सु. ९० मोठ्या शहरांमध्ये रेल्वेची दुहेरी वाहतूकयंत्रणा (भूपृष्ठावरील व भुयारी) उपलब्ध आहे. काही मोठ्या शहरांमधून उंचावरून वाहतूक करणाऱ्या रेल्वे असून त्यांचा मार्ग (रूळमार्ग) हा मोटार-रस्त्यापेक्षा उंच स्थानावरून नेलेला असतो. अनेक मोठ्या शहरांमधून सार्वजनिक वाहतूकसेवेमध्ये कमी वजनाच्या डब्यांची व रूळांची ‘हलकी रेल्वेवाहतूक’ (लाइट रेल व्हीइकल्स) अंतर्भूत केलेली असते.

विजेवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना ट्रॉली तारांमधून (रेल्वेवरून जाणाऱ्या) वीज पुरविली जाते. ट्रामगाड्या ह्याही हलक्या रेल्वे वाहनांचाच (लाइट रेल व्हीइकल्स) एक प्रकार आहे. एकोणिसाव्या शतकान्ती व विसाव्या शतकारंभी कित्येक शहरांतून ट्रामगाड्या म्हणजे सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा एक अविभाज्य भाग बनला होता. परंतु ह्या ट्रामगाड्यांचे रूळमार्ग हे रस्त्यांमधून जाणारे असल्याने तसेच मोटारींच्या वाढत्या वाहतुकीशी त्यांचा मेळ बसणे दुष्कर होऊ लागल्याने, त्यांची जागा वाढत्या बसगाड्यांच्या संख्येने घेतली.

सांप्रत विजेवर धावणाऱ्या आगगाड्या भुयारी लोहमार्गावरून, रस्त्यांपेक्षा उंचावर बांधलेल्या लोहमार्गांवरून अथवा मोटार रस्त्यांना समांतर अशा लोहमार्गांवरून धावत असतात. काही रेल्वेगाड्यांचे चालकाशिवाय केवळ संगणकांच्या साहाय्याने चलनवलनाचे नियंत्रण करण्यात येते. विजेवर धावणाऱ्या वाहनांना रबरी टायरची चाके लावलेली असल्याने या रेल्वेगाड्या अधिक सुलभतेने व ध्वनिरहित वाहूतक करू शकतात. मोठी शहरे व त्यांची उपनगरे ही लोकल गाड्यांनी (कॉम्यूटर ट्रेन्स) जोडण्यात येऊन उपनगरी प्रवाशांची मोठी सोय पाहिली जाते. कारण कामाच्या कचेऱ्या, कार्यालये, कारखाने इ. कार्यस्थाने मोठ्या शहरांमध्ये असल्याने तेथे उपनगरांतून लोकांना जाण्यासाठी लोकलगाड्या हे फार सोईचे वाहतूक साधन बनले आहे. [⟶ नागरी वाहतूक].

(२) आंतरनगरीय वाहतूकसेवा (इंटरसिटी सर्व्हिस) : ही वाहतूक सेवा मुख्यतः विमाने, बसगाड्या व रेल्वे यांमार्फत पुरविली जाते. नद्यांतून वाहतूक करणाऱ्या जहाजांचा व फेरी बोटींचा यामधील हिस्सा अत्यल्प आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया यांसारख्या उद्योगदृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये आंतरनगरीय सुदूर अंतरावरील वाहतूकसेवेत विमानांचा वाढता वाटा असल्याचे आढळते. कमी अंतरावरील आंतरनगरीय वाहतूकसेवा अधिककरून खाजगी मोटारगाड्या, बसगाड्या व रेल्वे यांच्यामार्फत केली जाते. चीन, भारत यांसारख्या विकसनशील राष्ट्रांत तसेच आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांत रेल्वे व बसगाड्या ह्याच काय त्या प्रवाशांच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर व वाहून नेण्याची मोठी क्षमता असलेल्या अशा ठरल्या आहेत. बहुतेक विकसनशील राष्ट्रांत रेल्वे व बसगाड्या आंतरनगरीय वाहतुकीच्या दृष्टीने विचार करता अधिक लोकप्रिय व सोयीस्कर मानल्या जाऊ लागल्या आहेत. अनेक पश्चिमी यूरोपीय राष्ट्रे व जपान यांमध्ये वेगवान (जलदगती) अशा प्रवासी रेल्वेगाड्या वापरात आहेत. अतिवेगवान आगगाड्या ह्या प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात विमानांबरोबरही स्पर्धा करीत असल्याचे आढळून आले आहे.

(३) समुद्रपार वाहतूकसेवा: १९३० पासून पुढील काळात समुद्रपार हवाई वाहतूकसेवा सुरू झाली. तथापि विमानांमध्ये पुन्हा इंधन घालण्याकरिता या विमानांना वारंवार मध्येच थांबावे लागत असे. १९५५–६० पर्यंत लोकांना समुद्रपार प्रवास जहाजांतूनच पुरा करावा लागे. अर्थातच जहाजवाहतुकीमध्ये अधिक वेळ जात असे. उदा., अटलांटिक महासागर पार करावयास या जहाजांना चार दिवस वा त्यांहूनही अधिक काळ लागे. १९४० च्या पुढे कोठेही न थांबता काही तासांतच महासागर पार करून जाणाऱ्या विमानांचे युग प्रथमच सुरू झाले. या प्रकारच्या विमान वाहतुकीमुळे सागरपार प्रवासातही वाढ होत गेली. १९५० पासून पुढील काळात महासागर ओलांडणाऱ्या जेट विमानांची वाहतूक प्रथमच चालू झाली. परिणामी समुद्रपार हवाई प्रवासी वाहतूक करणाऱ्याच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. असे असले, तरी सागरगामी जहाजांतून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. ग्रेट ब्रिटनच्या ‘क्वीन एलिझाबेथ २’ या सागरगामी जहाजातून विविध पर्यटक कॅरिबियन तसेच भूमध्य समुद्रकाठच्या ऊबदार प्रदेशांत सुटी घालविण्यासाठी जात असतात. १९७६ मध्ये ‘काँकर्ड’ ह्या पहिल्या स्वनातीत जेट विमानाने यूरोप व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांमध्ये हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. काँकर्ड विमान लंडन वा पॅरिस ते अमेरिका हे सु. ५,६३० किमी. अंतर अटलांटिक महासागर ओलांडून सु. चार तासांत पार करते. तथापि स्वनातीत जेट विमान प्रवास हा निश्चितच खर्चिक व महाग आहे.

मालवाहतूक: पेट्रोजन्य पदार्थ व नैसर्गिक वायू यांची वाहतूक करण्यासाठी तेलनळ हे सर्वांत सोयीस्कर व स्वस्त पडतात. सामान्य मालाच्या वाहतुकीकरिता जलमार्ग हा वाहतूक प्रकार सर्वांत स्वस्त पडतो मालाची वाहतूक रेल्वेने करावयाची झाल्यास जलवाहतुकीच्या तिप्पट, ट्रकवाहतुकीस दसपट, तर विमानवाहतुकीला ४० पट खर्च येतो.

देशांतर्गत मालवाहतूक: देशांतर्गत मालाची वाहतूक विमाने, नौका व पडाव, नळमार्ग, आगगाड्या, जहाजे व ट्रक यांमार्फत केली जाते. कोळशासारख्या अवजड मालाची ने आण करण्यास रेल्वे हे अतिशय कार्यक्षम वाहतूक साधन मानले जाते. बंदरे व कारखाने यांच्याकडे खाणींपासून खनिज द्रव्याची वाहतूक करावयास रेल्वे अतिशय उपयुक्त ठरते त्याप्रमाणे रेल्वेद्वारा कोळसा विद्युत्निर्मितिगृहांकडे तेल परिष्करण केंद्रांपासून खनिज तेल व तज्जन्य पदार्थ यांची वाहतूक वितरण केंद्रांकडे बहुतेक सर्व वस्तूंची ने आण रेल्वेमुळे सुकर होते. ‘फ्रेटलायनर कंटेनर ट्रेन’ या विशेष प्रकारच्या रेल्वेमधून यूरोपीय देशांतून बहुतेक सर्व प्रकारच्या मालाची ने-आण करण्यात येते.

एखाद्या विशिष्ट वस्तूची मालपेटी इष्ट त्या स्थळी पाठविली जाण्यासाठी एकाच प्रकारच्या वाहतुकीचा अवलंब न करता अन्य वाहतूक प्रकारांचाही वापर करण्यात येतो. उदा., कित्येक वस्तूंच्या पेट्या खरेदीदारापर्यंत पोहचविण्यासाठी आगगाडी नाव पडाव, किंवा ट्रक या वाहतूक साधनांचा अवलंब करण्यात येतो. एकापेक्षा अधिक वाहतूक साधनांचा अवलंब करण्याच्या या पद्धतीला ‘आंतरप्रकारी वाहतूक’ (इंटर-मोडल ट्रॅन्स्पोर्ट) असे म्हणतात.

‘आंतरप्रकारी वाहतुकी’ चा ‘कंटेनरायझेशन’ (प्रमाणित पेट्यांत−कंटेनर्स−बंदिस्त केलेला, भरलेला माल वाहून नेणे) हा वाहतूक प्रकार १९५० पासून पुढे अवलंबिला जाऊ लागला. विशिष्ट माल हा मोठ्या प्रमाणित पेट्यांमध्ये भरण्यात येतो. या पेट्यांना ‘कंटेनर्स’ अशी संज्ञा आहे. या बंदिस्त पेट्या वाहून नेण्यासाठी ट्रक-अनुवाहन (ट्रक-ट्रेलर) व रेल्वे वाघिण्या ह्यांचा वापर करण्यात येतो. या प्रकारच्या पेट्या वाहून नेण्यासाठी खास कोठड्यांची पेटी जहाजे (सेल्यूलर पेटी-जहाजे) बांधण्यात येऊ लागली. प्रमाणित पेटीवाहतुकीच्या योगे जहाजवाहतुकीच्या खर्चात कपात (घट), मालाची जलद पोच (पाठवणी), तूटफुटीमुळे होणाऱ्या नुकसानीत वा तोट्यात घट यांसारखे फायदे संभवतात. अशा प्रकारची वाहतूकसेवा देशांतर्गत मालवाहतुकी ऐवजी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अधिककरून अवलंबिली जाते.

आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीमध्ये मुख्यतः जहाजांचा अवलंब करण्यात येते. सध्याची मोठी व्यापारी जहाजे मोठ्या आकाराच्या प्रमाणित पेट्या विशिष्ट प्रकारचा माल (उदा., पेट्रोलियम व तज्जन्य पदार्थ, धान्य, लोहधातुक इ.) वाहून नेण्यासाठी वापरताना आढळतात. या प्रकारच्या मालाची बंदरांवरील धक्क्यांमधून जहाजांवर तसेच जहाजांवरून बंदरांवर चढवणी-उतरवणी करण्यासाठी विशेष प्रकारच्या बंदरसुविधा असणे जरुरीचे असते. मोठ्या बंदरांमध्ये प्रमाणित पेट्यांची हाताळणी करण्याकरिता विशेष प्रकारच्या सुविधा (उदा., प्रचंड आकाराच्या याऱ्या, प्रचंड गुदामे इ.) उपलब्ध केल्या जातात. काही मोठ्या बंदरांमध्ये पेट्रोलियम व तज्जन्य पदार्थ यांची हाताळणी (माल बंदरावर उतरविणे या बंदरांतून जहाजांवर चढविणे) करण्याकरिता विशेष सुविधा निर्माण केलेल्या असतात. अशा प्रकारचे तेल टैंकर सुयोग्य प्रकारे हाताळण्यासाठी खोल बंदरांची निर्मिती केली जाते. हे तेल टँकर बंदरांच्या अंतर्भागात धक्क्यापर्यंत नेण्याची सुविधा केलेली असते. या टँकरमधील तेल बंदरांमधील टाक्यांमध्ये खेचून घेण्यासाठी तसेच टँकरमध्ये चढविण्यासाठी मोठ्या पंपांची उभारणी करण्यात येते. आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या मालाची पोच वा पाठवणी करण्यासाठी सागरमार्ग, रस्ते, लोहमार्ग, नळमार्ग, अंतर्गत जलमार्ग, हवाईमार्ग या माध्यमांचा वापर केला जातो.

वाहतूक उद्योग: वाहतूक उद्योग हा सबंध जगातील अग्रेसर उद्योगांपैकी एक समजण्यात येतो. जगातील अनेक प्रचंड औद्योगिक कंपन्यांना वाहतूक सामग्री (उपकरणे) त्याचप्रमाणे वाहतुकीस लागणारी सर्व प्रकारची इंधने विकून बहुतेक उत्पन्न मिळू शकते. वाहतूक उद्योगामध्ये सबंध जगात मिळून लक्षावधी माणसे गुंतलेली आढळतात.

वाहतूक उद्योगाचे (१) वाहतुकीच्या सामग्रीचे व उपकरणांचे उत्पादक, (२) प्रवासी व माल यांची वाहतूक करणारी वाहक साधने आणि (३) अन्य संबंधित उद्योग, असे तीन भाग पडतात. त्यांतल्या त्यांत पहिले दोन प्रकारचे उद्योग म्हणजे वाहतूक उद्योगाचे अत्यंत महत्त्वाचे घटक मानले जातात. अन्य संबंधित उद्योदांमध्ये इंधनपूरक तसेच विविध संबंधित सेवासुविधा पुरविणारे उद्योग, ह्यांचा अंतर्भाव होत असून त्यांचेही अनन्यसाधारण महत्त्व गणले जाते. वाहतूक क्षेत्रातील शासनाचा सहभाग, ही गोष्ट त्या त्या देशातील उपलब्ध असणाऱ्या राजकीय व आर्थिक यंत्रणांवर निर्भर असू शकते.

वाहतूक सामग्री, साधने आणि साहित्य यांचे उत्पादन करणारे कारखानदार विविध प्रकारच्या वाहनांची निर्मिती करतात किंबहुना त्यांवरच सांप्रतची वाहतूकयंत्रणा पूर्णतया अवलंबून असते. वाहने चालविण्यसाठी लागणाऱ्या माध्यमांची (उदा., लोहमार्ग, हवाईमार्ग, दूरसंचारण यंत्रणा इ.) निर्मितीदेखील हे कारखानदार करीत असतात. मोटारी, बसगाड्या, मालवाहू गाड्या (ट्रक) इत्यादींची निर्मिती करणारे कारखानदारच (उदा., जपानच्या टोयोटा व निस्सान या मोटार कंपन्या, जर्मनीची फोक्सव्हागन, इटलीची फियाट) तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील जनरल मोटर्स कॉर्पोरेशन व फोर्ड मोटार कंपनी यांसारख्या कंपन्या) वाहतूक सामग्रीचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर करीत असलेले आढळतात.

प्रवासी व माल यांची ने-आण करणाऱ्या वाहक साधनांमध्ये हवाई वाहतूक कंपन्या, नळमार्गां द्वारे द्रवपदार्थांची वाहतूक करणाऱ्या कंपन्या, रेल्वे, जहाजकंपन्या, रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या कंपन्या इत्यादींचा समावेश होतो. अनेक देशांत रेल्वे वाहतूक, जहाजवाहतूक, बसवाहतूक यांचे स्वामित्व (मालकी), नियंत्रण व कार्यवाही केंद्र शासनाकडेच असते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये सर्व हवाई वाहतूक कंपन्या तसेच बहुतेक रेल्वे कंपन्या यांची मालकी, नियंत्रण व कार्यवाही खाजगी कंपन्यांकडे असते. पूर्व यूरोपातील काही देशांत आंतरनागरी बसवाहतूक, नळमार्ग, जहाज व ट्रक यांची वाहतूक शासनाच्या मालकीची असून त्यांची कार्यवाही शासनाकरवीच होत असते. बहुतेक औद्योगिक राष्ट्रांत अशा प्रकारच्या सेवासुविधा जरी खाजगी कंपन्या उपलब्ध करीत असल्या, तरी शासनाचे त्यांवर विविध प्रकारांनी नियमन असते. अन्य संबंधित उद्योगांमध्ये काच, पेट्रोलियम व तज्जन्य पदार्थ, पोलाद, टायर यांचे निर्मितिउद्योग, रस्ते-बांधणी, वाहनांची देखभाल व निगा यांसारख्या अंतर्भाव होतो.

शासन व वाहतूक: ज्या राष्ट्रांत वाहतूक ही सार्वजनिक क्षेत्रात समाविष्ट असते, त्या राष्ट्रांत शासनाचे वाहतूकक्षेत्रावर मोठे नियंत्रण असू शकते. जवळजवळ सर्व वाहतूक खासगी क्षेत्रात असणाऱ्या देशांतही शासनाचा महत्त्वाचा नियंत्रणात्मक सहभाग प्रत्ययास येतो. या सहभागाचे स्वरूप (१) काही वाहतूकसुविधांच्या पूर्ततेसाठी द्रव्य उपलब्ध करून देणे व (२) वाहतूकक्षेत्रावरच नियंत्रण जारी करणे, या दोन प्रकारांत आढळते. (१) हवाईवाहतूक नियंत्रण केंद्र, (२) विमानतळ, (३) सार्वजनिक रस्ते आणि (४) नदी व बंदर सुविधा, या चार प्रकारच्या वाहतूकसुविधांच्या कार्यवाहीसाठी सार्वजनिक (सरकारी) निधीची विशेष गरज भासते. बहुतेक राष्ट्रांत नागरी भागातील वाहतूकयंत्रणा कार्यान्वित करणे व ती चालू ठेवणे यांकरिता शासकीय अर्थसाहाय्याची व आधाराची नितांत आवश्यकता लागते कारण उपभोक्त्या ग्राहकांकडून त्या यंत्रणेची देखभाल, निगा वगैरे राखण्यासाठी ग्राहकांच्या तिकिटांच्या उत्पन्नातून जमा होणारा पैसा पुरेसा पडत नाही. वाहतूकयंत्रणा सतत कार्यशील ठेवण्यासाठी शासनाला पुरेसे द्रव्यसाहाय्य उपलब्ध करावे लागते. शासनाचे वाहतूक कंपन्यांवर जे नियंत्रण असते, ते वाहतूक सुरक्षितता तसेच वाहतूक कंपन्यांकडून वाहतूकविषयक निर्बंध, नियम व कायदे यांची पायमल्ली होत नाही ना, ते पाहणे व तपासणे यांसंबंधी असते [⟶ वाहतूक नियंत्रण वाहतूक नियमन].

वाहतूक समस्या: यांमध्ये (अ) वाहतूकसुरक्षा व सुरक्षितता (आ) इंधन साठे व स्त्रोत ह्यांचा होत जाणारा तुटवडा (ऱ्हास) (इ) पर्यावरणविषयक समस्या आणि (ई) अपर्याप्त (अपुरी) सार्वजनिक वाहन व्यवस्था, ह्यांचा अंतर्भाव होतो. खाजगी मोटारगाड्यांच्या वाहतुकीवर प्रकर्षाने भर दिला जाणाऱ्या राष्ट्रांमध्ये शासनाला वरील समस्यांना अधिककरून तोंड द्यावे लागते.

वाहतूक सुरक्षा: भरधाव वेगाने (अतिजलद) धावणाऱ्या मोटारींच्या बाबतीत वाहतूक सुरक्षिततेच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्‌भवतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात प्रतिवर्षी मोटार अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या माणसांची संख्या, इतर वाहतूक अपघातांतील मृत्यूंपेक्षा नेहमीच अधिक असल्याचे आढळले आहे. हे अपघात प्रमाण कमी होण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन तसेच कडक शासकीय वाहतूक नियंत्रण या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत. त्या मानाने हवाई वाहतुकीमध्ये अपघात प्रमाण कमी आढळत असून सुरक्षिततेचे प्रमाण चांगले राखण्यात हवाई वाहतूक चालक नेहमीच यशस्वी ठरले आहेत. तथापि याही क्षेत्रात मोठ्या विमानतळांवर प्रचंड प्रमाणात वाढत असणारी प्रवाशांची गर्दी व वर्दळ, यांमुळे येथेही अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. कित्येक वैमानिकांना विमानतळ आपले विमान उतरविण्याची अथवा विमानतळावरून विमानाचे उड्डाण करण्याची पूर्वसूचना मिळविण्यासाठी विमानतळावरी ल नियंत्रणकक्षाकडून संदेशांची प्रतीक्षा करावी लागते कारण त्याच सुमारास विमानतळाचा आसमंत तसेच धावपट्ट्या या अनुक्रमे प्रवासी व इतर विमाने यांमुळे व्यापून गेलेल्या आढळतात. याशिवाय कित्येक मोठ्या विमानतळांवर खाजगी विमानांची वाहतूक व वर्दळ इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू राहते की, तिचा परिणाम एकूणच विमानवाहतूकीवर होत राहतो. यामुळे वाहतूक नियमन नियंत्रण कठीण होते.

