Monday 11 April 2022

राम गणेश गडकरी


राम गणेश गडकरी... अवघ्या सारस्वतांचं श्रद्धास्थान असणारं हे नाव. आज इतक्या वर्षांनंतरही साहित्यविश्‍वात या नावाचा दबदबा कायम आहे. गडकरींचा जन्म १८८५ मध्ये आजोळी म्हणजेच गुजरातमधील नवसारी येथे झाला. लहानपणचा बराचसा काळ तिथेच घालवल्यामुळे त्यांच्यावर गुजराती भाषेचा मोठा प्रभाव होता. ते गुजराती शिकलेही होते. त्यामुळेच गुजराती ही जवळपास माझी मातृभाषा आहे, असं ते म्हणत असत. त्यांच्यावर लहानपणी पाहिलेल्या गुजराती नाटकांचा मोठा प्रभाव होता. एक व्रात्य मुलगा हादेखील त्यांचा लहानपणचा परिचय... तो कधीच सरळ चालणारा मुलगा नव्हता. या  स्वभाववैशिष्ट्याची फारशी कुठे नोंद नाही पण त्यांचा स्वभाव असाच होता. ते अतिशय हट्टी होते. पण असं खट्याळ, खोडकर मूल असूनही घरतल्यांनी त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलं. त्यांच्या उत्साह आणि ऊर्जेला योग्य वळण देण्याचा प्रयत्न केला. ते वडिलांचे अत्यंत लाडके होते. त्यांच्या जडणघडणीत या स्नेहार्द नात्याचाही मोठा प्रभाव राहिला आहे.
एखाद्या मोठ्या साहित्यिकाकडून प्रभावी साहित्यनिर्मिती होते तेव्हा त्याच्यावर होणार्‍या संस्कारांचा, कौटुंबिक आणि सामाजिक वातावरणाचा, संस्कार-शिकवण आणि मार्गदर्शनाचा मोठा वाटा असतो. गडकरींचं चरित्र अभ्यासतानाही हा अभ्यास अपरिहार्य ठरतो. तो काळच आपसुक निसर्गसानिध्य लाभण्याचा होता. गडकरींनीही तो अनुभवला. त्यांना पोहण्याची आवड होती. नदीत सूर मारायचा आणि मनमुराद पोहायचं हा लहानग्या रामचा छंद. हे वेड त्याला धोक्यात आणू शकतं अशी घरच्यांची आशंका असायची पण रामला पाण्याचं भय नव्हतं. असं अतिशय बुद्धिमान, कल्पक, व्य्रात्य पण तरीदेखील सगळ्यांचं लाडकं रामचं लहानपणीचं रूप होतं. अर्थात त्यांना वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही.
वडिलांच्या मृत्यूनंतर काकांनी त्यांना शिक्षणासाठी गुजरातहून कर्जतला आणलं. तिथे त्यांना एक अत्यंत चांगले शिक्षक मिळाले ज्याचा उल्लेख ते कृतज्ञतापूर्वक करतात. कृष्णाजी विसाजी जोगळेकर हे त्यांचं नाव. मला जर काही यश प्राप्त झालं असेल तर त्यात जोगळेकर मास्तरांच्या आशीर्वादाचा मोठा वाटा आहे, असं गडकरींनी लिहून ठेवलं आहे. नंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या महाविद्यालयाबद्दलही त्यांच्या मनात अत्यंत प्रेम आणि आस्था होती. त्यांच्या अंत:करणाच्या गाभ्यात फर्ग्युसनच्या आठवणींचे ठसे खोलवर उमटल्याचं स्पष्ट पहायला मिळतं. पण इथेही खोडकर आणि बुद्धिमान विद्यार्थी हा त्यांचा नावलौकिक कायम होता.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘पानिपतचा फटका’ नावाची एक पोवाडासदृश रचना लिहिली. आपल्या सवंगड्यांच्या समवेत त्यांच्यातील विनोदी स्वभाव आणि कोटीबाजपणा आणखी बहरला. त्या तरुण वयात या वैशिष्ट्यांना उत्तेजन मिळालं असं म्हणता येईल. कोटीबाजपणाबद्दल ते तेव्हापासूनच नावाजले गेले. त्यांच्या कोट्या चकित करणार्‍या असत आणि विनोद अगदी उत्स्फूर्त असे. त्याच्याबद्दलच्या काही आख्यायिकाही आहेत. त्यातील एक गडकरींच्या हजरजबाबीपणाची प्रचिती देते. गोष्ट अशी घडली की, फुशारक्या मारण्याच्या, मोठेपणा दाखवण्याच्या तारुण्यसुलभ सवयीनुसार एकदा एक मित्र म्हणाला, ‘रात्रभर माझ्या डोक्याखाली विंचू होता. त्याने बरेचदा डोक्यावर नांग्या मारल्या पण तरीही मला काही झालं नाही.’ त्याचं हे अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्य शांतपणे ऐकून घेतील ते गडकरी कसलेे! त्याचं वाक्य पुरं होताच ते म्हणाले, ‘बरोबर आहे, दगडाखाली विंचू सापडणार...!’ असा उत्स्फूर्तपणा आणि हजरजबाबीपणा  व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांच्या साहित्यालाही वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. त्यांच्या बोलण्यात आणि लिखाणात एक वेगळीच चमक आणि नाविन्य असायचं जे वेळोवेळी समोर येतं.
