Monday 8 April 2024

लोकसंख्या


राज्यांच्या सहकार्यान केंद्र शासनामार्फत दर दहा वर्षांनी जनगणना  घेण्यात येते व याद्वारे लोकसंख्येबाबत व्यापक माहिती उपलब्ध होते. सन 2011 मध्ये घेण्यात आलेली जनगणना  ही मालिकेतील 15वी  असून त्यानुसार राज्याची लोकसंख्या 11 24 कोटी तर त्यातील स्त्रियांचे प्रमाण 48.1% आहे. राज्याचा दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर 2001 – 2011 या कालावधीत 6.7% अंकांनी कमी झाला असून राष्ट्रीय पातळीवर तो 3.8 %  अंकांनी कमी झाला आहे. राज्यांमध्ये दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर मध्ये नोंदवली गेलेली ही सार्वत्रिक घट आहे.



लोकसंख्या एक साधन संपदा


लोकसंख्या एक नैसर्गिक संसाधन आहे. लोकसंख्येची गुणवत्ता ही कार्यक्षमता, साक्षरता, बुद्धिमत्ता यावर अवलंबून असते. कोणत्याही देशातील उद्योगधंदे, शेती, व्यापार, खाणकाम, संरक्षणासाठी व व्यवसायाची प्रगती ही तेथील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. लोकसंख्येमुळे देशाला संरक्षणासाठी मानवी शक्ती प्राप्त होते


महाराष्ट्रातील जल, भूमी, वने, खनिजे व प्राणी संसाधने इत्यादींचे वितरण अत्यंत असमान आहे. या संसाधनांना महत्त्व केवळ मानवामुळे प्राप्त झाले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.  इ. स.  2011 च्या जनगणनेनुसार  महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11, 23, 72, 972 इतकी आहे. यामध्ये एका 51.9 % पुरुष व 48. 1% स्त्रिया आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9. 29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. 


लोकसंख्येची वाढ


1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थळ निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 4 कोटी होती. त्यानंतर गेल्या 50 वर्षांमध्ये उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, पर्यटन, शेती यांच्या विकासामुळे जीवनात स्थिरता आली. रोजगारांच्या निर्मितीमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात स्थलांतर झाले. त्यामुळे लोकसंख्येत सतत वाढ झाली आहे.


दारिद्र्य, निरक्षरता, कुटुंबनियोजनाचा अपुरा प्रचार यामुळे जन्म दर जास्त आहे तर वैद्यकीय सुविधा, अन्नधान्याचा पुरवठा, साथीच्या रोगांवर नियंत्रण इत्यादींमुळे मृत्यूदर कमी होऊन महाराष्ट्रातील लोकसंख्येची वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा वेग भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा कमी आहे. 1961 ते 1971 च्या काळात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर 27.45% इतका होता. तर भारताचा 24.8% होता. 1981 ते 1991 या काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वृद्धीदर 25.73% इतका होता. यावेळी भारताचा लोकसंख्या वृद्धीदर 23. 85% होता. 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर वेग 15.99 % आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 35.94% आहे. मुंबई मध्ये  सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीदर (-) 7.57% नोंदला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रथमच हा दर ऋणात्मक आहे.



लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक :


महाराष्ट्रात लोकसंख्येचे वितरण असमान आहे. कोकण,पश्‍चिम महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त असून औरंगाबाद व नागपूर विभागामध्ये लोकसंख्या विरळ आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या (9.84%) असून सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग (0.08%) जिल्ह्यात आहे. लोकसंख्येच्या वितरणावर मुख्यत्वे नैसर्गिक आर्थिक व सामाजिक घटकांचा परिणाम होतो.



1)  नैसर्गिक घटक :


महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिण-उत्तर सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वत व त्यापासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे तसेच कोकणामध्ये उंच-सखल भूप्रदेश व दाट वने व तसेच पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही वनक्षेत्र जास्त असल्याने लोकसंख्या कमी आढळते. महाराष्ट्र पठारावर सह्याद्रीच्या पूर्व भागात, नद्यांचा मैदानी भागात अनुकूल हवामान व सुपीक मृदा यामुळे लोकसंख्या दाट आढळते.



2) आर्थिक घटक :


मुंबई – पुणे, कोल्हापूर – इचलकरंजी, औरंगाबाद – जालना व नागपूर विभाग या प्रदेशात वाहतूक, उद्योगधंदे, व्यापाऱ यांचा विकास झाल्याने लोकसंख्या दाट आढळते. पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचन सुविधांमुळे शेतीचा विकास झाला असल्यामुळे तसेच पूर्व महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या खनिजांची उपलब्धता असल्याने तेथे जास्त लोकसंख्या आढळते.



लोकसंख्येची संरचना 


लिंग गुणोत्तर, वय संरचना,  साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण-शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते. जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या रचनेची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो.



अ) वय संरचना :


लोकसंख्येचे वयोगटानुसार विभाजन करता येते. सामान्यपणे 0 ते 14 वयोगट व 60 पेक्षा जास्त वयोगट वृद्धांचा (परावलंबी) समजला जातो तर 15 ते 59 वयोगट कार्यक्षम समजला जातो.  वय रचनेवरून राज्यात किती श्रमशक्ती उपलब्ध आहे व किती परावलंबी लोकसंख्या आहे याची माहिती मिळते तसेच नियोजन व विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकसंख्येची वय रचना माहित असणे आवश्यक असते.


सामान्यपणे जन्मदर, मृत्युदर, स्थलांतर इत्यादी घटकांचा परिणाम वय रचनेवर होतो. इ.स.  2001 च्या जनगणनेनुसार काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण 42% तर काम न करणाऱ्यांचे प्रमाण 58% होते. यामुळे आपल्या राज्यात कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. तसेच 50% मुलांचे प्रमाण व 8% वृद्धांचे प्रमाण आहे.


जनगणना 2011 नुसार राज्यातील सुमारे 20% लोकसंख्या किशोरवयीन गटातील (वय 10 ते 19 वर्षे) असून युवा गटाचे वय (वय 15 ते 24 ) प्रमाणही सारखेच आहे.


किशोरवयीन लोकसंख्येचे प्रमाण नंदुरबार जिल्हा मध्ये सर्वाधिक (23%) असून मुंबई शहरात सर्वात कमी (16.1%) आहे.


युवा लोकसंख्येचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक (20.5%) सिंधुदुर्गमध्ये ते सर्वात कमी (16.5%) आहे.


जनगणना 2011 नुसार राज्याची सुमारे 9.9% लोकसंख्या 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय गटातील असून 2001 मध्ये हे प्रमाणात 8.7% होते.


राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 2001 व 2011 करिता अनुक्रमे 7.4% व 8.6% आहे.  राज्यामध्ये 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींची सुमारे 5.12 लाख एक सदस्य कुटुंबे आहेत तर राष्ट्रीय पातळीवर अशा कुटुंबांची संख्या 49. 76 लाख आहे.


राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण भागांमध्ये 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींचा एक सदस्य कुटुंबांची संख्या अधिक आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

बरेच दिवसापासून यावर प्रश्न आलेला नाही.... त्यामुळे प्रश्न अपेक्षित आहे. ...

Q. गरजणारे चाळीस .............हे वारे आहेत ? 1) ईशान्य - व्यापारी 2) आग्नेय - व्यापारी 3) नैऋत्य - प्रतिव्यापारी 4) वायव्य - प्रतिव्याप...