रेल्वे वाहतूक ही साधारणतः सुरक्षित मानली जाते. आगगाड्यांची टक्कर, गाडी रुळांवरून घसरणे इ. दुर्घटना दूरसंदेशयंत्रणेतील अचानक (आकस्मिक) बिघाडामुळे किंवा दोषांमुळे घडून येतात कधी कधी जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे किंवा लोहमार्गावरून पुराचे पाणी गेल्यामुळे लोहमार्गाचा बराचसा भाग विस्कळीत होतो किंवा वाहून जातो, तेव्हा ही दुर्घटना घडू शकते.

घटते इंधन साठे: पेट्रोलियम आणि तज्जन्य इतर इंधने ही एंजिनचालीत वाहतुकीसाठी ऊर्जा पुरवितात तथापि हा इंधन साठा अतिशय जलद रीतीने वापरण्यात येत असल्यामुळे, तो २०५० च्या सुमारास संपुष्टात येईल की काय, अशी भीती ऊर्जा तज्ञांना वाटू लागली आहे. इंधन संवर्धनाची गरज वा आवश्यकता दोन कारणांसाठी भासते: पहिले म्हणजे, इंधन-चणचणीची (इंधन-टंचाईची) वाटणारी गंभीर संभाव्यता (इंधन-टंचाईचा गंभीर धोका) आणि दुसरे कारण म्हणजे, पेट्रोलियमचे वाढत जाणारे दर वा भाव. वाढत्या पेट्रोलियम दरांमुळे वाहतुकीच्या परिव्ययांतही भरमसाट वाढ होऊ शकते परिणामी मालवाहतूक दरांमध्येही प्रचंड वाढ होण्याचा धोका संभवतो याची झळ उपभोक्त्यांना फार मोठ्या प्रमाणात सोसावी लागते. मोटारगाड्यांना सर्वसाधारणतः एकूण ऊर्जेच्या ५० टक्के ऊर्जा वाहतुकीच्या वेळी लागते आणि हे प्रमाण उद्योगधंद्यांच्या दृष्टीने प्रगत देशांत प्रकर्षाने जाणवते. मोटार वाहतुकीमुळे सबंध देशाच्या ऊर्जा-पुरवठ्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात. याकरिता अशा राष्ट्रांतील सरकारे मोटारनिर्मिती करणाऱ्या कारखानदारांना मोटरींबाबत इंधनसेवन परिमाणे निर्धारित करून देतात, या परिमाणांमुळे मोटार उत्पादकांना छोट्या आकाराच्या परंतु कमी पेट्रोलमध्ये अधिक लांबवर प्रवास करणाऱ्या मोटारींचे उत्पादन करणे आवश्यक ठरविण्यात आले आहे.

अपर्याप्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था: अनेक देशांतून खाजगी मोटारगाड्यांची वाहतूक अधिकाधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. या खाजगी मोटारवाहतुकीवरील अवलंब कमी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अधिकाधिक वाढ करावी, असे सुचविले जाते. परंतु हा कल वळविण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणे गरजेचे आहे. या सुधारणांचे स्वरूप पुढीलप्रमाणे : (१) नागरी सेवासुविधांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार आणि त्यांमध्ये गुणवत्ता आणणे. (२) आंतरनगरीय रेल्वेसेवांमध्ये वाढ व त्यांमध्येही उच्च प्रकारची गुणवत्ता आणण्याचा प्रयत्न करणे.

(१) मागरी सेवासुविधांचा प्रसार व सुधारणा: अनेक मोठ्या शहरांना आपल्या क्षेत्रात नवीन प्रकारच्या नागरी वाहतूक सुविधा निर्माण करणे द्रव्याभावी शक्य होत नसले, तरी अस्तित्वात (चालू) असलेल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा निकराचा प्रयत्न, ही शहरे करताना आढळतात. काही शहरांमध्ये बसवाहतूक जलद व गतिमान करण्यासाठी काही विशिष्ट मार्ग केवळ त्यांच्याकरिता राखून ठेवण्यात येतात. गर्दीच्या ठिकाणी मोटारी थांबविण्याबाबतही अतिशय कडक निर्बंध व नियम जारी करण्यात आल्याचे दिसते. सिंगापूरसारख्या काही मोठ्या व अतिशय गर्दीच्या शहरांमध्ये आठवड्यातील ठराविक दिवसच मोटार चालकांना मोठे रस्ते वाहतुकीसाठी वापरावयास मुभा दिली जाते. काही वाहतूकतज्ञांच्या मते विजेवर धावणाऱ्या प्रवासी आगगाड्या ह्या नागरी वाहतुकीमध्ये सुधारणा घडविणाच्या कामी मोटारींपेक्षा अधिक साह्यकारी होऊ शकतील कारण त्यांच्याकडून मोटारींप्रमाणे निष्कास वायू वा धूर बाहेर जात नाही त्याचप्रमाणे त्यांची वाहतूकही अधिक गतिमान आणि ध्वनिविरहीत अशी होत असते. भुयारी रेल्वेपेक्षा या प्रकारच्या आगगाड्यांचे डबे बनविण्यास तुलनेने कमी खर्च येतो. नागरी वाहतुकीचा आणखी एक प्रकार म्हणजे चालकरहित परंतु स्वयंचलित अशा विद्युत्प्रेरित गाड्या (पीपल मूव्हर) या प्रकारच्या गाड्यांत प्रवासी बसले, म्हणजे ठराविक मार्गांनी या गाड्या धावतात आणि ठराविक ठिकाणी प्रवासी उतरण्यासाठी व चढण्यासाठी त्या थांबतात. (२) आंतरनगरीय रेल्वेसेवांमध्ये सुधारणा : अनेक उद्योगप्रधान राष्ट्रांत अतिशय मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेल्या आंतरनगरीय रेल्वे प्रवासीसेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न त्या त्या राष्ट्रांतील शासनांमार्फत केले जात आहेत. मोटारी, बसगाड्या, विमाने यांच्यापेक्षा आगगाड्यांबाबत प्रतिप्रवासी ऊर्जासेवन प्रमाण निश्चितच कमी आहे.

फ्रान्स, जर्मनी यांसारख्या पश्चि यूरोपीय राष्ट्रांत अतिवेगवान प्रवासी रेल्वेगाड्या विशेष प्रकारच्या रूळमार्गांवरून वाहतूक करतात. या प्रकारच्या रूळमार्गांना वळणे नसल्यामुळे या रेल्वेगाड्यांना प्रतितास २०० किमी. एवढ्या वेगाने मार्गक्रमण करणे शक्य होते. इंग्लिश खाडीखालून फ्रान्स व ग्रेट ब्रिटन यांना जोडणारा ‘चॅनेल टनेल’ हा बोगदा-रेल्वेमार्ग (‘युरोटनेल’ या नावाचा) एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प १९८६ साली सुरू करण्यात आला. १९९४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला असून त्याचे मे महिन्यात उद्घाटनही करण्यात आले. या प्रकल्पावर गेल्या आठ वर्षांत सु. १३.५ कोटी डॉलर खर्च करण्यात आले आहेत. डोव्हरची खाडी पार करण्याकरिता बोटींना काही तासांचा अवधी लागतो. ह्या युरोटनेलमुळे रेल्वेने केवळ ३५ मिनिटांत ५० किमी. चे हे अंतर पार करणे शक्य होणार आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरापासून अतिजलद धावणाऱ्या रेल्वे, प्रतितास १६० किमी. या वेगाने मुख्य लोहमार्गांवरून वाहतूक करतात.

फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, इटली यांसारख्या यूरोपीय राष्ट्रांमध्ये तसेच जपानमध्ये अतिजलद वेगाने धावणाऱ्या हलक्या रेल्वेगाड्या जलद आंतरनगरीय प्रवाससेवा उपलब्ध करतात. जपानमध्ये अशा रेल्वेगाड्यांना ‘बुलेट ट्रेन’ अशी संज्ञा असून त्यांचा दर तासाला २१० किमी. एवढा प्रचंड वेग असतो. या गाड्या होन्शू बेटावरील प्रमुख शहरे एकमेकांना जोडतात. फ्रान्समधील ‘टीजीव्ही ट्रेन’ (अतिवेगवान रेल्वे) पॅरिस व लीआँ ही शहरे तसेच प. फ्रान्समधील अन्य शहरेही एकमेकांशी जोडते. ही रेल्वे तासाला ३०० किमी. एवढ्या प्रचंड वेगाने धावत असते.

अतिवेगवान प्रवासी रेल्वेगाडी चालू करण्याच्या प्रयत्नांत यूरोपीय अभियंते सांप्रत गुंतलेले असून अशा प्रकारच्या प्रवासी रेल्वेगाडीला ‘मॅग्नेटिक लेव्हिटेशन ट्रेन’ (किंवा ‘मॅगलेव्ह ट्रेन’) असे संबोधिले जाते. या प्रकारच्या आधुनिक तंत्रविद्येच्या संशोधनाला १९७० च्या पुढे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान इ. राष्ट्रांत सुरुवात करण्यात आली. मात्र जर्मनी व जपान या दोन राष्ट्रांतच वरील प्रकारच्या तंत्रविद्येचा अवलंब करून प्रायोगिक तत्त्वावर ‘मॅगलेव्ह ट्रेन’ या आगगाड्या सुरू करण्यात आल्या. या गाड्यांमुळे आंतर महानगरीय वाहतूक प्रतितास ३०० किमी. किंवा त्याहीपेक्षा अधिक किमी. वेगाने चालू करणे शक्य होणार आहे. या दोन्ही देशांमागोमाग अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, कॅनडा यांसारख्या राष्ट्रांत गतिमान आगगाड्या वापरात आणण्याकरिता चुंबकीय प्रतिसारण व चुंबकीय आकर्षण या दोन्ही तांत्रिक प्रणालींपैकी एकीचा अवलंब केला जाणार आहे. ‘मॅगलेव्ह ट्रेन’ या आगगाड्या प्रतितास ४८० किमी. एवढ्या वेगाने धावतील, अशी अपेक्षा आहे तथापि सांप्रत तरी यापेक्षा कमी वेगाने धावतील, अशी अपेक्षा आहे तथापि सांप्रत तरी यापेक्षा कमी वेगाने धावणाऱ्या मॅगलेव्ह ट्रेन वापरात आणल्या जात आहेत.