गडकरींना आपल्या बौद्धिक ऐश्‍वर्याची पुरेपुर जाणीव होती. याला अभ्यासाची जोड दिली पाहिजे याचंही भान त्यांना होतं. त्यामुळेच वाचन हे जवळजवळ व्यसन असल्यासारखी त्यांची परिस्थिती होती. पुढे त्यांच्या विडीच्या व्यसनाबद्दल अनेकांनी टिकाटिप्पणी केली पण वाचनाचं व्यसन  त्यापेक्षाही मोठं होतं. त्यांच्या वाचनात सर्व प्रकारची पुस्तकं असत. पुढे नाटकं लिहू लागले आणि ते किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी नाटकांवरील बहुसंख्य पुस्तकं वाचून काढली. नटांनी लिहिलेली पुस्तकं, नाटकांवरच्या टीका, परीक्षण आदींचा त्यात समावेश होता. त्यांचा आवडता नाटककार व्हिक्टर युगो आणि विनोदी लेखकांमध्ये आवडता मार्क ट्वेन. त्यांच्यावर मार्क ट्वेनचा मोठा प्रभाव असल्याचं लक्षात येतं. मराठी लेखनामध्ये ते तात्यासाहेब कोल्हटकरांना गुरू मानत असत तर काव्यामध्ये आपण केशवसुतांचे शिष्य असल्याचं सांगत असत. एका कवितेमध्येच त्यांनी स्वत:ला केशवसुतांचा ‘सच्चा चेला’ म्हणवून घेतलं आहे. केशवसूत वारल्यानंतर त्यांनी एक कविता लिहिली. यातील काही चरण खूप प्रसिद्ध आहेत. एका चरणात ते म्हणतात,
केशवसुत कसुचे गेले,
केशवसुत गातची बसले
हा जाणारा कवी नााचित म्हणूनच त्यांना ‘प्रेमाचे शाहीर’ अशीही उपाधी दिली गेली. विशेषत: ‘प्रेम आणि मरण’सारखी त्यांची कविता ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव   घडो मरणांचा मग पुढे’ असं म्हणते. त्यांचं प्रेम एकीकडे सात्विक आहे तर दुसरीकडे उत्कटही आहे. ही उत्कटता आणि सात्विकता एकाच ठिकाणी नांदवण्याचं कौशल्य त्यांच्या संपूर्ण कल्पनाशक्तीमध्ये आणि भाषेच्या आविष्कारामध्ये दिसतं. म्हणूनच गोविंदाग्रज कवी म्हणूनही तेवढेच प्रभावी राहिले. त्या काळातल्या  ‘कवी पंचक’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाच प्रमुख कवींमध्ये गोविंदाग्रजांचा उल्लेख केला जातो.
