Saturday 16 March 2024

● मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे

: पार्श्वभूमी
• मराठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रचून शिवाजी राजे १६७४ मध्ये पहिले छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी राज्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ पुत्र राजारामांना गादीवर बसविण्याचा कट उधळून देऊन या संभाजी राजे (१६८०-१६८९) मराठी राज्याचे दुसरे छत्रपती
बनले.

• संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी येसूबाईंनी विश्वासू सरदारांशी चर्चा करून व मराठे शाहीवरचे संकट बाळाजीने ओळखून राजाराम राज्यांना नजर कैदेतून मुक्त करून त्यांना गादीवर बसविले. ‘राजा सलामत तर राज्य सलामत’ या हेतूने
मराठ्यांनी १६८९ मध्ये सुरक्षेसाठी राजारामांना कर्नाटकातील जिंजीस पोहोचविले. मुघलांनी राणी येसूबाई व बाल शाहू यांना कैद केली. १६९७ मध्ये राजाराम महाराष्ट्रात परतल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा २ मार्च, १७०० रोजी वयाच्या केवळ ३० व्या वर्षी मृत्यू झाला.

• राजारामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाईंनी आपला साडेतीन-चार वर्षाचा मुलगा शिवाजी यास गादीवर बसवून स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आपल्या हाती घेतले.

 छ.शाहू राजे यांची सुटका व राज्यारोहण

• औरंगजेबच्या मृत्यूनंतर बहादूरशाहने शाहू राजांना मुक्त केले. बाजीरावाने ताराबाईंनी शाहूंच्या हाती मराठेशाहीची सत्ता देण्यास नकार दिला. ताराबाईंचा सेनापती धनाजी जाधव यांनी ऐनवेळी शाहूंची बाजू घेतली. या गृहयुद्धातून झालेल्या खेडच्या युद्धात
(१२ ऑक्टोबर, १७०७) ताराबाईंचा पराभव झाला. शाहू राजांनी सातारचा किल्ला सर करून १२ जानेवारी, १७०८ मध्ये राज्याभिषेक करून राज्यारोहण केले. ते मराठ्यांचे चौथे छत्रपती बनले. ताराबाईंनी कोल्हापूरला मराठ्यांची दुसरी गादी
निर्माण केली. या दोघांमधील यादवी १७३१ च्या वारणेच्या तहापर्यंत चालू राहिली.

● पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२)

 कारणे व महत्त्वाच्या घटना

• बॉम्बे सरकारला महाराष्ट्रात क्लाईव्हने बंगालमध्ये स्थापन केलेल्या दुहेरी शासनव्यवस्थेची स्थापन करण्याची इच्छा होती. पेशवेपदासाठीच्या सत्ता संघर्षाने त्यांना संधी प्राप्त झाली.

• माधवरावांच्या मृत्यूनंतरचा सत्ता संघर्ष: पेशवेपदाची इच्छा असलेल्या रघुनाथरावांनी (माधवरावांचा काका) पेशवा नारायणराव (माधवरावांचा भाऊ) याचा खून घडवून आणला व स्वत:स पेशवा घोषित केले. तेव्हा मराठा दरबारातील नाना फडणीस, महादजी शिंदे, सखाराम बापू वगैरे बारा व्यक्तींनी राघोबाच्या विरोधात बारभाईंचे राजकारण केले. त्यांनी राघोबाला पदच्युत केले व नारायणरावांच्या नुकत्याच झालेल्या मुलाला सवाई माधवराव असे नाव देऊन त्याला पेशवा बनविले व त्याच्या वतीने हे बाराजण राज्यकारभार पाहू लागले.

•राघोबाने गेलेले पेशवेपद मिळविण्यासाठी बॉम्बे प्रेसिडन्सीशी ‘सुरतचा तह’ (१६ मार्च, १७७५) रोजी केला. त्यामुळे युद्धास सुरूवात झाली.