वाहतूक आणि दळणवळण याचे काही प्रश्न

वाहतूक आणि दळणवळण

1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
1. भारतातील ग्रामीण व कृषी विकासासाठी ........... ही वाहतूक अत्यावश्यक आहे.
2. भारतातील पहिला रेल्वे मार्ग ........... व ........... या दरम्यान निर्माण करण्यात आला.
3. बेंगळूरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाला ........... असे म्हणतात.
4. बाँबे समाचार हे वृत्तपत्र ........... मध्ये सुरू झाले.
5. ........... बंदराला ‘भारताचे प्रवेशद्वार’ म्हणतात.
उत्तरे : 1.रस्ते (भूमार्ग वाहतूक) 2. ठाणे ते मुंबई 3.केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ   4. इ.स. 1822  5. मुंबई

2.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. वाहतूक व दळणवळण म्हणजे काय?
उत्तर : वस्तू, सेवा व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी नेण्याच्या व्यवस्थेला ‘वाहतूक’ असे म्हणतात.
एका व्यक्तीकडून दुसèया व्यक्तीकडे किंवा एकाठिकाणाहून दुसèया ठिकाणी बातम्यांची देवाणघेवाण करणे यालाच दळणवळण (संपर्क माध्यमे) असे म्हणतात.

2. सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग व सुपर राष्ट्रीय महामार्ग यावर सविस्तर माहिती लिहा.

उत्तर : 1) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग सुपर राष्ट्रीय महामार्ग
ही एक चौपदरी ते सहापदरी रस्ता निर्मितीची योजना आहे. 1999 मध्ये या योजनेचा प्रारंभ झाला आहे. देशातील अनेक प्रमुख शहरे व सांस्कृतिक तसेच औद्योगिक केंद्रांशी या  रस्त्याच्या जाळ्यांमुळे संपर्क साधणे शक्य झाले आहे. दिल्ली - जयपूर - अहमदाबाद - सुरत - मुंबई - पुणे बेंगळूर - चैन्नई - विशाखापट्टण - भुवनेेशर-कोलकत्ता अहमदाबाद - कानपूर - दिल्ली ही शहरे या रस्त्यामुळे जोडली जातात.
सुपर राष्ट्रीय महामार्गाचे दोन भाग आहेत.
अ) उत्तर - दक्षिण - कॉरिडोर - श्रीनगरपासून कन्याकुमारी पर्यंत हा रस्ता विस्तारला आहे.
आ) पूर्व-पश्चिम कॉरिडोर - आसाममधील सिलचारपासून गुजराथमधील पोरबंदरपर्यंत हा रस्ता विस्तारला आहे. हे रस्ते अनेक प्रमुख शहरे, औद्योगिक केंद्रे व बंदरांना जोडतात.
या रस्त्यांची निर्मिती व व्यवस्थापन याची जबाबदारी ‘भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण’ (National High Way Authority of India) यांच्याकडे आहे.

3. भारतातील रेल्वेमार्ग वाहतुकीचे वर्णन करा.
उत्तर :  ही भारतातील एक महत्त्वाची भूार्ग वाहतूक आहे. जास्त प्रमाणात वस्तूंची ने आण करणे, जास्त प्रमाणात प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी घेऊन जाण्यास रेल्वे वाहतूक फारच उपयुक्त आहे. शेती, उद्योगधंदे व भारताच्या आर्थिक विकासात रेल्वेची भूमिका फार महत्वाची ठरली आहे. या शिवाय देशाचा व्यापार व पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी मदत झाली आहे.
रेल्वेमार्गाची निर्मिती ब्रिटीश काळातच सुरु झाली होती. दुष्काळी भागात अन्नधान्याचा व चाèयाचा पुरवठा करणे, सैन्याची एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी रवानगी करणे ही रेल्वेमार्गाची मुख्य उद्दिष्टे होती. भारतात इ.स. 1853 मध्ये ठाणे ते मुंबई या मार्गावर पहिली रेल्वे सुरु झाली. नंतर कोलकत्ता-राणीगंज (1854) मद्रास-अर्कोणम (1864) या रेल्वेमार्गांची निर्मिती झाली नंतर क्रमाक्रमाने देशाच्या इतर भागात रेल्वे मार्गांची निर्मिती करण्यात आली.
रेल्वे वाहतूक ही एक भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था आहे. आज भारतात 64,015 कि.मी. लांबीचे रेल्वोर्ग असून सुारे 7031 रेल्वेस्थानके आहेत. दक्ष कारभार व सुलभ व्यवस्थापनासाठी रेल्वेची 16 विभागात विभागात विभागणी केली आहे. सुरक्षित व आनंददायी रेल्वेच्या प्रवासासाठी अनेक उपाय योजना आखल्या गेल्या आहेत.

4. जलमार्ग वाहतुकीचे महत्त्व थोडक्यात वर्णन करा.



उत्तर :   भारतात प्राचीन काळापासून जलमार्गांचा उपयोग होत आहे. जलमार्गात जहाज, बोट व होडी यांचा वापर करतात.
जलमार्ग वाहतुकीचे दोन प्रकार आहेत. 1) अंतर्गत जलमार्ग 2) सागरी जल मार्ग
1) अंतर्गत जलमार्ग : नद्या, सरोवरे, कालवे, पश्चजल (इरलज्ञ थरींशी) यातून अंतर्गत जलवाहतूक केली जाते प्राचीन काळात भारत देशामध्ये अंतर्गत जलवाहतुकीस फार महत्त्वाचे स्थान होते. आज रस्ते व रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणामुळे त्याचे महत्त्व कमी होत आहे. भारतात अंतर्गत जलमार्गाचा उपयोग वस्तू व प्रवाशांची ने आण करण्यासाठी करतात. गंगा, ब्रम्हपुत्रा व त्यांच्या उपनद्यांद्वारे ही जलमार्ग वाहतूक सुरु होती. दक्षिण भारतात नदी मुखा जवळील प्रदेशात हा मार्गआढळून येतो.
2) सागरी जल मार्ग : समुद्र व महासागर यांच्यामार्फत सुरु असलेल्या जलवाहतुकीला सागरी मार्ग असे म्हणतात. भारताला लांबलचक किनारपट्टी लाभलेली असून काही नैसर्गिक बंदरे आहेत. भारत देश पूर्वगोलार्धाच्या मध्यभागी वसलेला आहे. आमचा जवळजवळ 85% विदेशी व्यापार हा सागरीमार्गाने होतो. हे सर्व घटक सागरी वाहतुकीला पूरक ठरले आहेत.

5. भारतातील वायुमार्ग वाहतूक यावर टीप लिहा.



उत्तर : हा एक वेगवान असा वाहतुकीचा प्रकार आहे. टपाल व प्रवाशांना नेण्यासाठी व आणण्यासाठी उपयुक्त आहे. युद्धे, महापूर, भूकंपासारख्या आपत्ती काळात या वाहतुकीचा फार उपयोग होतो. भारत हा एक विशाल देश असून येथे हवाई वाहतुकीच्या विकासासाठी
अनुकूल वातावरण उपलब्ध आहे.
आज भारतात प्रमुख हवाई वाहतुकीचे व्यवस्थापन व नियमन करणाèया दोन प्रमुख संस्था आहेत.
1) एअर इंडिया इंटरनॅशनल : ही संस्था भारत व जगातील इतर देशांना हवाई वाहतुकीची सेवा पुरविते.
2) इंडियन एअरलाईन्स : ही संस्था भारतात देशांतर्गत व इतर शेजारील देशांना हवाई वाहतुकीची सेवा पुरविते.
आज भारतात ही सेवा खाजगी क्षेत्रांकडे सोपविली आहे. सरकारचा परवाना घेऊन काही खाजगी संस्था हवाई वाहतुकीची सेवा पुरवित आहेत. उदा. जेट एअरवेज सहारा, पॅरामाऊंट, वायूदूत सेवा वगैरे.
विमानतळ -
भारतात 141 विमानतळ आहेत. त्यात 28 आंतरराष्ट्रीय व 88 देशांतर्गत व 25 वायूसेनेशी संबंधित संरक्षणखात्याची विमानतळ आहेत.

6. भारतातील विविध दळणवळण साधनांची नावे लिहा.
उत्तर : आज भारतात विविध प्रकारची दळणवळणाची साधने दिसून येतात. त्यांची दोन प्रकारात विभागणी करतात ती म्हणजे.
अ) वैयक्तिक संपर्क माध्यमे आ) सामूहीक संपर्क माध्यमे
टपाल, टेलिग्राम, टेलिफोन (दूरध्वनी), फॅक्स, इ-मेल, इंटरनेट, सेमिनार, परिषद इ. वैयक्तिक दळणवळणाची साधने आहेत.
वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, दूरदर्शन, पुस्तके ही सामूहिक संपर्क माध्यमे (दळणवळणसाधने) आहेत.

दळणवळण

दळणवळण

उत्तम दळणवळण हे आजच्या काळातील महत्त्वाची गरज बनली आहे. भुतलावर, जलाशयावरून व आकाशातून दळणवळण होउ शकते. दळणवळणासाठी वाहने लागतात पण खुष्की वाहतुकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणारे रस्ते किंवा रुळमार्ग असावे लागतात.

