Saturday 11 January 2020

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी.

◾️भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी. समाजवादी देशभक्त आणि काँग्रेस नेते एवढीच त्यांची ओळख सर्वांना माहित आहे. मात्र, त्यापेक्षाही शास्त्रींचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान खूप मोठे आहे. 

◾️2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तरप्रदेशमधील मुघलसराय प्रांतात रामदुलारी देवी आणि शारदा प्रसाद श्रीवास्तव यांच्या घरी या भारतरत्नाचा जन्म झाला.

◾️'मूर्ती लहान पण किर्ती महान' असं थोडक्यात वर्णन शास्त्रींचं केलं जातं. मवाळ आणि शांत स्वभावाचे शास्त्री स्वातंत्र्यलढ्यात ओढले गेले ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यामुळे.

◾️मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शास्त्रींना खरी ओळख मिळाली. 'जय जवान, जय किसान' अशी घोषणा देत शास्त्री भारतीय जनमानसाच्या गळ्यातील ताईत बनले. 

◾️ केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे आणि गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपविली गेली.

◾️जून 1964 मध्ये जवाहरलाल नेहरूंचे निधन झाल्यानंतर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान बनले. 

◾️'हरित क्रांती'चे जनक अशी त्यांची आणखी एक ओळख.

🔰शास्त्रींबद्दलच्या अशाच अनेक रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊयात. 

1⃣. लाल बहादूर यांचे मूळ आडनाव शास्त्री नव्हते. शास्त्रींचे मूळ नाव लाल बहादूर शारदा प्रसाद श्रीवास्तव होय. मात्र, 1925 मध्ये वाराणसीमधील काशी विद्यापीठात त्यांना 'शास्त्री' या पदवीने गौरविण्यात आल्यानंतर शास्त्री हेच आडनाव त्यांनी पुढे वापरले. काशी विद्यापीठात शास्त्र शाखेतील विद्वानांना 'शास्त्री' या पदवीने गौरविण्यात येत होते.

2⃣. लाल-बाल-पाल यामधील लाला लजपत राय यांनी स्थापन केलेल्या 'लोकसेवक' मंडळाचे ते आजीवन सदस्य होते. लोकांचे सेवक म्हणून शास्त्रींनी अनेक सामाजिक कामेही केली.

3⃣. त्याकाळातील इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शास्त्रींनी प्राथमिक शिक्षण मौलवींच्या हाताखाली घेतले होते. तेथे मुस्लीम धर्मगुरूंनी शास्त्रींना उर्दू आणि पर्शियन या भाषा शिकविल्या. इंग्रजी भाषा ही देशात अधिकृतपणे वापरायला अजून सुरवात झाली नव्हती. त्या अगोदर उर्दू आणि पर्शियन या भाषाच अनिवार्य भाषा म्हणून शिकविल्या जात होत्या. 

4⃣ देशाच्या पंतप्रधानपदी शास्त्री रुजू झाले. त्यानंतर 1965 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. त्यावेळी देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा शास्त्रींनी स्वत:चे मानधनही स्वीकारले नव्हते.  

5⃣. एकीकडे युद्धजन्य परिस्थिती तर दुसरीकडे देशात अन्नधान्याचा तुटवडा अशा दुहेरी संकटात पंतप्रधान शास्त्री अडकले होते. तेव्हा भारत-पाक युद्धावेळी भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. आणि देशातील जनता आणि भारतीय सैन्यात नव्याने स्फूर्ती निर्माण झाली. 

6⃣. तत्पूर्वी, 1920 मध्ये लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभागी झाले. गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. 1930 मध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये अटक झाल्यानंतर त्यांना दोन वर्षाहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती. याच दरम्यान ते गांधी आणि नेहरूंचे एकनिष्ठ अनुयायी बनले. 

7⃣. शास्त्रींनी आपल्या पगारातील मोठा वाटा विविध गांधीवादी लोकांच्या कल्याणासाठी दान करत. आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी मर्यादेत खर्च करण्यावर भर दिला. त्यामुळे पंतप्रधान असूनही इलेक्ट्रिक वस्तू, गाडी आणि इतर शासकीय गोष्टींचा ते क्वचितच वापर करत असत. 

8⃣पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशातील पहिल्या समितीची स्थापना केली. 

9⃣ 1928 मध्ये शास्त्री हे अधिकृतपणे काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले. आणि तेथून पुढील 20 वर्षात त्यांनी स्वतंत्र भारतासाठी सुरू असलेल्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. परकीय राज्यकर्त्यांच्या तावडीतून देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात त्यांनी यशस्वी भूमिका बजावली. 

◾️ 11 जानेवारी 1966 रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला.

◾️10 जानेवारी 1966 ला पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष अय्यूब खान यांच्यासोबत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना कार्डियाक अॅटॅक आल्याचे सांगितले जाते. मात्र, देशाच्या दुसऱ्या पंतप्रधानाच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ अद्यापही गूढच बनून राहिले आहे. 

◾️राजधानी दिल्लीत असणारे शास्त्रींचे समाधिस्थळ 'विजय घाट' म्हणून ओळखले जाते. आजही शास्त्रींचे हे समाधिस्थळ अनेकांसाठी स्फूर्तिदायी बनून राहिले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...