गडकर्‍यांचं विनोदी लेखन उपजत आणि शब्द चमत्कृतीपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. कोटीक्रम, हजरजबाबीपणा ही लेखनवैशिष्ट्यं ‘बाळकराम’ या टोपणनावाने  लिहिलेल्या विनोदी साहित्यातून दिसून येतात. ‘संपूर्ण बाळकराम’ हे त्यांचं विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे. यामधील निरनिराळ्या लेखांमधून समकालीन परिस्थितीचं दर्शन घडतंच शिवाय गडकर्‍यांच्या बुद्धिचापल्याचाही साक्षात्कार होतो. विनोद विसंगतीतील बारकावे हेरतो आणि पटकन शब्दांच्या चिमटीमध्ये पकडतो. हे  भाषावैशिष्ट्य गडकर्‍यांच्या विनोदी लेखनात दिसून येतं. मुख्य म्हणजे हे कथात्मक लेखन आहे. अशा पद्धतीने आजच्या काळातही आपण गडकरींच्या लेखनाचा प्रभाव अनुभवू शकतो. अल्प आयुष्य लाभलेल्या या प्रतिभावान कलाकाराला आपल्यातून निघून जाऊनही आता १०० वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

ही तर तुमच्या-माझ्यात अखंड गात राहणारा कवी आहे, असं गडकरी म्हणतात. मराठीमधील मोरोपंतही त्यांना खूप आवडायचे. आर्यारचना आणि त्यातील लयबद्धता याचं त्यांना आकर्षण होतं.  संतसाहित्याबद्दलही त्यांना विलक्षण प्रेम होतं. असं बर्‍याच प्रकारचं वाचन करणारा आणि अभिरुची जपणारा हा साहित्यिक कलंदर होता. मराठीप्रमाणेच त्यांचं इंग्रजीचंही चांगलं वाचन होतं आणि या भाषेवरही उत्तम प्रभुत्व होतं. म्हणूनच त्यांना ‘मराठीतील शेक्सपिअर’ म्हणतात. शेक्सपिअरची प्रतिभा बहुमुखी होती, त्यांच्या साहित्यातून विविध प्रकारच्या मानवी प्रवृत्तीचं दर्शन घडत असे. गडकरींच्या साहित्यात याचंच प्रतिबिंब बघायला मिळतं. संस्कृत नाटककार कालिदास यांचाही त्यांच्यावरील प्रभाव दडून रहात नाही. त्या काळी ‘शाकुंतल’बद्दल सगळ्यांनाच जशी आस्था होती, अभिमान होता तसा तो गडकर्‍यांनाही होता. ‘शाकुंतल’चं मोल पृथ्वीच्या किमतीनेही करता येणार नाही असं ते म्हणत असत.
तो संपूर्ण काळ राजकीय स्थित्यंतराचा होता. १८८५ मध्ये म्हणजेच गडकरी जन्मले त्या वर्षी कॉंग्रेसची स्थापना झाली. १९१९ मध्ये ते गेले. म्हणजेच लोकमान्यांच्या एक वर्ष आधी त्यांचं निधन झालं. या उण्यापुर्‍या ३४ वर्षांच्या आयुर्मानात इतक्या सगळ्यांचे प्रभाव घेत या माणसाने आपलं स्थान निर्माण केलं. त्यांचा उमेदीचा काळ टिळकयुगाने भारला होता. त्याचबरोबर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचादेखील त्यांच्यावर मोठा प्रभाव बघायला मिळतो. या माणसाने तीन प्रकारचं साहित्य लिहिलं. राम गणेश गडकरी या अधिकृत नावाने नाटकं लिहिली. त्यांच्या नावावर मोजून साडेपाच नाटकं आहेत. १९१३ मध्ये ‘प्रेमसंन्यास’ रंगभूमीवर आलं. पाठोपाठ ‘पुण्यप्रभाव’, ‘राजसंन्यास’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’ ही नाटकं आली. ‘वेड्यांचा बाजार’ हे अर्धं राहिलेलं प्रहसन आहे, ‘गर्वनिर्वाण’ हे देखील त्यांचं अर्ध राहिलेलं नाटक आहे. पुढे चिंतामणराव कोल्हटकरांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
गडकरी यांनी ‘सकाळचा अभ्यास’ नावाची एक एकांकिकाही लिहिली. आजदेखील ही बालसाहित्यातला आदर्श ठरावा अशी एकांकिका आहे. म्हणजेच त्यांनी ‘राजसंन्यास’सारखं संपूर्ण ऐतिहासिक नाटक लिहिलं, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ हे ऐतिहासिक वातावरण असणारं परंतु राजकीय नसणारं नाटकं लिहिलं. ‘एकच प्याला’ आणि ‘भावबंधन’चा विषय पूर्णपणे सामाजिक आहे. निरनिराळ्या काळामध्ये नाटक चालावं अशा प्रकारची कालातीतता ‘एकच प्याला’ला लाभली आहे. ‘भावबंधन’ कुठे तरी त्या काळाशी बांधलेलं आहे. या सगळ्या नाटकांमधून त्यांनी विविध प्रकारची पात्रं समोर आणली. केवळ साडेपाच नाटकांच्या माध्यमातून गडकरी यांनी मराठी रंगभूमीवर ठसा उमटवला. त्या नाटकांमध्ये काम करणार्‍या कलावंतांनादेखील गडकरी यांच्या नाटकात काम करणं हे अभिनेता म्हणून चिरंजीव राहण्यासारखं वाटत असे. ‘एकच प्याला’तील सुधाकराची भूमिका तर अनेक नामवंतानी गाजवली आहे. किर्लोस्कर कंपनीशी बांधील राहिल्यामुळे त्यांची ही सगळी नाटकं या कंपनीनेच रंगमंचावर आणली.