भारतात रस्त्यांचे खालील प्रकार आहेत:

राष्ट्रीय महामार्ग: हे मार्ग देशाच्या विकासात फार मोठा हातभार लावतात. या रस्त्यांची बांधणी आणि देखभाल केंद्र सरकार करते.
राजकीय महामार्ग: हे महामार्ग राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.
प्रमुख जिल्हा रस्ता
इतर प्रमुख जिल्हा रस्ता
ग्रामीण रस्ता
द्रुतगतीमार्ग: प्रगत देशात विस्तृत जाळे असणारा पण भारतात नवीन असणारा हा रस्ता प्रकार गेल्या ५ वर्षात भारतातही अवतरला आहे. त्यात वर्षागणिक संख्येने व लांबीने वाढ होत आहे. या रस्त्यांवर कमीतकमी विशिष्ट गति असलेल्या वाहनांनाच प्रवेश असतो.
वाहनांचे प्रकार:

१. रस्त्यावरची वाहने

२. रेल्वे

३. जहाज

४. विमान

याशिवाय दळणवळणाचे आणखी प्रकार :-

१. दूरध्वनी (टेलीफोन)

२. रेडियो

३. दूरदर्शन

४. अंतरजाल (इंटरनेट)

__________________________

राज्यात लोकांच्या व मालाच्या ने-आण करण्यासाठी कार्यक्षम, सुरक्षित, सर्वांना परवडणारी व सर्वांसाठीची अशी उत्तम दर्जाची वाहतूक व्यवस्था


राज्याचा विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. देशातले सर्वांत जास्त प्रगत महाराष्ट्र राज्य असूनही राज्यात आजही आधुनिक, स्वस्त, सुरक्षित आणि प्रत्येक खेडी, गावांना जोडणारे रस्ते, रेल्वे यांचे एकत्रित असे जाळे नाही. राज्यातल्या केवळ महत्वाच्या शहरांमध्ये महामार्ग, रेल्वे, विमानतळे आहेत, तीही अगदीच सुमार दर्जाची. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी, अपघात, प्रवासी व मालाची गैरसोय, वेळेचा अपव्यय अशा समस्यांनी आज महाराष्ट्रातला माणूस ग्रासला आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत आणि जागतिक व्यापारासाठी प्रसिद्ध असलेली बंदरांची काळाप्रमाणे न बदलल्यामुळे पार रया गेली आहे. आज महाराष्ट्राला, आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातील माणसाला वर आणायचे असेल तर राज्याचा कानाकोपरा जोडणारी, उत्कृष्ट दर्जाची, वेगवान वाहतूक व्यवस्था बसविण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

प्रश्नाचं स्वरूप


सर्वसाधारण वाहतूक, मालवाहतूक ह्याबाबतची संसाधनं दळणवळणासाठी फार महत्वाची. "वाहतूक" म्हणजे "रस्ते" असं एक समीकरण झालं आहे. ते चूक मुळीच नाही पण पूर्ण बरोबरही नाही. महाराष्ट्राला प्रगती करायची असेल तर अत्यंत कार्यक्षम (स्वस्त आणि सुलभ, कमी धोकादायक) अशी दळणवळणाची यंत्रणा असली पाहिजे. ही यंत्रणा म्हणजे प्रत्येक गाव / वस्ती / शहर यांना जोडणारे रस्ते / रेल्वेमार्ग / जल मार्ग अथवा विमान सेवा, व त्या मार्गांचा वापर करू शकणारी, गरज असेल तेवढ्या संख्येने माल व प्रवासी वाहतूक करणारी वाहन व्यवस्था. अशा व्यवस्थेचे जाळे महाराष्ट्रात उभे असायला हवे. पण आज काय परिस्थिती आहे?

भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचे रस्ते आहेत आणि रस्त्यांचे खूप मोठे पसरलेले जाळे आहे (तक्ता क्र. १ व २, आलेख क्र. १).

तक्ता १- महाराष्ट्रातल्या रस्त्यांचे प्रकार आणि लांबी (सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदांच्या अखत्यारित असलेल्या)


रस्त्यांची वर्गवारीलांबी (कि.मी)रस्त्यांचे एकूण जाळे२,४२,९१९राष्ट्रीय महामार्ग४३७६राज्य महामार्ग३४,१५७मुख्य जिल्हा रस्ते५०,२५६इतर जिल्हा रस्ते४७,५२९गावातील रस्ते१,०६,६०१

तक्ता २- महाराष्ट्रातल्या रस्त्यांची विभागवार लांबी (२०११-१२) (सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या)


विभागलांबी (कि.मी)%कोकण२६,१५९११%पश्चिम महाराष्ट्र५४,०१०२२%खानदेश व उत्तर महाराष्ट्र४७,२६४२०%मराठवाडा५३,७३७२२%विदर्भ६१,७१९२५%एकूण२,४२,९१९१००%

आलेख 1- विभागवार रस्त्यांची लांबी (टक्के)

शहरांच्या आतील व शहरांना जोडणारे रस्ते पाहता इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अधिक विकसित झाला आहे, असा एक सार्वत्रिक (गैर)समज आहे. मात्र, सामान्य लोकांच्या अनुभवावरून असे दिसून येते की, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यामध्ये लोकांचा फार वेळ वाया जातो. हा प्रश्न गावांमध्ये अधिक तीव्र असतो. बरीच ठिकाणं असे आहेत जिथे रस्ते नाहीत आणि जर रस्ते असले तरी पावसाळ्यात हे रस्ते वाहून गेल्यामुळे नागरिकांची अजून गैरसोय होते.

महाराष्ट्रातल्या सर्व रस्त्यांच्या काही ठळक समस्या

अव्यवस्थित, अपुरे, अरूंद रस्ते,रस्त्यांवर जागोजागी खड्डे, चाळणी सारखे झालेले रस्ते.


मुख्य शहरांच्या रस्त्यावर एकाच वेळेस चारचाकी, मालवाहू मोटारगाड्या, दुचाकी व सायकली अशा वेगळ्या वेगळ्या वेगांची वाहने, त्यात भर म्हणजे खचाखच भरलेल्या बसगाड्या व ट्रक आणि हजारो पादचारी यांची गर्दी.


पुरेसे पादचारी पथ, योग्य फलक, दिशादर्शक, वेग मर्यादा, गतिरोधक, रस्ता दुभाजक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून असुरक्षित झालेले रस्ते.


विक्रेते, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंग यांच्या धोकादायक अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी.


शहरातील रस्त्यांना मलनिस्सारणाच्या सुविधा नाहीत. वेळेवर रस्ता दुरुस्ती केली जात नाही.


तुटपुंज्या प्रमाणात असलेल्या राज्य आणि आंतरराज्य महामार्गांवर अपघात प्रतिबंधक नाहीत.


अवाजवी आणि पारदर्शकता नसलेली 'टोल' आकारणी, व प्रवाशांसाठी सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय.


राज्यातील रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण इतर राज्यांशी तुलना करता अतिशय मोठे आहे व ते वाढतच आहे. या अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाणही मोठे आहे. देशात २०१२ मध्ये एकूण ३,९४,९८२ अपघाती मृत्युंपैकी ६२,०९५ महाराष्ट्रातील होत्या, म्हणजे जवळजवळ १५.७% (पहा आलेख क्र. २).

आलेख 2 – देशातील अपघाती मृत्युंची टक्केवारी

शहरातल्या रस्त्यांचे नियोजन नसणे, नियोजन नसताना शहराचा विस्तार होत हाणे, रस्ता बांधताना किती वाहतूक समावून घेणार आहे याचा विचार न करता रस्त्याची रुंदी ठरवणे, रस्त्यावर आवश्यक ते फर्निचर (दिवे, दुभाजक, सायकल व पादचारी मार्ग, इ.) साठी सोय न करणे इ. बाबींमुळे वाहतूकीस बाधा येते. राज्यातले महामार्ग बांधताना काही ठराविक विभागांचाच विचार केला जातो, ज्यामुळे राज्याच्या कानाकोपर्‍यात दळणवळणाची सोय पोचत नाही. छोट्या गावांतले अंतर्गत रस्ते बांधण्यासाठीची योजना अपूरी असते. या व अशा अडचणी आपण आज अनुभवतो आहोत.

भारतीय रेल्वे व्यवस्था आशियात सर्वात मोठी. देशातील हा दुसरा सर्वांत मोठा सार्वजनिक सरकारी उपक्रम आहे. इतर कोणत्याही परिवहन व्यवस्थेप्रमाणेच रेल्वे परिवहनाचा मुख्य उद्देश हा मालाची व प्रवाशांची ने-आण जास्तीत जास्त त्वरेने, सुरक्षितपणे व किफायतशीररित्या करणे हा असतो. भारतातल्या एकूण लोहमार्ग / रेल्वे ६५,२०२ कि.मी. पैकी ५,९८४ कि.मी. म्हणजे ९% लोहमार्ग हे महाराष्ट्र राज्यात आहेत 1. परंतु मुख्य लोहमार्ग राज्यातल्या फक्त महत्वाच्याच काही शहर आणि नगरांना जोडतात.

गेल्या अनेक वर्षांत आवश्यक त्या सुधारणा न केल्याने, राजकारण्यांच्या अति हस्तक्षेपामुळे भारतीय रेल्वे व्यवस्था मोठ्या प्रमाणावर मोडकळीस आली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रातली दुर्गम गावे, नव्याने वाढलेली शहरे, औद्योगिक वसाहतींना रेल्वे सुविधा अजूनही पोहचलेली नाही. केंद्र शासनाच्या अखत्यारित रेल्वे हे स्वतंत्र मंत्रालय असूनही देशाच्या उत्पन्नात सिंहाचा वाटा उचलणार्‍या महाराष्ट्रासारख्या राज्यात पुरेसे लोहमार्ग, रेल्वे गाड्या अजूनही उपलब्ध केल्या गेल्या नाहीत. यामुळे रस्त्यांवरची माल व प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे; जी खर्चिकही आहे आणि प्रदूषणात भर घालणारी देखील (पहा आलेख क्र.३2 ).

आलेख ३ - वाहतूकीचे प्रकार व टक्केवारी

भारतीय रेल्वे किती अकार्यक्षम आहेत याचा दाखला देणारे उदहरण – चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील रेल्वे २०,००० ते ३७,००० टन मालाची वाहतूक करतात, तर भारताच्या रेल्वेचे माल वाहतूकीचे प्रमाण फक्त ५,४०० टन एवढे आहे 3 (पहा तक्ता क्र. 3).