• मात्र सुरतचा तह कलकत्त्याच्या गव्हर्नर-जनरलला पसंद पडला नाही. त्याने बॉम्बे सरकारला मराठ्यांची नवीन तह करायला सांगितले. दीर्घ चर्चेनंतर बॉम्बे सरकारने पुणे दरबारातील शासक गटाशी मार्च १७७६ मध्ये ‘पुरंदरचा तह’ केला. या तहामुळे युद्ध तात्पुरते थांबले. या तहाद्वारे राघोबाला मराठ्यांच्या स्वाधीन
करायचे ठरले व त्याने केलेले पूर्वीचे तह रद्द करण्यात आले.

• मात्र हा तह मुंबईच्या इंग्रजांना नुकसानकारक वाटला. तसेच कंपनीच्या संचालकांनाही तो पसंत पडला नाही. अमेरिकन वसाहती गमावल्याने आता इंग्रजांनी पुन्हा राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी युद्ध सुरू केले. पण पुण्याकडे राघोबाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांचा महादजी शिंदेंनी तळेगाव येथे पराभव
करून त्यांना ‘तळेगावचा तह’ (१७७९) मान्य करावयास लावला.

• हा तह इंग्रजांनी अमान्य केल्यावर त्यांचा निर्णायक पराभव करण्यासाठी नाना फडणीसाने पेशवे, नागपूरकर भोसले, हैदर अली व निझाम यांचा ‘चतुःसंघ’ इंग्रजांविरूद्ध उभा केला. मात्र धुर्त इंग्रजांनी निझाम व भोसल्यांना फितविले. तसेच गोद्दार्ड
याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याहून मोठे सैन्य मराठ्यांविरूद्ध पाठविले.

• दोन वर्षे युद्ध असेच चालू राहिले. इंग्रजांनी महादजींकरवी शांततेचा प्रस्ताव मांडला. हैदर न विचारता मराठ्यांनी ‘साल्बाईचा तह’ करून ७-८ वर्षे चाललेले युद्ध संपुष्टात आणले.

● साल्बाईचा तह, १७ मे, १७८२

• साल्बाई या ग्वाल्हेरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी महादजी शिंदे (पेशव्यांच्या वतीने) व इंग्रज यांमध्ये हा तह १७ मे, १७८२ रोजी करण्यात आला व पहिले इंग्रजमराठा युद्ध थांबले. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्याः

– १)साष्टी, भडोच, मुंबई इंग्रजांकडेच राहतील, तर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी मराठ्यांना परत केली जातील.
– २)इंग्रजांनी राघोबाची बाजू घेऊ नये.
– ३)इंग्रजांना त्याच्या व्यापारी सवलती पुन्हा प्राप्त होतील.
– ४)दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या दोस्त राज्यांवर हल्ला करायचा नाही.तसेच पेशव्यांनी इतर युरोपीयन शक्तींना मदत करायची नाही.

● महत्व

• हा तह इंग्रजांसाठी खूप महत्वाचा ठरला. खरे तर, तो इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या इतिहासात एक महत्वाचे वळण (turning point) ठरला. या तहामुळे इंग्रजांची मराठ्यांशी २० वर्षे शांतता प्रस्थापित झाल्याने या काळात त्यांनी आपली शक्ती
वाढविली व मराठ्यांव्यतिरिक्त इतर शबूंचा एक-एक करून पराभव केला. नाना फडणीसाला हा तह हैदरच्या मान्यतेशिवाय करायचा नव्हता. त्यामुळे महादजी व नाना यांच्या फूट पडली, तसेच मराठे व हैदर यांचे संबंधही बिघडले.

● दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५)

● कारणे

• १)लॉर्ड वेलस्लीचे मराठ्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आक्रमक धोरण. त्याला मराठ्यांवर तैनाती फौजेचा तह लादायचा होता.

• २)सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर १७९५ मध्ये राघोबाचा अकार्यक्षम व कर्तव्यशून्य असा मुलगा दुसरा बाजीराव यास पेशवेपद मिळाले. १८०० मध्ये नाना फडणीसाचा मृत्यू झाला व ‘मराठेशाहीतील सारे शहाणपण संपले’. १८ व्या शतकाच्याअखेर पर्यंत अनेक हुशार, मुत्सद्दी व अनुभवी मराठी राजकारण्यांचा मृत्यू झाला होता.

