Monday 4 April 2022

आंबेडकरपूर्व दलित पत्रकारिता

आंबेडकरपूर्व दलित पत्रकारितेमध्ये गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागू बनसोडे यांचे सामाजिक जागृतीचे कार्य मोठे आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकारितेचे माध्यम जवळ केले. गोपाळबाबा वलंगकर हे पहिले दलित पत्रकार. त्यांनी अस्पृश्यांतील सर्व जातींना संघटित करुन गुलामगिरीविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. लष्करातून १८८६ मध्ये निवृत्त झाल्यावर २३ ऑक्टोबर १८८८ रोजी त्यांनी विटाळ विध्वंसन नावाची पुस्तिका प्रकाशित केली. या पुस्तिकेत त्यांनी हिंदू समाजव्यवस्थेचे बौद्धिक पातळीवर विश्लेषण केले आहे. १८९० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ स्थापन केली. इंग्रजांच्या राजवटीबाबत मात्र त्यांचे मत अनुकूल होते. इंग्रजी राजवट दलितांना उत्थानाची संधी देईल, अशी आशा त्यांना होती. अस्पृश्यांचा लष्करातील भरतीला करण्यात आलेल्या मनाईविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. या संदर्भात १८९४ मध्ये त्यांनी इंग्रज सरकारला विस्तृत निवेदन सादर केले. ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ वर टीका झाली, तरी त्यास ते उत्तर देत. दीनबंधू पत्रात ही टीका प्रसिद्ध होत असे. याच पत्रात गोपाळबाबाही स्वतंत्र लेखन करीत. गोपाळबाबांची पद्यरचना-जिचा उल्लेख ते ‘अखंडरचना’ असा करीत-दीनबंधूने प्रकाशित केली. दलितांचे पहिले संपादक शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित पत्र (मासिक) १ जुलै १९०८ रोजी सुरु केले. सुमारे तीन वर्षे ते चालले. कांबळे यांनी आदि हिंदू हे वृत्तपत्र काढल्याचा उल्लेखही आढळतो. सोमवंशीय मित्र या पत्रापूर्वी मराठा दीनबंधू (१९०१), अंत्यज विलाप (१९०६) आणि महारांचा सुधारक (१९०७) या तीन पत्रांचा उल्लेख केला जातो. त्याचे जनकत्व किसन फागू बनसोडे (१८७९-१९४६) यांच्याकडे दिले जाते. मात्र या तिन्ही पत्रांसंबंधी काहीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचे संपादक-संस्थापक म्हणून बनसोडे यांना श्रेय देणे श्रेयस्कर ठरणार नाही, असे दलित पत्रकारितेच्या अभ्यासकांना वाटते. कांबळे यांनी सोमवंशीय मित्रमधून व तत्कालीन इतर मराठी-इंग्रजी पत्रांतून लेखन केले. ते कार्यकर्ता-संपादक होते. अस्पृश्यता-निवारणाच्या कार्यासाठी त्यांनी सभा, संमेलने व अधिवेशने आयोजित केली. मुरळी, जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकारही घेतला. त्याचा परिणाम सोमवंशीय मित्रवर झाला. त्यात आर्थिक कारणांची भर पडली व १९११ मध्ये हे पत्र बंद पडले. सोमवंशीय मित्रमध्ये लेख, अग्रलेख, स्फुटे, बातम्या, वाचकांची पत्रे असा मजकूर प्रसिद्ध होई. समाजसुधारणा, शिक्षण, विवाहसंस्था यांविषयी कांबळे यांनी गांभीर्याने लेखन केले.राजकीय प्रश्नाबद्दल लिहिताना जहाल पक्षाचा निर्देश ते ‘नवीन दांडगा पंथ’ असा व पुढे ‘टवाळ पक्ष’ म्हणूनही करीत. शिवजयंती उत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव यांवर त्यांनी टीका केली.  

किसन फागू बनसोडे यांनीही दलित पत्रकारितेची पार्श्वभूमी तयार केली, ते ‘कर्ते सुधारक’ होते. शिक्षणाचा प्रसार आणि दलितांची आर्थिक उन्नती यांसाठी १९०३ साली त्यांनी ‘सन्मार्गबोधक निराश्रित समाज’ नावाची संस्था स्थापन केली. १९०७ साली त्यांनी मुलींची शाळा काढली व मुद्रणालय सुरु केले. यांशिवाय त्यांनी तीन स्वतंत्र पत्रेही काढली. निराश्रित हिंदू नागरिक (१९१०), विटाळ विध्वंसक (१९१३), मजूर पत्रिका (१९१८) व चोखामेळा (१९३१) या चार पत्रांमधून दलितांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लेखन केले. हिंदू धर्म, धर्मग्रंथ आणि रुढीग्रस्त समाज हे त्यांच्या लेखनाचे विषय होते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...