तक्ता 3 - इतर देशांतील रेल्वेची माल वाहतूक क्षमता

देशरेल्वेचे माल वाहतूक क्षमता (टन)ब्राझील२३,०००कॅनडा२०,०००चीन२४,०००अमेरिका१०,००० ते २०,०००

भारतीय रेल्वे परिवहन हा एक उद्योग नाही तर, सार्वजनिक सेवा या तत्वावर चालविला जातो. या परिस्थितीला काही त्या त्या काळाची, राजकीय, आर्थिक कारणे असली, तरी परिणामी इतक्या वर्षांत भारतीय रेल्वे परिवहन व्यवस्थेचे केवळ आर्थिक नुकसानच झाले असे नव्हे, तर यांत्रिक व तांत्रिक बाबतींतही तिची प्रगती खुंटली आहे.

महाराष्ट्र राज्यात केवळ मुंबई, पुणे, नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे आहेत. अर्थातच राज्याच्या विकासाचा वेग लक्षात घेता ही अपुरी आहेत. सगळ्यात जास्त अंतराष्ट्रीय वाहतूक ही मुंबईच्या विमानतळावर हाताळली जाते हे ही नोंद घेण्याजोगे आहे (पहा तक्ता क्र. ४).

तक्ता ४- प्रवासी व मालाची विमान वाहतूक

प्रवासी (लाख)माल (टन)विमानतळ२०११२०१२२०११२०१२राष्ट्रीयमुंबई१९९.९५२१०.४४१,९९,८३११,९०,२८८पुणे२७.५३२७.५३२७,८२८२४,१३४नागपूर१२१३.७७९१४५४५८८औरंगाबाद२.६६४.०११८४११२२७कोल्हापूर०.०६०.०८००एकूण२४२.२२६०.५९२,३८,६४५२,२०,२३७आंतरराष्ट्रीयमुंबई८७.४८९४.९३४,७०,४०२४,६७,१८२नागपूर०.३७०.३९३४६३८८पुणे०.५६०.६४००औरंगाबाद@०.०५०.०३००एकूण८८.४६९५.९९४,७०,७४८४,६७,५७०

@ खाजगी प्रवासी विमाने

विमानतळांबरोबरच एकेकाळी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध असलेली जे.एन.पि.टी., न्हावा-शेवा सारखी बंदरे आधुनिक मशिनरी, तंत्रज्ञान नसल्यामुळे मागे पडली आहेत (पहा तख्ता क्र. ५). महाराष्ट्रातले व्यापारी या बंदरांचा उपयोग करण्यापेक्षा गुजरातमधील आधुनिक, कार्यक्षम मुंद्रा बंदराला अधिक पसंती देतात. यामुळे राज्यातला व्यापार आणि महसुल इतर राज्यात जातो आहे. राज्यात एकूण ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा असला तरी जलवाहतुकीचे प्रमाण आणि चांगली बंदरे कमी होत चालली आहेत. कोकणपट्टीत पूर्वी स्वस्त आणि मस्त अशा जलप्रवासासाठी मुंबई ते गोवा, रत्नागिरी तसेच अलिबाग, मुरुड, रेवस, उरण येथे प्रवासी जल वाहतूकीचे प्रमाण मोठे होते (पहा आलेख क्र. 4). मात्र येथे सुधारणा न झाल्याने जलवाहतुकीचे प्रमाण कमी होत चालले आहे.

Figure 4 राज्यातली बंदरे

तक्ता ५ – मुख्य बंदरांची वाहतूक आकडेवारी

घटकमुंबई पोर्ट ट्रस्टजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट२०१०-११२०११-१२% बदल२०१०-११२०११-१२% बदलएकूण मालवाहतूक क्षमता (लाख टन)४८७४८७०.००६४०६४००.००कर्मचारी संख्या१३,३९११२,७२६(-)४.९७१७३०१७१८(-)०.६९माल हाताळणी (लाख टन)अ) आयात३६७.५५३८८.७२५.७६३३४.४६३३२.१८(-)०.६८ब) निर्यात१७८.३१७३.१४(-)२.८९३०८.७१३२५.१२५.३२एकूण५४५.८५५६१.८६२.९३६४३.१७६५७.३२.२प्रवासी वाहतूक हाताळणी (हजारांत)१६.०१४.७(-)७०.६४---जहाज संख्या५६२२५७५८२.४२३१२८२९२९(-)६.३६चालू उत्पन्न (रू. कोटी)९५५.०७१०२३.०५७.१२११२२.६४११६७.१५३.९६चालू खर्च (रू. कोटी)७७४.९१८२१.४७६.०१४४४.४६४९९.६३१२.४१चालू शिल्लक/ नफा (रू. कोटी)१८०.१६२०१.५८११.८९६७८.१८६६७.५२(-)१.५७

महाराष्ट्राच्या आतले, इतर राज्यांना जोडणारे आणि महाराष्ट्राला जगाशी जोडणारे रस्ते, रेल्वे, विमानतळे, बंदरे हे सर्व मिळून राज्याची परिवहनाची गरज भागवू शकत नाहीत. वाहतूक अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रात अजूनही चांगल्या दर्जाच्या रस्ते, रेल्वे, विमानतळे यांच्या नियोजनबद्ध विकासाची स्पष्ट आवश्‍यकता आहे.

एक दूरगामी धोरण म्हणून महाराष्ट्रात आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाच प्राधान्य द्यायला हवं. त्यासाठी रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे इ. चा एकत्रित विचार करून आखणी करायला हवी.

असं का होतं?


राज्यात जलद, सुरक्षित आणि भरवशाची अशी एक कार्यक्षम वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. ही व्यवस्था असली तरच राज्यात व्यापार-उद्योगांना चालना मिळते हे नव्याने सांगायची गरज नाही. आज मात्र राज्याच्या काना-कोपर्‍यात तर नाहीच, पण महत्वाच्या जिल्हा व तालुका पातळीवरही अशी व्यवस्था नसल्यामुळे लोक प्रवासासाठी वडाप सारखे असुरक्षित आणि अपुरे पर्याय वापरून वेळ मारून नेताना दिसतात.

लांब पल्ल्याच्या माल व प्रवासी वाहतुकीसाठी खरं तर रस्तेवाहतुक हा पर्याय वेळखाऊ, असुरक्षित आहे आणि विश्वासार्ह नाही, स्वस्त तर नाहीच नाही. शहराजवळच्या औद्योगिक वसाहतींसाठी देखील अशी वाहतुक व्यवस्था उपलब्ध नाही. वाहतुकीची सार्वजनिक सुविधा नसल्याने दुचाकी, चारचाकी गाड्या, टेंपो, ट्रक इ. चा वापर अधिक होत आहे हे आपण ओळखायला हवे.

राज्यातले रस्ते सुमार दर्जाचे असण्याबरोबरच असुरक्षित आहेत. रस्ते आणि रेल्वे बांधणे हे अनुक्रमे राज्य शासन व केंद्र शासन या वेगवेगळ्या शासनाच्या पातळ्यांवर केले जाते. शिवाय दोनही विभागांचे आपापले स्वतंत्र योजना व आखणी असते. यामुळे रस्ते व रेल्वे यांचे एकमेकांना पूरक असा एकात्म पद्धतीने जो विचार व्हायला पाहिजे तो होत नाही.

आहेत त्या रस्त्यांवर ठिकठिकाणी अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. याचे कारण म्हणजे रस्त्यांची अयोग्य भौमितिक मांडणी. रस्ता प्रणालीमध्ये शहरी रस्त्यांचे एकात्म व समतोल जाळे असणे व त्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची चांगली जोड देणे आवश्यक आहे. रस्त्यांची अपुरी देखभाल, अरुंद रस्ते, सदोष भौमितिक आखणी, लांबचर रस्ता बघण्यात अडथळे, निकामी मोडलेले पूल, पाण्याखाली बुडणारे रस्त्याचे भाग यांमुळे अपघात घडून येतात. लहान व मोठ्या रस्त्यांवरील जागोजागी वाहतुकीसंबंधीच्या खुणा व चिन्हे नसल्यामुळे रस्ता वापरणार्‍यांना अपघातांना सामोरे जावे लागते.

महाराष्ट्रात रस्ते बांधणी, रेल्वे, विमानतळे, बंदरे हे सार्वजनिक सेवा या तत्वावर चालविले जातात. रस्ते बांधणी प्रकल्पांना परवाने देण्याच्या किचकट वेळखाऊ प्रक्रियेमुळे वास्तविक कमी रस्ते बांधले जातात. रस्ते बांधणीचे जुने कायदे व नियम यांमुळे आत्ताच्या खाजगी कंपन्यांची आर्थिक गणिते बिघडतात; आणि मग त्यामुळे खराब रस्त्यांबरोबरच 'टोल' गैरप्रकार, भ्रष्टाचार अशा समस्या निर्माण होतात.

शिवाय, रस्ते बांधणी प्रकल्प मंजुरीसाठी सरकारी कागदपत्रे, परवाने यामध्ये दिरंगाई कारभार असल्यामुळे सर्वांचेच मोठे नुकसान होते. सर्वांत मोठा फटका म्हणजे प्रत्येक वर्षी बदलणारी यंत्रसामुग्री, बांधकाम साहित्य, कर्मचार्‍यांचे पगार, डिझेल, पेट्रोल अशा सर्वच गोष्टींचे भाव वाढत असल्याने रेल्वे, रस्ते, धरणे, या प्रकल्पांचा खर्च १५ ते २५ वर्षे लागल्यामुळे ५-६ पटीने वाढत जातो. अशा रितीने खर्चाचा पांढरा हत्ती बनलेले हे रस्ते आणि रेल्वेच्या महाप्रकल्पांचा वाढलेल्या खर्चाचा सगळा भार शेवटी कर भरणार्‍या सामान्य लोकांवरच पडतो.

राजकीय आणि शासकीय इच्छाशक्ती, आर्थिक पाठबळाखेरीज प्रकल्पाचे सुयोग्य नियोजन, कडक अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रकल्प तडीस नेण्याचे उद्दिष्ट्य या सर्व गोष्टींचा राज्यात अभाव असल्याने रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळे यांमध्ये मोठ्या प्रमाणार सुधारणा होताना दिसत नाहीत.

काय करायला हवं?