गडकर्‍यांची संगीत नाटकंही गाजली. ‘एकच प्याला’ हे असं नाटक आहे जे संगीत नाटकाच्या प्रयोगात अत्यंत चांगल्या पद्धतीने रंगू शकतं. पीडीएसारख्या संस्थेने संगीत वगळून या नाटकाचे प्रयोग करण्याचा प्रयत्नही करुन पाहिला आणि आश्‍चर्य म्हणजे संगीत वगळल्यामुळे त्यातील आशय आणि परिणामकारकतेला कुठेही बाधा आली नाही. हीदेखील एक विलक्षण बाब म्हणायला हवी. संगीत रंगभूमीमध्ये संगीत गाळून टाकलं तर काहीच उरत नाही, नाट्याचा प्रभाव कमी होतो असं म्हटलं जातं. पण गडकर्‍यांचं गद्यही तेवढंच प्रभावी आहे. म्हणूनच पदं असली काय आणि नसली काय, फारसा फरक पडलेला दिसत नाही. नाटकाची ताकद कथानकातून, गद्यातून आणि त्यातील भाषणातून व्यक्त होते. कारण गडकर्‍यांचं नाटक हे भाषाप्रभू नाटक आहे. त्यांच्या सगळ्या नाटकांमध्ये प्रदीर्घ स्वगतं आहेत. ‘एकच प्याला’, ‘राजसंन्यास’ मध्ये आपण ती पाहतो. ही स्वगतं अतिशय ताकदीची असून त्यातून त्या त्या पात्रांची व्यक्तिमत्त्वं त्यांनी उभी केलेली आहेत. म्हणजेच इथेही शेक्सपिअरचं स्वगतांचं वैशिष्ट्य दिसून येतं. मुख्य म्हणजे ते कंटाळवाणं न होता भाषेच्या चमत्कृतीमुळे लखलखत राहतं. म्हणूनच ही लखलखणारी भाषा आहे. कान दिपवणारी भाषा आहे.
कवी म्हणूनही ते तेवढेच प्रसिद्धी पावले. त्या काळच्या टोपणनाव घेण्याच्या पद्धतीप्रमाणे गोविंदाग्रज या टोपणनावाने त्यांनी कविता लिहिल्या. त्यांचा एकच काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. ‘वाग्वैजयंती’ हे त्याचं नाव. त्यांच्या कवितांवर केशवसुतांचा मोठा प्रभाव दिसून येतोे. केशवसुतांची ‘दसरा’ नावाची कविता होती, गडकर्‍यांनीही याच नावाची एक कविता लिहिली. केशवसुतांच्या ‘तुतारी’चा अनुकार त्यांच्या काव्यातून झालेला दिसतो. सामाजिक जाणिवा, राष्ट्रप्रेम या सगळ्या बाबी त्यांच्या काव्यात आहेतच पण त्यापेक्षाही त्यांनी प्रेमाची आणि प्रणयाची वेगळी रूपं रचलेली दिसतात, जी वेगळी आहेत. कद

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here