Saturday 18 December 2021

महाराष्ट्राच्या प्राकृतीक विभाग

महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या तीन विभाग पडतात

पश्चिम किनारपट्टी (कोकण) :-

भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशांपैकी एक असणारा पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाचे तीन भागांत वर्गीकरण केले जाते. त्यातील सुरत ते गोवा इथपर्यंतची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र दृष्टिकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडील बोर्डी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत, तर पूर्व-पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रापासून तर सह्याद्री पर्वतापर्यंत आहे.

निर्मिती :-

महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग प्रस्तर भंगामुळे खाली खचल्यामुळे कोकणची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आहे. प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला व पश्चिमेकडील काही भाग समुद्रात तर काही भाग उंच सारखा कोकण म्हणून तयार झाला आहे.

विस्तार:-

उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून (दमणगंगा नदी खोरे) –  दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडीपर्यंत, दक्षिणोत्तर विस्तारलेला चिंचोळा निमुळता प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी होय. उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे.

लांबी, रुंदी,उंची व क्षेत्रफळ :-

पश्चिम किनारपट्टी ची दक्षिणोत्तर लांबी 560 किमी असून कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या समुद्र किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर एवढी आहे. कोकण किनारपट्टी ही सरळ रेषेसारखी नसून ती ठिकठिकाणी वक्राकार आहे. त्यामुळे त्या कोकण किनारपट्टीस दंतुर असेही म्हटले जाते. कोकण किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किमी (सरासरी 44.7 किमी) असून उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे 100 किमी पर्यंत (वसई ते हरिश्चंद्रगड) ती विस्तारलेली आहे.

कोकण किनारपट्टी ची सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात  कुडाळ येथील रांगणा किल्ला जवळ 40 किलोमीटर आहे. तर सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यात पंच्याऐंशी ते 100 किलो एवढी आहे. तसेच समुद्रसपाटीपासून कोकण किनारपट्टी ची उंची 5 मीटरपासून 300 मीटर पर्यंत एवढी आहे. किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी-कमी होत गेलेली आहे त्यामुळे किनारपट्टी उत्तरेकडून दक्षिणेकडे निमुळती होत गेली आहे कोकण किनारपट्टी चे एकूण क्षेत्रफळ 30,394 चौ किलोमीटर आहे.

कोकण किनारपट्टीची रचना :-

कोकण किनारपट्टीची रचना मैदानी प्रदेशात प्रमाणे नसून नद्या व डोंगररांगांनी पिंजून काढलेला प्रदेश अशी आहे. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या असंख्य नद्या या भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात, तर याच नद्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पश्चिमेकडे गेलेल्या उपरांगा देखील समुद्रापर्यंत विस्तारलेल्या आहेत व समुद्राच्या उपरांगांनी कोकणातील नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राला येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्यांमुळे येथील किनारपट्टी सलग न राहता खंडित झालेली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे.

कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडील भागाकडे तांबूस-तपकिरी मृदा आढळते तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोहयुक्त जांभी मृदा आढळते

उपभाग :-

कुंडलिका नदीखोरे यामुळे कोकण किनारपट्टी दोन भागांत विभागली जाते.

उत्तर कोकण:- समाविष्ट जिल्हे:- दक्षिण कोकण:- समाविष्ट जिल्हे:-
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर रत्नागिरी व सिंधुदुर्ग

खलाटी:-

पश्चिमेकडील अरबी समुद्र लगतच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असते. उतार सौम्य आहे. या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दांडे,  खाजणे, चौपाटी तसेच समुद्रलाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात.

वलाटी :-

कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात. उंची सरासरी 200 ते 300 मीटर असते, उतार तीव्र स्वरूपाचा आहे. डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग हे या भागाचे वैशिष्ट्य सांगता येईल.


भूरूपे :-

कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या अरबी समुद्रातील सागरी लाटांचे कार्य सतत चालू असते. त्यामुळे या भागात समुद्रकडे, सागरी गुंफा, चौपाटी, वाळूचे दांडे, चबुतरे अशी अनेक भूरूपे तयार झाली आहेत.  विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी अशी तयार झालेली भूरूपे मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...