प्रत्येक गावाच्या, शहराच्या गरजेनुसार तिथल्या रस्ते, रेल्वे, आणि विमानतळ, बंदर यांना जोडणारे जोड रस्ते यांचा एकत्रितपणे विचार करून तशी आखणी करायला हवी. मुख्य शहरांच्या आतल्या, शहरांना जोडणार्‍या आणि संपूर्ण महाराष्ट्रातच बस, रेल्वे या परिवहन सेवा लोकप्रिय करण्यासाठी यांचे आधुनिकीकरण करायला हवे.

चालणे, सायकलचा वा इतर पेट्रोल-डिझेल विरहित वाहनांचा वापर करणे जिथे सोपे व शक्य आहे तिथे या पर्यायांना प्रोत्साहन द्यायला हवे.


गर्दी टाळण्याच्या दृष्टीने खासगी वाहनांवर ठराविक ठिकाणी निर्बंध घालायला हवे.


खाजगी कंपन्यांतर्फे बस / रेल्वे इ. ची परिवहन सेवा विकसित करायला हवी.


सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन - राज्य परिवहन मंडळाचे नूतनीकरण करायला हवे.


प्रत्येक शेताला गावाशी जोडणारा रस्ता (single lane, all-weather road),प्रत्येक गावाला जवळच्या शहराशी / तालुक्याच्या ठिकाणाशी जोडणारा रस्ता (double lane, all weather road), राज्य महामार्ग असतील यासाठी नियोजन करायला हवे.


प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याशी, जिल्ह्याला शेजारच्या जिल्ह्याशी जोडणारा रस्ता अथवा रेल्वे असायला हवी.


राज्याचे स्वतंत्र रेल्वे बोर्ड, बोर्डाची जिल्ह्यातील यंत्रणा, प्रत्येक जिल्ह्याच्या आतील गावांना आणि ३५ जिल्ह्यांना जोडणारी रेल्वे सेवा असेल.


प्रत्येक जिल्ह्यात किमान एक विमानतळ हे उद्दिष्टय ठेवायला हवे.


बंदरांच्या विकासाची रणनिती ठरवायला हवी.


एकूण सर्वच क्षेत्रात परिवहन मार्गी लागण्यासाठी योजनाबद्ध गतीमान प्रकल्पांची उभारणी आणि अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.

महत्वाच्या कल्पना


आधुनिक,उत्कृष्ट दर्जाचे प्रत्येक खेडी-गावे जोडणारे रस्ते व रेल्वे यांचे एकत्रित जाळे


असे जाळे उभे करताना शहर रस्ते, राज्य महामार्ग बांधण्यासाठी खाजगी, परदेशी कंपन्यांकडून ’उत्तम दर्जा’ या निकषावर रस्तेबांधणी (टोल धोरण तपशीलासाठी पहा परिशिष्ट क्र. १)


राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात रेल्वेचे जाळे उभे करण्यासाठी 'महाराष्ट्र रेल्वे'.


पर्यटन आकर्षणासाठी डेक्कन ऑडिसी सारख्या नवीन रेल्वेगाड्या.


राज्याच्या ३५ जिल्ह्यात प्रत्येकी एक विमानतळ / धावपट्ट्या.


खाजगी कंपन्यांकडून मोठ्या बंदरांचे आधुनिकीकरण व लहान बंदरांचा विकास.


कार्यक्रम


सायकलींची वाहतूक जेथे फार जास्त असेल अशा शहरी भागांकरता सायकल चालवणार्‍यांसाठी खास अधिकार असलेला रस्त्याचाच राखीव भाग ठेवण्यात येईल. हा मार्ग मुख्य रस्ता आणि पादचारी मार्ग यांच्या मध्ये आणि हिरवळीच्या १ मी. अरुंद पट्ट्यांनी विभक्त केलेला असेल. या सायकल मार्गामुळे पादचारी, मोटारवाहने व सायकली यांची वाहतूक विभक्त राहून अपघाताची शक्यता कमी होईल. (उदा- काही वर्षांपूर्वी पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे; अजूनही पुणे शहरातली बरीच अंतरे सायकल ने पार करण्याइतकी आहेत. पुण्यासारख्याच इतर शहरांमध्येदेखील स्वस्त, आरोग्य हिताचा पर्याय म्हणून विकसित करायला हवा. स्वतंत्र सुरक्षित रस्ता तयार करून सायकल चालविणार्‍यांचे प्रमाण आत्ता आहे त्यापेक्षा जास्त वाढवायला हवे.)


५ लाख आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये - रस्ते, रेल्वे यांची एकत्रित योजना आणि त्याचबरोबर उत्तम दर्जाच्या बसेस, रेल्वे असलेली कार्यक्षम, आधुनिक परिवहन सेवा निर्माण करायला हवी.


मोठ्या शहरांमध्ये अपघातांचे व गर्दीचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम, मार्गदर्शक खुणा व संकेतदर्शक दिवे, रस्त्यांची योग्य भौमितिक आखणी, वाहतूक द्वीप, वेगवेगळ्या पातळ्यांवर एकमेकांस ओलांडणारे रस्ते वगैरेंचा वाहतूक नियंत्रणासाठी उपयोग करायला हवा.


तीक्ष्ण वळणे सरळ करणे, रस्त्याला आवश्यक तो चढ देणे, अडथळे काढून टाकून दृश्यमानता सुधारणे, अपघात-प्रवण क्षेत्रात सुधारणा करणे, हमरस्ता अभियांत्रिकीतील नवीन तंत्राचा वापर करणे, दोन ठिकाणांमध्ये शक्यतो रस्ता सरळ ठेवणे, नद्या-नाले ओलांडताना रस्ता शक्यतो जलप्रवाहाला काटकोनात ठेवणे अशा उपाययोजना तज्ञांच्या सहाय्याने केल्या जातील .

  • गुंतवणुकीचे सहाय्य घेऊन उत्कृष्ट दर्जाचे बांधले जातील. रस्ते बांधून त्यांची देखरेख ठेवणे, दुरुस्ती इत्यादी कामे देखील संबंधित कंपनीकडून केली जातील (पहा पथकर धोरण परिशिष्ट क्र. १).
  • राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) याचे आधुनिकीकरण करण्यात येईल. तसंच प्रत्येक शहरासाठी गरजेनुसार परिवहन सेवा असेल.
  • रस्त्यांबरोबरच रेल्वेच्या उभारणीसाठी आणि डेडीकेटेड फ्राईटकॉरीडॉर म्हणजेच जलदगती माल वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग निर्माण करण्यावर जोर देऊन केवळ देशातूनच नव्हे तर अशा प्रकल्पासाठी विदेशातून खास निधीची उभारणी करुन हे प्रकल्प तडीस नेले जातील.
  • केंद्रापासून स्वतंत्र 'महाराष्ट्र राज्य प्रादेशिक रेल्वे वाहतूक' (Regional Railway Transport of Maharashtra - RRTM) ची स्थापना केली जाईल (तपशील पहा परिशिष्ट क्र. २).
  • महाराष्ट्रातली मोठ्या बंदरांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व लहान बंदरे विकसित करण्यासाठी ती भाडेतत्वावर खाजगी कंपन्यांना चालवायला देण्यात येतील.
  • महाराष्ट्र विमानतळ बोर्डाच्या समन्वयाखाली, खाजगी कंपन्या, परदेशी गुंतवणुकीच्या आधारे राज्याच्या ३५ जिल्ह्यांत प्रत्येकी किमान एक – आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय विमानतळ, किंवा धावपट्टी तयार केली जाईल.
  • उद्योग, व्यापार, निर्यात यांना प्रोत्साहन देण्यासाठी २५-३० आसनांची छोटी छोटी विमाने, व तशी विमानतळे त्या त्या ठिकाणी बांधली जातील.

परिशिष्ट क्र. १- पथकर धोरण

प्रस्तावना

पथकरण धोरणात जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी आतापावेतो जी धोरणं आली त्यातील त्रुटींचा अभ्यास करुन नवीन जनताभिमुख पथकर धोरण स्वीकारण्याबाबत आम्ही शासनास सुचवत आहोत.

आधीच्या सर्व धोरणांवर हे धोरण मात करेल व चालू स्थितीतल्या सर्व प्रकल्पांना हे धोरण लागू असेल.