• ३)मराठा सरदारांमधील दुफळी: दौलतराव शिंदे व यशवंतराव होळकर यांच्यातील यादवी. बाजीरावाची होळकरांविरूद्ध शिंद्यांना मदत, यशवंतराव होळकरांनी केलेला पेशवे व शिंदे यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव. या पराभवामुळे बाजीरावाने
संरक्षणासाठी इंग्रजांकडे धाव घेतली व १३ डिसेंबर, १८०२ रोजी ‘वसईचा तह करून इंग्रजांची तैनाती फौज पदरी ठेवण्याचे मान्य करून इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारले.

• ४)वसईच्या तहामुळे इंग्रजांना पेशव्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्राप्त झाला. मात्र इतर मराठा सरदारांनी तहास मान्यता देण्यास नकार दर्शविल्याने दुसऱ्या युद्धास तोंड फुटले.

● महत्त्वाच्या घटना

• १८०३ मध्ये ऑर्थर वेलस्लीने शिंदे-भोसले यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव केला व त्यांच्या तैनाती फौजेचे पुढील तह केले:

१) १७ डिसेंबर, १८०३ रोजी रघुजी भोसले यांच्या बरोबर ‘देवगावचा तह’ केला. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेन्ट म्हणून नेमण्यात आले.

२) ३० डिसेंबर, १८०३ रोजी दौलतराव शिंदे यांच्या बरोबर ‘सुर्जी अर्जनगावचा तह’ केला. जॉन माल्कम यास शिंद्यांच्या दरबारात रेसिडन्ट म्हणून नेमण्यात आले.

• होळकरांविरूद्ध मात्र इंग्रजांना यश मिळू शकले नाही. शेवटी २४ डिसेंबर, १८०५ रोजी यशवंतराव होळकरांबरोबर इंग्रजांनी ‘राजपूरघाटचा तह’ हा शांततेचा तह केला.

• अशाप्रकारे दुसऱ्या इंग्रज- -मराठा युद्धात भोसले, शिंदे, होळकर यांच्यासारख्या मातब्बर सरदारांना इंग्रजांनी पराभूत केले. भारतात कंपनीची सत्ता सर्वश्रेष्ठ शक्ती (Paramount Power) बनली.

● तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८१७-१८१८)

• कारणे

• आपण एकटे पडलो आहोत याची जाणीव दुसऱ्या बाजीरावाला झाली. त्याने इंग्रजांच्या जोखडातून सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपले स्वातंत्र्य नष्ट झाल्याने मराठा सरदारांमध्यही असंतोष होता.

• गायकवाडांच्या गंगाधरशास्त्रींच्या खूनात बाजीरावाचा व त्याचा सल्लागार त्र्यंबकजी डेंगळे यांचा हात असल्याचा आरोप करून इंग्रजांनी बाजीरावावर जून १८१७ मध्ये ‘पुणे तह’ हा एक
कडक तह लादला, जो वसईच्या तहाला पूरक म्हणून
लादण्यात आला. या तहाने बाजीराव निव्वळ एक संस्थानिक बनला.

• लॉर्ड हेस्टिंगने पिंडाऱ्यांचा बंदोबस्त करण्यापूर्वी त्यासाठी शिंद्यांची मदत घेण्यासाठी दौलतराव शिंदेबरोबर नोव्हेंबर, १८१७ मध्ये ‘ग्वाल्हेरचा तह’ केला. तसेच दुसऱ्या मल्हारराव होळकरांबरोबरच जानेवारी, १८१८ मध्ये ‘मंदासोरचा तह’ केला.

• पुणे तहाच्या विरूद्ध बाजीरावाने बापू गोखलेच्या साहाय्याने लढण्याचे ठरविले. ५ नोव्हेंबर, १८१८ रोजी निर्णायक असे तिसरे युद्ध खडकी येथे सुरू झाले. युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीरावाने शरणागती पत्करली. त्याच्या बरोबर इतर मराठा सरदार घराणीही इंग्रजांच्या अंकित आले.

• इंग्रजांनी बाजीरावास पेन्शन देऊन त्यास कानपूरजवळ बिठूर येथे रवाना केले. पेशव्यांचा सर्व प्रदेश ताब्यात घेतला.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...