  • हा निर्णय प्रसिध्द झाल्यानंतरच्या नवीन चार व अधिक पदरी प्रकल्पानांच पथकर लागेल. तसेच या प्रकल्पांना 'राष्ट्रीय महामार्ग नियम१९९७' लागू असेल.
  • राज्यातील दुपदरी रस्ते व अर्थसंकल्पातून झालेल्या प्रकल्पांवरील पथकर वसुली ताबडतोब बंद करण्यात यावी. तशी यादी हा शासन निर्णय झाल्यावर १० दिवसांत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावी.
  • मोटार वाहन कायदा, प्रवासी कर, पेट्रोल, डिझेल वरील उपकर, 'सेंट्रल रोड फंड' (CCRF), प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आदि योजना व कर रुपाने गोळा होणार्‍या रकमेतून इतर सर्व रस्ते, पूल, वैगेरे प्रकल्प पूर्ण करण्यात यावेत. जे प्रकल्प बंद करण्यात येणार आहेत त्यासाठी करारनाम्याप्रमाणे ठरवलेली रक्कम वरील रकमेतून वर्ग करण्यात यावी. यामुळे जनता एकाच रस्त्यासाठी एकदाच पैसे भरेल असे स्फूर्तिदायक चित्र निर्माण होईल.
  • वरती नमूद केल्याप्रमाणे विविध करांतून गोळा होणार्‍या पथकराची माहिती जनतेकरता शासनाच्या संकेतस्थळावर दर महिना प्रसिध्द करण्यात यावी.
  • चालू स्थितीतले रस्ते व पूल प्रकल्प कोणत्या योजने अंतर्गत बांधले आहेत याचीही माहिती जनतेकरता खुली करावी.
  • चालू स्थितीतल्या प्रकल्पांत जर रस्ते खराब झाले असतील व नियमात लिहिलेल्या सोयी-सुविधांचा अभाव असल्यास त्याची पूर्तता व अंमलबजावणी कंत्राटदाराला करण्यास सांगणे. तो बोजा सरकारी तिजोरीवर पडणार नाही याची खबरदारी सार्वजनिक बांधकाम खात्याने घ्यावी.
  • शासन निर्णयात प्रकल्पावरील नफा २०% परताव्यासकट पकडण्यात आला होता. चालू स्थितीतील कोणत्याही प्रकल्पात २०% नफा पकडून जर अधिक रक्कम पथकरातून गोळा झाली असेल तर तेथे पथकर वसुली बंद करण्यात यावी.
  • वरील सर्व निर्णयांमुळे अवास्तव पथकर वसुली बंद होऊन बाकी असलेल्या प्रकल्पात ती नियमानुसार होण्यास मदत होईल.
  • नवीन चार व अधिक पदरी रस्त्यांच्या प्रकल्पात राज्यघटनेत नमूद केलेल्या मुक्तविहाराला बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. त्यासाठी पर्यायी रस्ता नागरिकांना उपलब्ध करुन द्यावा. दोन पथकर नाक्यांमधील अंतर कमीतकमी ७०कि.मी. असावे.
  • या पुढील प्रत्येक नवीन प्रकल्पात पथकर वसुली 'राष्ट्रीय महामार्ग नियम १९९७' प्रमाणेच करण्यात यावी व ते सूत्र प्रत्येक आगामी शासन निर्णयात नमूद असावे.
  • सर्व नवीन प्रकल्पांना इलेक्ट्रोनिक पथकर वसुली सुरु करण्यात यावी. दूर पल्ल्यांच्या रस्त्यांसाठी दुबईत चालू असलेल्या 'सलिक सिस्टिम' चा अवलंब करण्यात यावा.
  • सर्व नवीन प्रकल्पात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती सारख्या महामार्गांमधून जाणार्‍या रस्त्यांसाठी सिंगापूर स्थित 'इलेक्ट्रॉनिक रोड प्राइसिंग' यंत्रणेचा अवलंब रस्ता किंमत आकारणीसाठी करण्यात यावा.
  • सर्व नवीन प्रकल्पात नियमानुसार बांधकाम, सोयीसुविधा पूर्ण झाल्याशिवाय पथकर वसुली सुरु करु नये.
  • सर्व नवीन प्रकल्पात दर तीन महिन्यांनी शासनाने वाहन गणती करुन पथकर वसुली नियमाप्रमाणे होत आहे याची खातरजमा करावी.
  • इलेक्ट्रॉनिक पथकर वसुली असल्याने सवलत कालावधी हा विषय गौण होतो. या यंत्रणेमुळे ज्या दिवशी प्रकल्प किंमत वसूल होईल त्या दिवशी पथकर वसुली बंद करण्यात यावी. त्यापुढील रुंदीकरण, मजबूतीकरण, सुधारणांची कामे अर्थसंकल्पातून करण्यात यावी. अर्थसंकल्पात वरती नमूद केल्याप्रमाणे विविध कराची भर पडत असते.
  • छोटे छोटे नियम जसे परतीची पावती, संगणकीकृत पावती, कर्मचार्‍यांना गणवेश, नागरिकांशी सौजन्यपूर्ण व्यवहार, रोज गोळा होणार्‍या रकमेचा फलक, निरीक्षक, पोलिस, मदत व तक्रार केंद्रे, मुतार्‍या यांची चोख व्यवस्था ठेवण्यात यावी.
  • प्रत्येक कंत्राट व कंत्राटदार यांचे 'मुख्य अविशेषक लेखापाल' यांचे तर्फे लेखा परीक्षण करणे बंधनकारक असावे.
  • प्रकल्प किंमत ही श्रम, कच्चा माल, महागाई दर, कामगारांचा रोजगार भत्ता, उपलब्ध वीज, पाणी, स्थानिक हवामान यावर ठरावी.
  • प्रत्येक कंत्राटासाठी 'कनसॉलिडेटेड फंड ऑफ स्टेट' स्थापन करण्यात येऊन पथकर वसुलीची रक्कम त्यात जमा करण्यात यावी. त्यातून कंत्राटदारांची देणी, नफा व पैशांची देवाणघेवाण करण्यात यावी.
  • नियमाप्रमाणे बांधकाम काळात कंत्राटदाराने प्रकल्पाच्या बांधकामाची छायाचित्रे व व्हिडीओ चित्रण दर तीन महिन्यांनी उपलब्ध करुन ठेवावे.
  • टोल स्थानक महापालिका हद्दीपासून १० कि.मी. च्या बाहेर असावा. त्याउपर टोल स्थानकापासून १० कि.मी. परिसरात राहणार्‍या नागरिकांना पथकरात ५०% सवलत देण्यात यावी.
  • टोल स्थानक व टोल रोडवर कुठल्याही प्रकारच्या जाहिरातींना बंदी असावी.
  • कुठल्याही व्यक्तीला पथकरातून सूट नसावी.
  • प्रत्येक टोल स्थानकाच्या २ कि.मी. आधी वजन काटा असावा. मालवाहतूक करणार्‍या वाहनांकडून वजनावर पथकर वसुली आकारण्यात यावी. नियमबाह्य, अवजड वाहनांना टोल रोडवर प्रवेश बंदी करावी.
  • प्रत्येक टोल स्थानकावर स्थानिक संस्था जसे, ग्रामपंचायत, पोलिस, अग्निशामक दल, महावितरण, पालिका यांच्याकडून वीज, पाणी, सुरक्षा, सुविधा यांच्याकरिता मिळवलेले 'नाहरकत प्रमाणपत्र' प्रदर्शित करण्यात यावे.
  • प्रत्येक कंत्राट हे ई-निविदा पध्दतीनेच देण्यात यावे.
  • रस्ते बांधणी व देखभाल खाजगीकरणातून करावी.
  • रिंगरोड, एकात्मित रस्ते हे अर्थसंकल्पातून करावे.

वरील धोरणांमुळे नागरिकांना पारदर्शक पथकर धोरण मिळेल. सर्व वाहतूक विना थांबा, विना त्रास होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल. वरील सर्व विषयांची अंमलबजावणी विहीत मुदतीत होईल.

याबाबत संबंधितांना सूचना देऊन कार्यवाही करावी अशी विनंती आम्ही करत आहोत.

परिशिष्ट क्र. २ - महाराष्ट्रभर रेल्वेचे मजबूत, सर्वदूर जाळे

रस्त्यांपेक्षा रुळांवरून जाणारी वाहतुक ही अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह असते हा जगाचा अनुभव आहे. आज महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांना जोडणारे रेल्वे मार्ग आहेत पण हे जाळे राज्यात सर्वदूर पसरलेले नाही. औद्योगिक वसाहती, पर्यटन स्थळे रेल्वेने जोडलेली नाहीत, पुढे जाऊन ती जोडण्याचे नियोजनही कोणी करताना दिसत नाही. असे नियोजन करायचे झाल्यास केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातली रेल्वे आहे त्याच स्थितीत असलेली आपण पाहत आहोत. अनेक मार्ग प्रस्तावित करून सुद्धा त्यांना हिरवा कंदील मिळालेला नाही. कोणत्या गाडीला किती डबे लावायचे, कुठली नवीन गाडी चालू करायची, थांबे कुठे करायचे इ. निर्णयही राजकीय दबावाखालीच घेतले जातात. प्रादेशिक रेल्वे मार्गांबाबतीतले (उदा. मुंबईची लोकल) निर्णयही खूप गुंतागुंतीचे आहेत; एखादा साधा निर्णयही रेल्वे मंत्रालय, नगरविकास मंत्रालय, अर्थ मंत्रालय व राज्य सरकार हे सर्व मिळून घेतात. आणि त्यामुळे ही निर्णय प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची व वेळखाऊ होते. या सर्वामुळे अत्यंत गरज असताना देखील राज्यातले रेल्वेचे जाळे विस्तारलेले नाही.

राज्यातील रेल्वेचे जाळे असे असले पाहिजे

  • राज्यातली जिल्ह्याची सर्व ठिकाणे मुख्य रेल्वे मार्गाशी जोडलेली असावीत.
  • तालुका तसेच इतर महत्वाची ठिकाणे जिल्ह्याशी जोडलेली असावीत.
  • पर्यटन ठिकाणे मुख्य रेल्वे मार्गाशी जोडलेली असावीत.
  • ओद्योगिक वसाहती मुख्य शहरांशी, जिल्हा ठिकाणाशी जोडलेल्या असाव्यात.

अशा स्वरुपाची व्यवस्था उभारता यावी म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र असे रेल्वे बोर्ड असावे. हे बोर्ड राज्याच्या गरजा ओळखून राज्याला आवश्यक असलेली रेल्वे यंत्रणा उभी करण्यासाठी जबाबदार असेल. बोर्डाला हे निर्णय स्वतंत्रपणे घेता येतील, जसे –

  • रेल्वे जाळ्याचे नियोजन व विस्तार
  • भारतीय रेल्वे मार्गांच्या आधारे राज्यातला विस्तार करून राज्यातील रेल्वे मार्ग भारतीय रेल्वे मार्गांना संलग्न करणे
  • भारतीय रेल्वेने घालून दिलेल्या तांत्रिक मार्गदर्शिकेला विचारात घेऊन आपले तांत्रिक निकष बनवणे
  • दैनंदिन कामकाज
  • गुंतवणूक व वित्त पुरवठ्याच्या पद्धती
  • जमीन अधिग्रहण
  • अतिवेगाचे मार्ग (high speed corridors) विकसित करणे

या रेल्वे मार्गांचा उपयोग प्रवासी व माल वाहतुक करण्यासाठीच प्रामुख्याने असेल. गाड्या गरजेनुसार ३ ते ६ डब्यांच्या (Axel loads up to 16T) व विजेवर अथवा डिझेल वर (EMU/DMU type) चालणार्‍या असतील.सर्व रेल्वे मार्ग हे standard gauge असतील व गाड्यांचा वेग ताशी ८० – १०० कि.मी. असेल.

रूळ, सिग्नल इ. यंत्रणा राज्य सरकार विकसित करेल आणि रेल्वे सेवा खासगी कंपन्यांमार्फत चालवता येऊ शकेल; यासाठीची गरजेनुसार आर्थिक गणिते मांडली जातील. हे रेल्वे बोर्ड वाहतूक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करेल आणि त्याची भूमिका नियमन व समन्वयाची असेल. या बोर्डाला नागरिक तसेच तज्ञ यांच्यातले सदस्य असलेली सल्लागार समिती मार्गदर्शन करेल.



दळण वळण म्हणजे काय?